ad1

Saturday, 25 April 2026

गुजरा हुवा जमाना.....

                  
            

गुजरा हुवा जमाना.......

"मुस्सा मामू सायकील होना"
" कित्ते टेम के लिए होना? पछान बताव?"
"एक घंटा,  बडेभाई हमेशाच ले जाते, मैं भी लेगया पहले तुमारेसे."

लोखंडाच्या गंजलेल्या टपरीवर मलकट पांढरा कुर्ता पायजामा नेसलेले, दाढी, चेहऱ्यावर वण व कायम वैफल्यग्रस्त दिसणारें मूस्साभाई कधी अंथरलेल्या पोत्यावर तर कधी लोखंडी खुर्चीवर विराजमान असायचे. समोर एक छोटा लाकडी टेबल, त्यावर जुनं फाटकं रजिस्टर, दोऱ्याने बांधलेला पेन किंवा रिफील असे.   त्यापुढे आठ-दहा जुन्या सायकली ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभ्या असत. चैनीच कव्हर व मागच्या मडगार्डवर ठळक अक्षरात नंबर पेंट केलेलं असायचा. टपरीच्या आत सायकल रिपेरिंगसाठीचे हत्यार, जुन्या चाकांच्या रिंग, सायकल सीट घंट्या व इतर सुटे भाग अस्ताव्यस्त पडलेले असे.  टपरीच्या बाजूला मळकट बादलीत पाणी, हवेचा पम्प, पंपचरचं सामान आणि अस्ताव्यस्त पडलेले सायकलचे ट्यूब-टायर दिसे.  मुस्साभाईच्या बाजूला चहा-भज्जेच्या एक-दोन हाटेली आणि पान-टपऱ्या होत्या.  लहान मुलं ढुंकूनही त्या टपऱ्याकडे वळत नसत.  तिकडे वयस्कर मंडळीं, मोंढ्याचे व्यापारी, कर्मचारी वर्ग तेथे चहा-पान व धूर सोडतांना दिसायची. 

सकाळी मूसाभाई दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून बसलेले असायचे. गावखेड्यात मुक्कामी  असलेल्या बसेस साधारण आठ वाजता वडाच्या झाडाजवळ धूळ उडवत थांबायच्या. बाजार, खरेदी, शेतमाल व कापूस विक्रीसाठी आलेली ग्रामस्थ मंडळीसाठी हा थांबा सोयीचा होता. कपडे झटकत प्रवासी बसमधून उतरायचे.  कच्च्या रस्त्याने उडणाऱ्या धुळीने ते माखलेले असायचे. बाहेर गावी जाणारे प्रवासी मात्र मुख्य बसस्टँडला जात. येथूनच सायकल भाड्याने घेऊन बाजारात, कापूस विकत घेणाऱ्या जिनिंग मिल कडे लोकं जायची. भाड्याने घेतलेल्या सायकलमुळे कामं पटपट व्हायची. जातांना सायकल परत करुन लोकं बसस्टँड गाठायची. नाहीतर 'नाईटचार्ज' लागत असे.

त्याकाळी मोजक्या लोकांकडे सायकली असायच्या. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात खोली घेऊन राहणाऱ्या तरुणानां भाड्याच्या सायकलीशिवाय पर्याय नसे. अशी काही 'शहरी' तरुण मंडळी राजेश खन्ना, अमिताभ सारखी हिप्पी वाढवून सायकल चालवीतांना, कट मारतांना दिसायची.  सायकल विकत घेण्याची आयपत नसल्यामुळेच भाड्याने सायकली घेतल्या जायच्या. किंवा दोन तीन मित्रामध्ये एक सायकल असायची. संपूर्ण गावामध्ये क्वचित एखाद्या कुटुंबाकडे ही चैनीची वस्तू असायची.  एखादा पाहुणा सायकलने गावात आला तर त्या सायकलभोवती चकरा मारून ती मालकीची आहे की भाड्याची, लोकं याची खात्री करून घेत.  रस्तेच नव्हते तेंव्हा दिवसात एक एसटी बस असे. इतर वेळेसाठी पर्याय एकच होता - भाड्याची सायकल.

मला आठवतं, ८वीत असतांना झेंडावंदन करुन आम्ही सायकल शिकण्याचं ठरवलं.  मुस्साभाईला ओळख सांगून त्याकडून दोन सायकली घेतल्या. सोबत मोठे बंधू जयभैय्या आणि मीत्र अशोक ठाकूर होता.  अंगुठ्याने टायरची हवा चेक करत त्याने आम्हांला दोन सायकली दिल्या.  पोलीस मैदानावर शिकतांना मी ब्रेक दाबायचं विसरलो.  सायकल सरळ पोलीस कार्यालयाच्या फेंसिंगला जाऊन धडकली. सायकल समोरचा एसएस स्टीलचा लोगो 'H' वाकला व मलाही थोडं लागलं. माझ्या जखमेपेक्षा मला त्या वाकलेल्या H लोगोची चिंता वाटू लागली. मुस्साच्या लक्षात आलं तर काय करायचं? ते आधीच तसं होतं 'हमने कुछ नही किया' असं सांगायचं का? पण आमचं नशीब, त्याचं लक्ष त्याकडे गेलंच नाही. भाडं भरून आम्ही सुटलो.

'संपूर्ण भारत देशात हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध होता. खरं तर आमचा तो भ्रम होता. आमचे पाऊल कधी हिंगोलीबाहेर पडलेच नसल्याने आम्हालासुद्धा ते खरंच वाटायचं. एकदा दसऱ्यात एक प्रसिद्ध सायकल कलाकार आला. त्याच्या नावावर 'अखंड सात दिवस' सायकल चालविण्याचा विक्रम होता म्हणे. अशी सर्वत्र चर्चा झाली. रामलीला मैदानावर, आम्रपालीजवळ त्याने 'शो' सुरु केला. राजेश खन्नासारखी हेअरस्टाईल असलेला तो कलाकार गोलाकार मैदानात अखंड सायकल चालवतांना दिसला. मधेच तो चालत्या सायकलीवर शर्ट बदलयाचा तर मधूनच पाणी पीत होता तर कधी दोन्ही हात सोडून हळूहळू गोलाकार सायकल फिरवत होता.  आत एका कपड्यावर प्रेक्षक पैसे टाकत होती.  एक तास हा प्रकार बघून आमच्यासारख्या नवशिक्याना खूपच आश्चर्य वाटायचं. तो कसा झोपत असेल? थकल्यानंतर विश्रांतीचं काय? जेवन आणि हो प्रात:विधि?  पण असे प्रश्न आमच्या बालबुद्धीत येण्याचा प्रश्नच नव्हता.

आठवीचं वर्ष संपता संपता मी सायकल शिकलो. अधून मधून मी सायकलने टायपिंग क्लासला जात असे. ऐके दिवशी आम्ही एसटी बसने बाहेर गावी जाणार होतो. पेडगाव ते हिंगोली आणि एक तासानंतर बाहेर गावी जाणारी एसटी बस होती. त्या एक तासात काम करून मला परत बसस्टॅन्डला यायचं होतं.  मी भाड्याची सायकल घेतली. वळनावर वाळूवर चाक जाताच स्लिप होऊन मी पडलो. खुराणा बंगल्याच्या दक्षिणेला खाली खोलगट जमिनीवर चौधरीची लॉउंड्री होती. नेहमीचा ग्राहक त्यामुळे चौधरीने मला उचलून घरी आणलं. एक तासात माझ्या गळ्यात फ्रॅक्चरचा पट्टा आला. उजव्या हाताला प्लास्टर चढविण्यात आलं होतं. ऐन परीक्षेच्या काही दिवसाआधी हा अपघात घडला होता. चिंता दोन परीक्षेची होती, टायपिंग व आठवी वार्षिक. कंदी रुग्णालयातून पैंडल रिक्षाने वर्गशिक्षक खिल्लारे सराचं घर गाठलं. 'सामायिक परीक्षेच्या मार्कांवरून वार्षिक परीक्षेचे मार्क मिळतील, चिंता करू नकोस' सरांनी असं आश्वासन दिलं. आठवी पास झालो. 30 WPM ऐवजी सरळ 40 WPM परीक्षेला बसून टायपिंग परीक्षा पास झालो.

दहावीला गणिताच्या पडोळे सरांची ट्यूशन अगदी सकाळी सहाला असायची. फटलक फटलक कव्हरला घासणाऱ्या चैनचा आवाज आणि घंटीचा गजर करत आम्ही गल्याबोळ्या पार करत ट्यूशन गाठायचो. जैन मंदिराच्या भोंग्यातून 'मैं नही माखन खायो...' अनुप जलोटाची प्रभातभजन कानी पडायचे. मधूनच ते 'हिरे मोतीsssss.ईईई ' असा लांब आलाप घ्यायचे. त्या लांब आलाप दरम्यान आपण किती सायकल चालविली ते मी मोजत असे. आता तो फालतू प्रकार आठवून माझं मलाचं हसू येतं. हिंगोली आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची झुंड सायकलने ये-जा करतांना दिसायचे. त्याकाळी महाविद्यालयाचा दर्जा नावाला साजेसा होता. याच काळात शहरापासून दूर असलेल्या शेतात पहिल्यांदाच मी एक जेन्टस आणि एक लेडीज सायकली जोडीने उभ्या बघितल्या!

कालांतराने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पगारी वाढून रस्त्यावर स्वतःची सायकल, लुना, एम-80 सुद्धा दिसू लागल्या. पण त्या 'भाड्याच्या सायकली' इतिहास जमा झाल्या. पुढे इंजिनियरिंगला असतांना विद्यार्थी आणि बरेच प्राध्यापकसुद्धा सायकलने महाविद्यालयात यायचे. आज देशातील मोठया शहरात स्वतः चालविण्यासाठी सायकलीप्रमाणे कार भाड्याने मिळतात. पुढे एआय तंत्रज्ञानावर आधारित चालकरहित कारसुद्धा मिळतील. पण आमच्यासाठी त्या भाड्याने मिळणाऱ्या सायकली कायम आठवणीत राहणार - पचास पैसे एक घंटा!

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर 
मो. 9822108775 


Tuesday, 21 April 2026

कॉर्पोरेट हॉस्पिटलचा विळखा


तीन वर्षांपूर्वीची घटना. डेंग्यूने आजारी मुलीच्या मृत्युची बातमी  कदाचित सर्वानी वाचलीच असावी. आजारी ७ वर्षाच्या मुलीचे पालक तिला दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम येथील पंच तारांकित कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एडमिट करतात. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर ती  दगावते.  हॉस्पिटलच नाव खराब होवू नये म्हणून तिला त्वरित घरी घेवून जा असे सांगण्यात येतं. सामान्य अशा 'डेंग्यू' आजाराचं १८ लाखाचं बिल त्या पालकांच्या हातात थोपवलं जातं. कळस म्हणजे ज्या शेवटच्या कपड्यात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो त्याचेसुद्धा बिल पालकाकडून वसूल केल्या जातं! विशेष म्हणजे हे बिल एकदम बरोबर कसं याचं सविस्तर विश्लेषण 'कॉर्पोरेट हॉस्पिटल' चा स्टाफ 20 लिखित पानात पटवून देतं!

या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघनं साहजिक होतं. सुपरसॉनिक गतीने ही बातमी जेंव्हा समाज माध्यमामधे व्हायरल झाली त्यामुळे आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांना चौकशीचे आदेश दयावे लागले. कैंसर, एखाद्या अपरीचित दुर्धर आजार, मल्टीपल सर्जरी किंवा दीर्घ काळासाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरी एकंदरित बिल एव्हड़ होवू शकत नाही, मग डेंग्यूसारख्या सामान्य आजाराच एव्हड़ अफाट बिल जनतेला खुप जास्त वाटनं साहजिक. आज गांव-तालुका पातळीवरील सामान्य दवाखान्यात शेकडो डेंग्यु रुग्ण उपचार घेताना आणि बरे होताना आपण पाहतो. क्वचितच, जेंव्हा पेशन्टला व्हेंटीलेटर गरज पड़ते तेंव्हा रुग्ण शहरातील मोठ्या किंवा शासकीय हॉस्पिटलमधे जातात किंवा त्याला 'रेफर' केल्या जातं. पण तेथील खर्च एव्हड़ झालेलं ऐकिवात नाही. विशेष म्हणजे फोर्टिसच्या बिलामधे वापरल्या गेलेल्या कन्झुमेबल्स आणि त्याचे भाव बघून कोणाचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. चौकशी अंती असं आढळलं कि या बिलामधील सर्वात मोठा हिस्सा हा 'सर्जीकल मटेरियल' चा होता. ज्यामधे एकूण ६६० डिस्पोजेबल इंजेक्शन, २७७६ हैण्डग्लोवचा खर्ज जोडण्यात आला होता. एका ₹१३/-च्या ग्लुकोस्ट्रीपसाठी त्या पालकाकडून ₹२००/- चार्ज घेण्यात आले होते.

यमो हरति प्रणान्‌, वैद्य प्राणन्‌धनानिच । सुभाषितावरून  वैद्यकीय व्यवसायावरील टीका नवीन नाही.  परंतु मागील काही दिवसात डॉक्टरावर होणाऱ्या टिका वाढत्या असून जीव घेण्या हल्ल्यानी डॉक्टर मंडली त्रस्त झाली आहेत. समाजात डॉक्टरप्रमाणे इतरही व्यवसायिक,उद्योजक किंवा राजकारणी आपन बघतो. फक्त दोन निवडणुकी दरम्यान त्यांची इनोव्हा, बंगलो, आणि इतर कमाई कितीतरी पटीने वाढलेली आपण वाचतो.     पण त्यांच्यावर लोकांनी हल्ले केले किंवा जाहीर वाच्यता केलेली कुठेच ऐकीवात नाही. किंवा त्यांना कुणी देशलुटारू, भ्रष्ट म्हणण्या इतपत कुणाची हिंमत होत नाही. किंबहुना अशी हिंमत होत नाही. कारण त्यांची प्रतिक्रिया परवडणारी नसते.  पण डॉक्टर म्हंटले कि 'एक सॉफ्ट टारगेट'! रोज एक तरी बातमी वर्तमानपत्रात वाचावयास मिळते. आधीच अशा घटनेमुळे त्रस्त, अडचणीत आणि धाकधुकीत असलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाचे हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरांसाठी वरील बातमी ऐकून 'भित्यापाठी वाघोबा' अशी स्थिति झाली.

पाण्यातील मासा 
झोपणार कैसा 
जावे त्यांच्या वंशा 
तेंव्हा कळे l 

डॉक्टरांवरील वाढते हल्ले, राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, समाजातील ढासळती प्रतिष्ठा, क्लिष्ट शासकीय नियमावली आणि शेवटी 'थँकलेस जॉब' या कारणांनी येत्या काळात वैद्यकीय क्षेत्राची अवस्था खूपच बिकट होत जाणार आहे.  एकेकाळी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असं समीकरण होतं. पण हल्ली कोणताही डॉक्टर स्वतःच्या मुलाला किंवा मुलींना वैद्यकीय क्षेत्र निवडू देत नाही. ऐकून सर्वच डॉक्टरांची मुलं अभियांत्रिकीसाठीची जेईई परीक्षा देऊन आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी किंवा इतर महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. यामागील हेतू स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आपल्या मुलांना वैद्यकीय क्षेत्रात करियर घडवू  द्यायचं नाहीये.   आज घडीला देशातील २६ लाख विध्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात. त्यातील खूप कमी मुलं ही डॉक्टरपुत्र  असतात. 

आज मुम्बई दिल्लीसारख्या मेट्रो शहरामधे नोकरीस असलेल्या, आयटी क्षेत्रात काम करणारी सॉफ्टवेअर मण्डळी भरपूर मोठ्या पैकेजवर काम करत असते. प्रत्येक वस्तु ब्रैंडेड घेणारा पैकेजवाला हा नोकरवर्ग किरकोळ आजरासाठीसुद्धा कोर्पोरेट हॉस्पिटलमधे भरती होतात. आपल्या परिसरातील छोट्या हॉस्पिटल नर्सिंग होममधे इलाज होत असतानाही हा वर्ग एक ब्रेंड म्हणून कॉर्पोरेट हॉस्पिटलकड़ेच आकर्षित होतो. एकच छताखाली सर्व सुविधा,  'कैशलेस हॉस्पिटलायझेशन', राजीव गांधी योजना, महात्मा फुले योजनेमूळे पैशे भरायची गरज पडत नाही. पण अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमधे त्यांच्या आजारावर इलाज करणारे डॉक्टर निष्णात आहेत कि नाही याचीही त्यांना कल्पना नसते. 

एक नफाखोरीचा उद्योग म्हणून प्रत्येक शहरात कितीतरी कॉर्पोरेट हाउस चैरिटी आणि समाजसेवेच्या नावाखाली हॉस्पिटल सुरु करत आहेत. ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचं कामकाज एखादया 'फाइव स्टार' व्यवसायिक हॉटेलसारखं असतं. ज्यामधे वेगवेगळे मैनेजमेंट डिपार्टमेंट आणि मोठा स्टाफ असतो ज्यांचा हॉस्पिटलला जास्तीत जास्त नफा कमवून देणे हाच मूळ हेतु असतो. कॉर्पोरेट म्हंटल तर तेथे खाजगी कंपनीचे सर्व नियम लागू पडतात. जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांच्या हाताखाली वेगवेगळे जनरल मैनेजर, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेप्यूटी मेनेजर आणि स्टाफ असा अफाट पसारा असतो. मग त्यांचा पगार, भत्ते, कमिशन आणि इतर खर्च एव्हड़ा असतो कि हॉस्पिटलची गाड़ी सुरळीत चालून भरपूर नफा व्हावा म्हणून एकीकडे जास्तीत जास्त 'कॉस्ट कटिंग' आणि दुसरीकडे पेशंटचे 'अफाट बिल' अशी 'नफेखोरीची योजना' असते. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी दिलेलं टारगेट पूर्ण करणारे गल्लेलठ पगार असणारे 'एमबीए स्मार्ट मेनेजर' ची गरज असते. कदाचित याच कारणाने बऱ्याच नॉन-मेडिको स्टाफचा पगार अशा हॉस्पिटलमधे डॉक्टरापेक्षा जास्त असतो. अशा हॉस्पिटलचा प्रभावी 'मार्केटिंग व पब्लिसिटी' डिपार्टमेंट असतो ज्याना मंथली ठराविक पेशंट आणन्याचं टारगेट, कमीशन दिल्या जात. जवळ जवळ सर्वच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही धनाड्य आणि कोणत्यानं कोणत्या राजकिय पक्षाशी जवळीक असलेल्या उद्योजकाची आहेत. 'सेवा पेक्षा मेवा प्रिय' असलेल्या या उद्योजकात रुग्णसेवा ही फक्त तोंडाला लावण्यापूरती किंवा कागदावर दाखविण्यापुरती असते. 

प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल हे एक चैरिटेबल ट्रस्ट आणि 'रिसर्च सेंटर'ही असतात. गरीब रुग्णासाठी काही बेड येथे राखीव असावित, त्यांना कमी दरात सुविधा मिळावी तसेच मेडिकल क्षेत्रात या रिसर्च सेंटरनी नवनवीन संशोधन करावित अशी सरकारची अपेक्षा असते. पण तसे काही संशोधन किंवा प्रयोग होताना दिसत नाहीत कदाचित या उदासीनतेमुळे वैद्यकिय संशोधनात आपण इतर पाश्चात्य देशाच्या तुलनेत बरेच मागे आहोत. तसेच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही एक चैरिटेबल ट्रस्ट असते आणि नियमाप्रमाने कॉरपोरेट होस्पिटलची काही बेड गरीब पेशंटसाठी राखीव ठेवावे लागते, पण प्रत्यक्षात हे सर्व कागदावर दाखवले जाते. आज किती कॉर्पोरेट हॉस्पिटल हा नियम पाळतात? दूसरा मुद्दा असा की हॉस्पिटल जरी चैरिटेबल असेल तरी तेथील मेडिकल आणि सर्जीकल स्टोरला हे चैरिटीचे नियम लागू होत नाहीत. आणि हॉस्पिटलच्या एकन्दरीत बिलात मेडिकल, डिस्पोसजेबल, सर्जिकल आणि शेवटी टैक्सचा खुप मोठा वाटा असतो. मग १५ दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन मधे २७७६ हैण्डग्लोज, ६६० सिरिंज वापरले जाते. हे किंवा अशी ओषध आणि सर्जीकल अतिशय घासाघिस करून कमीत कमी दरात मोठ्या फार्मासूटिकल किंवा सर्जीकल कम्पन्याकडून खरेदी केली जातात. त्या मोठ्या खरेदीवर मिळनारी इतर 'स्किम'चा हिशोब लावला तर ज्या ग्लुकोस्ट्रिप साठी ₹200/- हॉस्पिटल चार्ज करतात ती त्यांना फक्त ₹ 13/-ला पड़ते! अशा प्रकारे रुग्णाला चार्ज करताना त्याची किंमत अवाच्या सव्वा लावली जाते. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पेशंटशी व्यक्तिगत सम्बन्ध नसते किंवा सम्बन्ध ठेवायची गरज नसते. त्यामुळे तो पेशंट गरीब आहे का आमिर याच्याशी त्यांचं काही देणेघेणे नसते. त्यामुळे बऱ्याचदा एकाच पेशन्टला किती तरी वेगवेगळे डॉक्टर बघून बिल वाढवत जातात, नको त्या टेस्ट, इन्वेस्टिगेशन सांगितले जाते आणि कन्झुमेबलच बिल चेपल्या जाते. उदा. एखाद्या पेशंटचा पाय दुखत असेल तर त्यास फिजिशियन,न्यूरो फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन विजिट देत बसतात. मग प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन, इन्वेस्टिगेशन आणि औषधि, कन्झुमेबल यामुळे बिल वाढत जातं. त्यातच पेशंट मेडिक्लेम पॉलिसीधारक असेल तर मग बघायची सोय नाही!

आता मुळ मुद्दा. 18 लाखाच्या या कॉर्पोरेट बिलामधे सर्व खर्च वजा जाता प्रत्येक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टराना फिस म्हणून किती रूपये मिळाले असतील? अर्थात इतर खर्चाच्या तुलनेत ही रक्कम खुपचं कमी असते. मग असे असताना प्रत्यक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राची का बदनामी व्हावी? ही फाइव स्टार हॉस्पिटल्स पेशन्टला पद्धतशिर लूटतात आणि बदनामी मात्र डॉक्टर आणि सम्पूर्ण वैद्यकिय क्षेत्राची होते. मग सर्वच डॉक्टरावर टिकेची झोड़ उड़ते. डॉक्टरविरुद्ध विचाराना हवा मिळते. खालच्या पातळीची विशेषणं लावली जातात. डॉक्टरकडून थोड़ी जरी चुक झाली तरी त्याचा 'पराचा कावळा' करण्यात जनता कसर सोडत नाही. मग अशात राजकारणीही मागे कसे राहणार, तेही आपली पोळी भाजुन घेतात. काही दिवसा अगोदर राजकारणी नेत्यांनी मुम्बई-पुण्याच्या डॉक्टरांना अशीच एक 'खळ..खटयानळ' धमकी दिली. 'डॉक्टरांनी पेशंटला वेठीस् धरु नये, गाठ आमच्याशी आहे'. त्यांचा रोख लहान हॉस्पिटल किंवा नर्सिंगहोमवर होता. कदाचित कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा तेथील 'चमत्कारिक बिल' आणि पद्दतशिर लूटीची त्याना कल्पना नसावी. 

मंगलयान, चंद्रयान, राफेल, गगनचुबी उंचच्या उंच पुतळे अशा बाबतीत देशाची प्रगती किंवा दिंडोरे पिटले जात असले तरी आरोग्यासारख्या मूलभूत क्षेत्रात पाहिजे तशी प्रगती देशाने केलेली नाही. आज जगातील सर्व प्रगत राष्ट्रे जीडीपीच्या साधारण ६% खर्च आरोग्यावर करत असताना तर आपला देश जीडीपीचा फक्त १.५% खर्च आरोग्य सेवेवर खर्च करत असतो. त्यातील ५०% रक्कमेचा भ्रष्टाचार वजा करता जीडीपीच्या साधारण ० .७५% रक्कमच आरोग्यावर खर्च होतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आरोग्यसेवेत शासनाचा सहभाग, म्हणजे सरकारी इस्पितळाचा सहभाग फक्त १७% आहे. म्हणजे देशाच ८३% आरोग्य हे खासगी डॉक्टरांच्या सेवेवर अवलंबुन आहे. आणि याचाच फायदा खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट उद्योजक घेत आहेत. कोरोनामुळे शासनाचं हे पितळ उघडं पडलं. देशात ठिकठिकाणी तात्पुरते इस्पितळं सुरु करावी लागत आहेत. आरोग्य क्षेत्रात शासनाचा टक्का वाढला तर आरोग्यावर होणारा जनतेचा खर्च , कॉर्पोरेट हॉस्पिटलची मनमानी कमी होईल.  

आज छोट्या आणि मध्यम स्वरूपच्या हॉस्पिटलमुळेच वैद्यकिय क्षेत्राची पत टिकून आहे जिथे आजही खेड्यापाड्या तील गरीब रुग्णाना कमी दरात सेवा देणारे डॉक्टर सेवाव्रती भावनेने सेवा देत आहेत. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या अशा प्रकारामुळे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कॉर्पोरेटच्या भंपक जाहिराती, त्यांचे रुग्ण ओढण्याचे प्रभावी मार्केटिंग नेटवर्क, तंत्र यामुळे उत्तम सेवा देवूनही त्यांच्याशी स्पर्धा करण्यात त्यांची दमछाक होत आहे. 

स्वतःचे हॉस्पिटल सुरु करायचे म्हन्टल तर योग्य जागा, भाड़े, मेन्टेनेन्स, स्टाफचा पगार, कीचकट शासकीय ना हरकत परवानगी, उपकरणें आणि एव्हड़ सर्व करून मोठ्या हॉस्पिटलसोबत स्पर्धा! या समस्येमुळे उच्चशिक्षित डॉक्टरमण्डली आपल्या देशात व्यवसाय सुरु न करता परदेशी जाणे पसन्द करत आहे. आयटी क्षेत्र किंवा इंजीनियरचे ब्रेनड्रेन आपन समजू शकतो पण उद्या देशाचे उच्चशिक्षित डॉक्टरच बाहेर जात असतील तर ही मोठी समस्या आहे.
आजही 70% गांव आणि तालुका जिल्ह्याचे पेशंटचा भार छोट्या शहरातील नॉन-कॉर्पोरेट आणि छोट्या-मोठ्या सरकारी हॉस्पिटलवर आहे. वैद्यकिय स्टाफ, उपकरणाची कमी आणि इतर मुलभुत सुविधा नसतानाही ते त्यांचे काम ईमानएतबारे करत आहेत. इतर लहान हॉस्पिटलमधे डॉक्टर स्वतः पेशन्टला वैयक्तिक जाणत असल्यामुळे कुठे तरी डॉक्टर-रुग्ण हे नातं टिकून आहे. भविष्यात महाराष्ट्र शासन बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार आहे त्याचा निश्चितच जनतेला होईल.

वाईट प्रवृती इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्य क्षेत्रात असतीलही पण त्यामुळे सरसगट सर्वांनाच दोषी समजणे चुक. थोडक्यात अशी लूट थांबावी म्हणून गरज आहे की अशा मोठ्या हॉस्पिटलसाठी शासनाने एक कठोर नियमावली आखुन द्यावी जेणेकरून रुग्णावर होणारा खर्च कमी होवून जनता बिलामुळे होरपळुन जाणार नाही किंवा कर्जबाजारी होणार नाही, त्यावर एक अंकुश राहील. तसेच शासनाच्या आरोग्य विभाग, मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडिया यानि वेळीच अशा प्रकाराची दखल घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून वैद्यकिय क्षेत्राबद्दल वाढती संभृमता, दुष्प्रचार कमी होईल, पेशंटचा डॉक्टर आणि हॉस्पिटलप्रती विश्वास वाढेल.


© प्रेम जैस्वाल पेडगावकर 9822108775
     ह. मु. औरंगाबाद 
 ( हा लेख नावासह सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)

Monday, 6 April 2026

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

         गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी!

सण-उत्सवाचा निखळ आंनद, मजा ही गावखेड्यात असते, असं म्हंणलं तर वावगं ठरणार नाही. शहरात आपोआपच त्यावर मर्यादा येतात. होळीची गाणी ऐकतांना याची प्रचिती येते. कोणतंही होळीच गाणं हे शहरात चित्रित झालेलं मी तरी बघितलं नाही. किंबहुना 'होळी' खेळायची तर ती गावकऱ्यानीं असं म्हणायला हरकत नाही. कारण शहरी लोकांना अशी 'खुलके होळी' खेळायला 'लुकिंग गूड लुकिंग बॅड'  अशा पुष्कळ मर्यादा असतात. या वरूनच आठवते बालपनीची होळी. 

आमच्या बालपणी पंधरा दिवसापूर्वीच होळीची चाहूल लागायची.  होळीदहनासाठी लाकडं लागायची. वयांनी मोठी आणि थोडी टवाळ मुलं गावातून 'बोंबलत' होळी दहनासाठी चावडीवर लाकडं गोळा करत फिरायची. हल्ली 'बोंब मारने' हा वाक्यप्रचार फक्त पुस्तकात वाचण्यात येतो. मुळात त्याचा उगम किंवा संबंध निश्चितच होळीसी असणार. त्याकाळी आजच्यासारखी गॅस शेगडी प्रकार नव्हता. स्वयंपाकासाठी प्रत्येक घराच्या आवारात गोवऱ्याचा थप्पी आणि फोडलेली लाकडं असायची. कित्येकांच्या घरासमोर एखादं मोठं लाकडाचं खोड असायचं. तसं आमच्याही आवारात खूप लाकडं ठेवलेली असायची. गावभर लाकडासाठी बोंबा मारत फिरणाऱ्या अशा टोळक्याच्या तोंडी खूपच अश्लील वाक्य असायची.  पण गावखेड्याच्या बोलाचालीत त्या 'शिव्या' कायम असायच्या. बऱ्याचदा अशा बोंबलनाऱ्या टोळीच्या मागे मागे आम्ही सुद्धा फिरायचो.  प्रत्येक घरातून हक्कानी लाकडं किंवा गवऱ्या घेतल्या जायच्या. मनाई करणाऱ्याच्या घरासमोर जोर जोरात बोंबा मारल्या जायच्या. मागून मिळत नसेल तर रात्रीत ती आवरातून चोरीने लाकडं पळविली जायची. मग या भितीने बऱ्याचदा लाकडं घरात आणून ठेवली जायची. अशा वेळेस एखाद्याच्या वखर नागराचं किंवा बैलगाडीच्या कामाची लाकडी सामान सरळ होळीत नेल्याचे प्रकार घडायचे. पण त्यामुळे कुठे ही भांडण तंटा झालेला मला आठवत नाही. 

प्रतिष्टीत व्यक्तींच्या समक्ष होळीपूजन आणि दहन व्हायचं. का? माहित नाही पण आमच्या काळी होळीला सुद्धा फटाके फोडले जायचे. सायंकाळी पेटविलेली होळीचा निखारा दुसऱ्या दिवशीपर्यंत असायचा. त्या होळीच्या राखेला खूप महत्व होतं. आमच्या छ संभाजीनगरमध्ये मी कारल्याच्या बिया लावत असतांना आमच्या आईने 'त्या बियाला होळीच्या राखेसोबत लावायचं असतं' असं सांगितलं होतं. बऱ्याचशा आजारासाठी होळीची राख जतन करुन ठेवल्या जायची. हल्ली शहरात होळीनिमित्त साखरेच्या गाठी विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. पण पूर्वी ह्या गाठी खोब्रा, खजूर आणि इतर मेव्यापासून तयार केलेल्या असायच्या. बताशाच्या गोड गाठी हल्ली दिसत नाही. बताश्याच्या गोड गाठीची हार गळ्यात घालून आम्ही ती खात खात खेळायचो.  आता सर्वत्र 'गोड म्हणजे विष' असा अपप्रसार सुरु आहे. होळी म्हणजेच पुरणपोळी हे समीकरण आहे. गावभर ही पुरणपोळीच जेवण व्हायचं.   डायबेटीस किंवा मधुमेह हा शब्द आम्ही ऐकला नव्हता. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी हा शब्द प्रथम ऐकला होता. त्यामुळे एका बैठकीत 'तेरा पुरणपोळ्या' किंवा 'किलोभर बुंदी' फस्त करणाऱ्या बहादरांनासुद्धा 'डायबेटीस' झालेला मी पाहिला नाही!

आम्हाला वेध दुसऱ्या दिवशीच्या धुळवडीचे लागलेले असायचे.  कृत्रिम रंगाचा इतिहास खूप अलीकडंचा. पण हजारो वर्षापासून महत्व असलेल्या होळीसाठीचे रंग मग कुठून यायचे? आमच्या बालपणी होळीच्या काही दिवस आधी आम्ही पळसाच्या लाल फुलापासून रंग तयार करायचो. शेतरानात ही फुलं सहज उपलब्ध व्हायची. भर उन्हात रानाला शोभून दिसणारी ती पळसाची टवटवीत फुलं आम्ही दगडावर वाटून तिच्यापासून रंग तयार करण्याचे प्रयोग आम्ही करायचो. पण शेवटी तो एक असफल प्रयत्न असायच. कारण पाहिजे तसा पक्का रंग त्या फुलापासून तयार होत नसे. 

पूर्वी आमच्या घरी किराणा दुकान होतं. होळी धूळवडीसाठी लहानमोठ्या पिचकाऱ्या आणि रंग विकले जायचे. लहाणाला लहान आणि मोठ्यांना मोठी पिचकारी त्यामुळे आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे असे विचार येत. अगदी बालपणी पिचकारी एकचं प्रकारची असायची. त्याचं प्लास्टिक अगदी तकलादु असायचं तिचं काम क्षणिक असायचं. काही तासात ती क्रॅक व्हायची. कालांतराने फुग्यात रंग भरून मारण्याचा प्रकार सुरु झाला. पण पाण्याची सोयीस्कर होळी तेंव्हा ही होती आणि आजही ती कायम आहे. 

पण गावातील होळीचा खरा रंग गावातील मंडळी 'पूर्णतः रिचार्ज' झाल्यानंतर दिसायचा. होळीसाठी गावकरी आधीपासूनच दारूचा 'इंतजाम' करुन ठेवत. सर्वांना देशी दारू कदाचित परवडत नसावी त्यामुळे गावभर हातभट्टीची दारू उपलब्ध असायची. जसा दिवस चढायचा तसा धूळवडीचा रंग चढत असे. रंगाने पूर्णतः माखलेलं शरीर,  फुल्ल रिचार्जमूळ चालण्याच्या अवस्थेत नसलेले गावकऱ्याचा आजचा रंगढंग, चेहऱ्याचे हावभाव जरा वेगळेच असायचे. कधी न पिणाऱ्याला आज आग्रहाणे  पाजल्यामूळ त्यांची खरी पंचायत व्हायची. विशेष म्हणजे आजच्या दिवशी पुरुष-महिला भेदभाव दूर सारून काही ठराविक महिलासुद्धा या 'रंगात' सामील व्हायच्या. त्या काळी महिलांच मद्यप्राशन हे समाजाला मान्य नव्हतं. आता जेंव्हा शहरातील दारूच्या दुकानात महिलांना दारू विकत घेतांना बघतो तेंव्हा असं वाटतं की समाजातील अनेक बंधने, नियम आणि कायदे हे फक्त गरीब आणि मागास जनतेसाठीच तयार करण्यात आले आहेत. शहरात अशा गोष्टीकडे 'मॉडर्न किंवा चेंज' म्हणून बघितल्या जातं! असो. 

गावातील होळी उत्सव साजरा करण्यात बंजारा समाज अग्रेसर असायचा. किंबहुना 'बंजारा समाजामुळेच गावातील होळीला रंग चढायचा' असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.  लेझीम, डफडा, गाणी आणि अंगीच असलेली नृत्यकला यामुळे त्यांना फक्त बहाना हवा असायचा. 'रिचार्ज' झाल्यानंतर सर्वकाही आपोआप घडत जायचं. नाचत नाचत, झुलत झुलत ही मंडळी आमच्यासमोर 'परफॉर्म'  करायची.  आमचे काका कधी बकेटीत कालवलेला रंग तर कधी बकीटभर पाणी नाचणाऱ्या मंडळीवर ओतून दयायचे. अर्थात नंतर आमच्या दादा(वडील) किंवा काकांकडे दारूची मागणी ठरलेली असायची. दारू दिली नाही ते भांडायचे. त्यातही मजा असायची. लवकर मागणीची पुर्तता केली नाही की बंजारा समाजाचं पथक जोरात सुरु व्हायचे -

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

हे अस्सल आणि निखळ मनोरंजन होतं. काही दिखावा नाही की कृत्रिमपणा नाही. लोकं पित असले तरी त्यातही वयोमर्यादा असायची. नशेतही सर्वांचा आदर आणि मानसन्मान राखल्या जायचा. भांडण सुद्धा व्हायची पण गावातच ती मिटविली जायची. 'तशव्या' हा शब्द मी आमच्या वडिलांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकायचो. त्या शब्दाचा अर्थ मी वयस्कर झाल्यानंतर मला कळाला. गावातील मोहनसिंग ठाकूरकाका, बाबुसिंग ठाकूरकाका, हिरामण पटेलकाका,  किसन आमरू राठोडकाका, गनाजी गव्हाळेमामा , सरपंच, पाटील आमचे वडील आणि अशी बरीचशी प्रतिष्टीत मंडळी गावातील भांडण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याआधीच मिटवून टाकत असत. शब्दाला मान तर मोठयाचा सन्मान असायचा. बासंबा सर्कलमध्ये कदाचित पेडगाव हे मोठं गाव असावं.  त्यामुळे जत्रा, पोळा असो की धूळवड, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावात नेहमी पोलीस बंदोबस्त असायचा. किमान एक तरी पोलीस गावात फिरत असे.  शेवटी तो ही माणूसच, बऱ्याचदा धूळवडीच्या रंगात तो सुद्धा 'रंगून' जायचा!

अशीच एक धूळवड मला आठवते. गावात नुकतच विजेचं काम चालू होतं. पेडगावच्या मार्गावर इलेक्ट्रिकचे पोल रोवण्याचं आणि तार ओढण्याचं काम चालू होतं. विजेच्या पोल आणि इतर सामानाच्या रंगरंगोटीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चमचम चमकणारा रंग आणून ठेवला होता. एका धूळवडीमध्ये पारंपारिक रंग फिके पडून गावभर हाच रंगाचा वापर झाला होता. विशेष म्हणजे त्या दिवशी बासंबा पोलीस स्टेशनचे कडक जमादार 'बेग' बंदोबस्तासाठी आले होते.  मला आठवतं, त्यांनी बंदोबस्त प्रकार बाजूला सारून त्यादिवशी पुढाकार घेऊन गावातील सर्व लोकांना चमकीचा रंग लावला होता. दुपार होता होता संपूर्ण गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर ती चमकी दिसत होती. 

कुठे गेले ते दिवस? बदल कायम होतात आणि या पुढेही ते होत राहणार. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण जो निखळ आणि असल आनंद आम्ही खिशात खडकू नसतांनासुद्धा आम्ही आमच्या बालपणी अनुभवला तो आता नाही.   असं म्हणतात,' जसं जशी आर्थिक परिस्थिती संपन्न होत जाते तस तसा तुमचा आनंद महाग होत जातो'. हल्ली गावातून शहरात आलेली श्रीमंत मंडळी या आनंदापासून वंचित आहे. आनंदासाठी ती दूर वरची मोठी ठिकाण ती शोधत असतात. इतर ठिकाणी पर्यटन केल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही.  पण तिथल्या मुंग्यासारख्या गर्दीत त्यांना हवा असलेला आनंद मिळतोच असं नाही! विशेष म्हणजे आता हिच लागन गावाकडील लोकांमध्ये सुद्धा होत आहे. 

आज ती लोकं नाहीत, तो रंग नाही, ती रंगत नाही.  गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी, आठवणी!!


©प्रेमकुमार जैस्वाल (पेडगावकर)