ad1

Monday, 6 April 2026

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

         गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी!

सण-उत्सवाचा निखळ आंनद, मजा ही गावखेड्यात असते, असं म्हंणलं तर वावगं ठरणार नाही. शहरात आपोआपच त्यावर मर्यादा येतात. होळीची गाणी ऐकतांना याची प्रचिती येते. कोणतंही होळीच गाणं हे शहरात चित्रित झालेलं मी तरी बघितलं नाही. किंबहुना 'होळी' खेळायची तर ती गावकऱ्यानीं असं म्हणायला हरकत नाही. कारण शहरी लोकांना अशी 'खुलके होळी' खेळायला 'लुकिंग गूड लुकिंग बॅड'  अशा पुष्कळ मर्यादा असतात. या वरूनच आठवते बालपनीची होळी. 

आमच्या बालपणी पंधरा दिवसापूर्वीच होळीची चाहूल लागायची.  होळीदहनासाठी लाकडं लागायची. वयांनी मोठी आणि थोडी टवाळ मुलं गावातून 'बोंबलत' होळी दहनासाठी चावडीवर लाकडं गोळा करत फिरायची. हल्ली 'बोंब मारने' हा वाक्यप्रचार फक्त पुस्तकात वाचण्यात येतो. मुळात त्याचा उगम किंवा संबंध निश्चितच होळीसी असणार. त्याकाळी आजच्यासारखी गॅस शेगडी प्रकार नव्हता. स्वयंपाकासाठी प्रत्येक घराच्या आवारात गोवऱ्याचा थप्पी आणि फोडलेली लाकडं असायची. कित्येकांच्या घरासमोर एखादं मोठं लाकडाचं खोड असायचं. तसं आमच्याही आवारात खूप लाकडं ठेवलेली असायची. गावभर लाकडासाठी बोंबा मारत फिरणाऱ्या अशा टोळक्याच्या तोंडी खूपच अश्लील वाक्य असायची.  पण गावखेड्याच्या बोलाचालीत त्या 'शिव्या' कायम असायच्या. बऱ्याचदा अशा बोंबलनाऱ्या टोळीच्या मागे मागे आम्ही सुद्धा फिरायचो.  प्रत्येक घरातून हक्कानी लाकडं किंवा गवऱ्या घेतल्या जायच्या. मनाई करणाऱ्याच्या घरासमोर जोर जोरात बोंबा मारल्या जायच्या. मागून मिळत नसेल तर रात्रीत ती आवरातून चोरीने लाकडं पळविली जायची. मग या भितीने बऱ्याचदा लाकडं घरात आणून ठेवली जायची. अशा वेळेस एखाद्याच्या वखर नागराचं किंवा बैलगाडीच्या कामाची लाकडी सामान सरळ होळीत नेल्याचे प्रकार घडायचे. पण त्यामुळे कुठे ही भांडण तंटा झालेला मला आठवत नाही. 

प्रतिष्टीत व्यक्तींच्या समक्ष होळीपूजन आणि दहन व्हायचं. का? माहित नाही पण आमच्या काळी होळीला सुद्धा फटाके फोडले जायचे. सायंकाळी पेटविलेली होळीचा निखारा दुसऱ्या दिवशीपर्यंत असायचा. त्या होळीच्या राखेला खूप महत्व होतं. आमच्या छ संभाजीनगरमध्ये मी कारल्याच्या बिया लावत असतांना आमच्या आईने 'त्या बियाला होळीच्या राखेसोबत लावायचं असतं' असं सांगितलं होतं. बऱ्याचशा आजारासाठी होळीची राख जतन करुन ठेवल्या जायची. हल्ली शहरात होळीनिमित्त साखरेच्या गाठी विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. पण पूर्वी ह्या गाठी खोब्रा, खजूर आणि इतर मेव्यापासून तयार केलेल्या असायच्या. बताशाच्या गोड गाठी हल्ली दिसत नाही. बताश्याच्या गोड गाठीची हार गळ्यात घालून आम्ही ती खात खात खेळायचो.  आता सर्वत्र 'गोड म्हणजे विष' असा अपप्रसार सुरु आहे. होळी म्हणजेच पुरणपोळी हे समीकरण आहे. गावभर ही पुरणपोळीच जेवण व्हायचं.   डायबेटीस किंवा मधुमेह हा शब्द आम्ही ऐकला नव्हता. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी हा शब्द प्रथम ऐकला होता. त्यामुळे एका बैठकीत 'तेरा पुरणपोळ्या' किंवा 'किलोभर बुंदी' फस्त करणाऱ्या बहादरांनासुद्धा 'डायबेटीस' झालेला मी पाहिला नाही!

आम्हाला वेध दुसऱ्या दिवशीच्या धुळवडीचे लागलेले असायचे.  कृत्रिम रंगाचा इतिहास खूप अलीकडंचा. पण हजारो वर्षापासून महत्व असलेल्या होळीसाठीचे रंग मग कुठून यायचे? आमच्या बालपणी होळीच्या काही दिवस आधी आम्ही पळसाच्या लाल फुलापासून रंग तयार करायचो. शेतरानात ही फुलं सहज उपलब्ध व्हायची. भर उन्हात रानाला शोभून दिसणारी ती पळसाची टवटवीत फुलं आम्ही दगडावर वाटून तिच्यापासून रंग तयार करण्याचे प्रयोग आम्ही करायचो. पण शेवटी तो एक असफल प्रयत्न असायच. कारण पाहिजे तसा पक्का रंग त्या फुलापासून तयार होत नसे. 

पूर्वी आमच्या घरी किराणा दुकान होतं. होळी धूळवडीसाठी लहानमोठ्या पिचकाऱ्या आणि रंग विकले जायचे. लहाणाला लहान आणि मोठ्यांना मोठी पिचकारी त्यामुळे आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे असे विचार येत. अगदी बालपणी पिचकारी एकचं प्रकारची असायची. त्याचं प्लास्टिक अगदी तकलादु असायचं तिचं काम क्षणिक असायचं. काही तासात ती क्रॅक व्हायची. कालांतराने फुग्यात रंग भरून मारण्याचा प्रकार सुरु झाला. पण पाण्याची सोयीस्कर होळी तेंव्हा ही होती आणि आजही ती कायम आहे. 

पण गावातील होळीचा खरा रंग गावातील मंडळी 'पूर्णतः रिचार्ज' झाल्यानंतर दिसायचा. होळीसाठी गावकरी आधीपासूनच दारूचा 'इंतजाम' करुन ठेवत. सर्वांना देशी दारू कदाचित परवडत नसावी त्यामुळे गावभर हातभट्टीची दारू उपलब्ध असायची. जसा दिवस चढायचा तसा धूळवडीचा रंग चढत असे. रंगाने पूर्णतः माखलेलं शरीर,  फुल्ल रिचार्जमूळ चालण्याच्या अवस्थेत नसलेले गावकऱ्याचा आजचा रंगढंग, चेहऱ्याचे हावभाव जरा वेगळेच असायचे. कधी न पिणाऱ्याला आज आग्रहाणे  पाजल्यामूळ त्यांची खरी पंचायत व्हायची. विशेष म्हणजे आजच्या दिवशी पुरुष-महिला भेदभाव दूर सारून काही ठराविक महिलासुद्धा या 'रंगात' सामील व्हायच्या. त्या काळी महिलांच मद्यप्राशन हे समाजाला मान्य नव्हतं. आता जेंव्हा शहरातील दारूच्या दुकानात महिलांना दारू विकत घेतांना बघतो तेंव्हा असं वाटतं की समाजातील अनेक बंधने, नियम आणि कायदे हे फक्त गरीब आणि मागास जनतेसाठीच तयार करण्यात आले आहेत. शहरात अशा गोष्टीकडे 'मॉडर्न किंवा चेंज' म्हणून बघितल्या जातं! असो. 

गावातील होळी उत्सव साजरा करण्यात बंजारा समाज अग्रेसर असायचा. किंबहुना 'बंजारा समाजामुळेच गावातील होळीला रंग चढायचा' असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.  लेझीम, डफडा, गाणी आणि अंगीच असलेली नृत्यकला यामुळे त्यांना फक्त बहाना हवा असायचा. 'रिचार्ज' झाल्यानंतर सर्वकाही आपोआप घडत जायचं. नाचत नाचत, झुलत झुलत ही मंडळी आमच्यासमोर 'परफॉर्म'  करायची.  आमचे काका कधी बकेटीत कालवलेला रंग तर कधी बकीटभर पाणी नाचणाऱ्या मंडळीवर ओतून दयायचे. अर्थात नंतर आमच्या दादा(वडील) किंवा काकांकडे दारूची मागणी ठरलेली असायची. दारू दिली नाही ते भांडायचे. त्यातही मजा असायची. लवकर मागणीची पुर्तता केली नाही की बंजारा समाजाचं पथक जोरात सुरु व्हायचे -

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

हे अस्सल आणि निखळ मनोरंजन होतं. काही दिखावा नाही की कृत्रिमपणा नाही. लोकं पित असले तरी त्यातही वयोमर्यादा असायची. नशेतही सर्वांचा आदर आणि मानसन्मान राखल्या जायचा. भांडण सुद्धा व्हायची पण गावातच ती मिटविली जायची. 'तशव्या' हा शब्द मी आमच्या वडिलांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकायचो. त्या शब्दाचा अर्थ मी वयस्कर झाल्यानंतर मला कळाला. गावातील मोहनसिंग ठाकूरकाका, बाबुसिंग ठाकूरकाका, हिरामण पटेलकाका,  किसन आमरू राठोडकाका, गनाजी गव्हाळेमामा , सरपंच, पाटील आमचे वडील आणि अशी बरीचशी प्रतिष्टीत मंडळी गावातील भांडण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याआधीच मिटवून टाकत असत. शब्दाला मान तर मोठयाचा सन्मान असायचा. बासंबा सर्कलमध्ये कदाचित पेडगाव हे मोठं गाव असावं.  त्यामुळे जत्रा, पोळा असो की धूळवड, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावात नेहमी पोलीस बंदोबस्त असायचा. किमान एक तरी पोलीस गावात फिरत असे.  शेवटी तो ही माणूसच, बऱ्याचदा धूळवडीच्या रंगात तो सुद्धा 'रंगून' जायचा!

अशीच एक धूळवड मला आठवते. गावात नुकतच विजेचं काम चालू होतं. पेडगावच्या मार्गावर इलेक्ट्रिकचे पोल रोवण्याचं आणि तार ओढण्याचं काम चालू होतं. विजेच्या पोल आणि इतर सामानाच्या रंगरंगोटीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चमचम चमकणारा रंग आणून ठेवला होता. एका धूळवडीमध्ये पारंपारिक रंग फिके पडून गावभर हाच रंगाचा वापर झाला होता. विशेष म्हणजे त्या दिवशी बासंबा पोलीस स्टेशनचे कडक जमादार 'बेग' बंदोबस्तासाठी आले होते.  मला आठवतं, त्यांनी बंदोबस्त प्रकार बाजूला सारून त्यादिवशी पुढाकार घेऊन गावातील सर्व लोकांना चमकीचा रंग लावला होता. दुपार होता होता संपूर्ण गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर ती चमकी दिसत होती. 

कुठे गेले ते दिवस? बदल कायम होतात आणि या पुढेही ते होत राहणार. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण जो निखळ आणि असल आनंद आम्ही खिशात खडकू नसतांनासुद्धा आम्ही आमच्या बालपणी अनुभवला तो आता नाही.   असं म्हणतात,' जसं जशी आर्थिक परिस्थिती संपन्न होत जाते तस तसा तुमचा आनंद महाग होत जातो'. हल्ली गावातून शहरात आलेली श्रीमंत मंडळी या आनंदापासून वंचित आहे. आनंदासाठी ती दूर वरची मोठी ठिकाण ती शोधत असतात. इतर ठिकाणी पर्यटन केल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही.  पण तिथल्या मुंग्यासारख्या गर्दीत त्यांना हवा असलेला आनंद मिळतोच असं नाही! विशेष म्हणजे आता हिच लागन गावाकडील लोकांमध्ये सुद्धा होत आहे. 

आज ती लोकं नाहीत, तो रंग नाही, ती रंगत नाही.  गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी, आठवणी!!


©प्रेमकुमार जैस्वाल (पेडगावकर)

No comments:

Post a Comment