ad1

Thursday, 11 September 2025

' डिजिटल उपवास' शक्य आहे का?

                'डिजिटल उपवास' शक्य आहे का?

'मानव हा सामाजिक प्राणी आहे'  समाज शास्त्राच्या पुस्तकातील पहिल्याचं परिच्छेदमध्ये ही व्याख्या  लिहिलेली असते. ही व्याख्या त्या काळची होती ज्या काळी खरोखरचं मानवा हा समूहात राहत असे. त्याचं जीवन इतरांवर अवलंबुन होतं. आता या व्याख्येत थोडा बदल म्हणजे 'अपडेट' करण्याची वेळ आलेली आहे.  हल्ली मानव हा 'चार्ज रिचार्ज' करुन एकांतात जीवन जगणारा प्राणी झाला आहे.  त्यासोबतच 'एकमेका सहाय करू अवघे धरू सुपंथ' ऐवजी "स्वमग्न डिजिटल युगातं, राहू मजेत एकांतात' हेच संयुक्तीत वाटत आहे. या लेखामध्ये आपण विजेआधीच्या आणि आत्ताच्या युगाविषयीं जाणून घेणार आहोत. 

हल्ली प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा चार्जिंगने होत असतो. मोबाईल चार्जिंग, लॅपटॉप चार्जिंग, पावर बँक चार्जिंग, हेडफोन चार्जिंग, ट्रिमर चार्जिंग, कारवा रेडिओ, स्पीकर चार्जिंग, स्मार्ट वॉच, मोस्कीटो बॅट अशी एक ना एक उपकरनं हे चार्जिंगला लावलेलं असतं. जेंव्हा आपण काहीच करत नसतो तेंव्हा एखादं तरी उपकरण चार्जिंगला जोडून टाकतो. आपल्याला सर्वकाही फुल्ल चार्ज हवं असतं. ज्यांच्याकडे ईव्ही (इलेक्ट्रिक वेहिकल) गाडया आहेत त्या बिचाऱ्यांचा ताप जरा अधिकच असतो.  मधूनच गाडी बंद पडून 'टोईंग' ची नौबत टाळण्यासाठी ते सतत चार्ज करतात. मग आर्थिक गणित बसविण्यासाठी पुढे ते सोलार घेतात.  प्रत्येक घराच्या टेबलावर तीन ते चार चार्जर, केबल पडलेल्या असतात. मोबाईलच्या बॅटरी सिंबलवर रेड खुण येताच तो बंद पडून या विश्वाशी आपलं नात तुटणार अशी भिती निर्माण होते.  यापुढे घरी आलेल्या पाहुण्यांना चहा ऐवजी आस्थेने प्रथम 'चार्जिंग' बद्दल विचारलं तर वावगं ठरणार नाही. 

दुसरा वैताग म्हणजे रिचार्ज.  रिचार्ज हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तो केला नाही जीवन जगणं कठीण होतं.  ऐका कुटुंबात महिन्यातून कमीत कमी सहा ते सात वेगवेगळे रिचार्ज होत असतात.  मोबाईल रिचार्ज, टिव्ही रिचार्ज, वाय-फाय रिचार्ज, ओटीटी रिचार्ज, ओटीटीवर येणाऱ्या जाहिरात थोपविण्यासाठी  वेगळा रिचार्ज.  ऑफिस असेल तर तेथील विविध रिचार्ज. महानगरात गॅस आणि इलेक्ट्रिक मीटर रिचार्ज.  कमाईचा मोठा हिस्सा हा ' रिचार्ज' खाऊन घेतो. आणि त्या शिवाय जीवन जगणं कठीन होत चाललं आहे. डिजिटल युगातील नवीन पिढी चार्ज रिचार्ज शिवाय बेचैन होते. 

नवीन पिढी स्क्रीनशिवाय राहू शकत नाही. तेच त्यांचं विश्व असतं. ऐका रुग्णालयात प्रसूतीनंतर  बाळाला आईपासून दूर अतिदक्षता विभागात ठेवलं जातं. बेडवर झोपलेली आई बाजूला हात फिरवते. दचकून जागी होते, बेचैन होऊन ती बेडवर काही तर शोधत असते.  स्टाफ नर्सला वाटतं ती बाळ शोधत असावी.  तिला ती सांगते  'ताई, घाबरू नका तुमचं बाळ काचेच्या पेटीत सुरक्षित आहे'. त्यावर बाळाची आई स्टाफला विचारते "माझा मोबाईल!"   

पूर्वी कोणत्याही घरी गेला असता एक सर्वसामान्य चित्र असायचं.  घरातील एक दोन महिला ओसरीमध्ये परात किंवा सुपामध्ये दळण, धान्य घेऊन त्या निसत बसलेल्या असायच्या. जेवणात खडा जाऊ नये याची त्यांना काळजी असायची. निसतांना त्यांची बोट सरसर पुढे मागे फिरायची, खडा दिसताच ती वेगळी करायची. दिवसभरात पाच-सात किलो धान्य निवडून त्या मोकळ्या व्हायच्या. आता त्याचं महिलांच्या हातात स्मार्ट मोबाईल दिसत आहे. दळनासाठी पुढे मागे फिरणारी बोट त्याच गतीने मोबाईलवर फिरतांना दिसत आहे. पुरुष मंडळी याबाबतीत मागे नाही.  तरुण मंडळी याही पुढे आहेत. कळपात खाली मान करुन 'गेम खेळणाऱ्या' मुलांचा दिवसाचा २ जीबी डाटा कधी संपून गेला हे कळत सुद्धा नाही.  

आता थोडं मागे जाऊ. तो काळ वीज नसलेला होता.  जास्तीत जास्त जनता अशिक्षित होती. आर्थिक परिस्थिती वाईट होती. संपूर्ण ग्रामीण जीवन एक दुसऱ्यावर अवलंबुन होतं. कुटुंबातील लोकं मजुरी, शेती व्यवसाय किंवा इतर काहींना काही कारणाने घराबाहेर पडलेली असायची. आजच्या सारखी घरात मोबाईलवर  गुंतलेली नव्हती. कुणीही स्वावलंबी नसल्याने कधीही कुणाशी काम पडू शकतं म्हणून गावात सर्वांशी संबंध टिकवून ठेवले जायचे.  मंदिराच्या पारावर,  चावडीवर, ओट्यावर  किंवा रस्त्यावर कुठेही गावातील मंडळी गप्पा ठोकत बसलेली असायची. त्यांच्या निखळ मनोरंजनासाठी कोणत्याही 'चार्ज रिचार्ज' ची गरज नव्हती. मी तेरा वर्षाचा होईपर्यंत गावात वीज नव्हती. १९८३ मध्ये गावात वीज आली. तो दिवाबत्ती आणि रॉकेलचा काळ होता. सकाळी झाडून स्वच्छ केलेलं घर सायंकाळी पुन्हा एकदा स्वच्छ करुन दिवाबत्तीची तयार करावी लागायची. दिवा कंदीलाचे काच स्वच्छ करुन त्याची ज्योत आणि रॉकेल भरलं जायचं. मोजक्याच घरात घड्याळ होतं.  वेळ बघण्याची गरजचं नव्हती.  रात्र झाली झोपले, झाकड(उजेड) झाली उठले.  बऱ्याच लोकांकडचे कोंबडे आरवले की सूर्योदयाचा संकेत मिळत असे. तर कुणी शाळा भरण्याची वेळ, सुटण्याच्या वेळेचा संदर्भ घेऊन वेळ ठरवत. शेतात काम करणारयाच्या वेळा ह्या सूर्याच्या स्थानावर अवलंबुन असायच्या. दिवस कलला की 'पारक' म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ. मावळला की काम बंद व्हायचं. हल्ली सर्व मजुराकडे मोबाईल असतो. बऱ्याचदा हा मोबाईल एक हात गुंतवून ठेवतो. महत्वाच्या कामात 'स्पीड ब्रेकर' चं काम करतो.

थोडक्यात डिजिटल युगात फक्त शहरी नाही तर ग्रामीण जीवनसुद्धा पूर्णतः बदलत चाललं आहे. पूर्वी रस्त्या रस्त्यावर फिरणारी ग्रामस्थ जनता हल्ली घराबाहेर फिरतांना दिसत नाही. त्यामुळे गाव ओस पडल्यासारखी भासत आहेत. स्वावलंबी जनतेची शॉपिंग आता 'ऑनलाईन' होत असते.  स्विगी झोमेटो, बलिंकिट, झेपटोनी गावागावात पोहचून गाव हाय-टेक होत आहेत.  गावात 'कळपात' राहणाऱ्या मंडळीची पावलं आता 'कुलूपात'  बंद शहरी संस्कृतीकडे वळत आहे. शहरी व्यक्ती घरात शिरताच 'खs चाss क' करुन मुख्यदाराचं लॅच बंद करतो. क्षणात जगाशी त्याचा संबंध तुटतो.  मग शेजारच्या बिल्डिंगमध्ये वारलेल्या व्यक्तीची बातमी त्याला 'ऑनलाईन' मिळते. तो लगेच इतरांच्या RIP RIP मध्ये आपला एक RIP लिहून टाकतो. हळू हळू ही असंवेदनशील, भावनारहित संस्कृती गावापर्यंत पोहोचणार हे निश्चित. 

यावर उपाय काय? डिजिटल उपवास! ज्याप्रमाणे अन्न त्याग करुन आपण पचनक्रियेला आराम देतो त्याचं प्रमाणे डिजिटल उपवास करुन तुम्ही मेंदूला थोडं विश्रांती देऊ शकता. थोडा 'स्क्रीन त्याग' करुन बघायचा. आठवड्यातून एक दिवस मोबाईलसारख्या उपकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. चार्जरिचार्ज करणे टाळायचं.  किंवा दिवसातून काही तास मोबाईलविना घालवीण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी स्वतःला एखाद्या छन्दात गुंतवून ठेवने हा सर्वोतम उपाय आहे. 

'व्हॉट गोज अप कम्स डाऊन'. एक वेळ अशी येणार, मोबाईल, एआयमूळे जग डिजिटलच्या विळख्यात सापडेल. हे रोजचं 'चार्ज रिचार्ज' जीवन लोकांना नकोस होईल. मग खऱ्या चार्जिंगसाठी लोकं पुन्हा त्या भूतकाळात जगलेल्या नैसर्गिक जीवनाकडे वळतील. पुन्हा त्या निसर्गाच्या सानिध्यात शिरण्याचा प्रयत्न करतील. पण खरोखरचं असं घडेल का? 

ग़म की अंधेरी रात में दिल को ना बेक़रार कर 
सुबह ज़रूर आयेगी  सुबह का इन्तज़ार कर l 


© प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर 
ह मु. छ. संभाजीनगर, 9822108775