पर्यटन हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. जग जाणून घेण्यासाठी पर्यटनाशिवाय पर्याय नाही. पूर्वी वृद्ध अवस्थेत गेलेली व्यक्ती हिमालय प्रवासासाठी जायची. असे म्हणतात, संपूर्ण आयुष्य चढउत्ताराशी सामना करत जीवन जगलेली लोकं शेवटी कौटुंबिक कटकटीपासून मुक्त होउन मानसिक समाधानासाठी हिमालय गाठत. आजही बोलाचालीत आपण ‘एकदा का हे झालं की जातो मी हिमालयाला’ अशी म्हण ऐकावयास मिळते. कालांतराने परिस्थिती बदलली. समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने हल्ली बरीच मंडली वर्षातून एकदा का होईना पर्यटननिम्मातेने घराबाहेर पडतात. पर्यटनाचे अनेक कारणे असू शकतात. काही देव देव करण्यासाठी, कुणी एतिहासिक स्थळ बघण्यासाठी, कुणी गडकिल्ले बघण्यासाठी तर कुणी दुसऱ्या ठिकाणाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन करत असतात. हल्ली गुगुल चाटजीपीटीमुळे सर्व नियोजित ठिकाणाची माहिती काही क्लिकवर उपलब्ध असते. हल्ली ओनलाईन टूर गाईड, हॉटेल बुकिंग आणि सर्वच गोष्टीच सहज नियोजन होत असल्यामुळे पर्यटन करणे अगदी सोपं झालं आहे. सततच्या कटकटीतून काही दिवस दूर होवून मुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनशिवाय दुसरा पर्याय नाही.
बऱ्याच गोष्टीला योग जुळून यावा लागतो. असाच योग कलकत्ता फिरण्याचा सहज चालून आला. निमित्त होतं मुलाच्या पदवीदान समारंभाचा. एकेकाळी देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या या शहराबद्दल बरंच वाचून होतो. पण कधी फिरण्याचा योग येईल असं कधी वाटलं नाही. पश्चिम बंगाल प्रांतात कम्युनिस्ट पक्षाचं सरकार तर केंद्रात बीजेपीचं सरकार त्यामुळे समाज माध्यमात कोलकत्ताबद्दल बराच द्वेष मी वाचून होतो. अर्थात केंद्रीय शासनाची सुपारी घेतल्याप्रमाणे गोदी मिडिया कोलकत्ताबद्दल सतत दुष्प्रचार करत आला आहे. प्रत्यक्ष कोलकत्ता शहर आणि येथील परिस्थिती बघून ‘दुध का दुध आणि पाणी का पाणी’ होणारा होतं. बऱ्याच वर्षापूर्वी काश्मीरबद्दल पाच पुस्तकं वाचल्यानंतर मी स्वत: काश्मीर फिरून आलो. तेथील लोकांशी सवांद साधला. फक्त गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम असे अतिसुंदर प्रसिद्ध पर्यटन स्थळ न फिरता चक्क तेथील एका गावात जाऊन लोकांशी संवाद साधला. त्यामुळे काश्मीर विषयी बरेच गैरसमज दूर झाले. काश्मीरकडे आणि फेक मिडियाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोण बदलला. प्रत्यक्ष परिस्थितीत आणि व्हाटस्प विद्यापीठाच्या माहितीत किती फरक आहे हे कळाल. समाज माध्यमातील फेक पोस्ट किती हानिकारक आहे हे कळालं. शिवाय दरबारी लेखक स्वताच्या स्वामीला खुश करण्यासाठी कोणत्या स्ताराला जाऊ शकतात, कसा दुष्प्रचार करू शकतात, हे सुद्धा माहित पडलं.
मुंबई कोलकत्ता हवाई प्रवासात आपण ‘बाबूमोशाय’ प्रांतात चाललोय याची चाहूल लागली. एअरपोर्ट डिपारचर गेटजवळ बाजूच्या सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांच ‘बोंगाली’ भाषेतील संवाद मी एकत होतो. बंगाली भाषा समजण्यासाठी अगदी सोपी. त्यातील किमान तीस टक्के शब्द मराठी भाषेतील असतात. कोठाय, भीषण , खूप, जोल हे मराठीसारखेच. फरक एवढाच की प्रत्येक शब्दाला ओ जोडायचा असतो. अमित च्या जागी ओमित आणि गणेशच्या जागी गोनेश. बस्स एवढाच फरक. तेव्हड्यात एक व्यक्ती काळ्या पठाणी झबल्यामध्ये झापझाप माझ्या समोरून चालत गेला. कुणी तरी व्हीआयपी सारखा तो वाटला. सोबत त्यांचं लगेज घेवून इंडिगोचे अधिकारी होते. त्यावरून निश्चितच तो व्हीआयपी असणार याचा अंदाज आला. नंतर कळालं तो क्रिकेटर युसुफ पठाण होता. त्याला आमच्यासोबत न बसवता ईन्डीगो अधिकारी दुसरीकडे घेवून गेले. मला तो फालतूपणा आवडला नाही. पण असो. अर्थात विमानात तो बिजनेस क्लासमध्ये आणि मी इकोनोमी क्लासमध्ये. प्रवासात कोणत्या दर्जाचे प्रवासी प्रवास करत आहेत यावरून डेस्टिनच्या ठिकाणाचा अंदाज आपण बांधु शकतो. हवाई प्रवासात बरेच सूटबुटातील प्रवासी होते. बहुदा ते कॉर्पोरेट क्षेत्राचे उच्च पद्द्स्त अधिकारी असावेत.
दोन तासाची फ्लाईट लँड झाल्यानंतर लगेज घेवून मी बाहेर आलो. एअरपोर्टच्या बाहेर पडताच माझी नजर इकडे तिकडे फिरत होती. हे नवीन शहर कसं वेगळ आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. असं म्हणतात की आपण डोळे उघडे ठेवून या जगाकडे बघितलं तर आपल्याला बरच काही शिकायला मिळतं. भारत देशात कोणत्याही एअरपोर्टच्या बाहेर जा, रिक्षावाले, भाड्याच्या कारवाले तुमच्या सेवेत हजर असतात. आपली फसवणूक होऊ नये म्हणून मी आधीच ओला बुक केली होती. ओलाशी संबंधित गाड्या ह्या तुलनेने स्वच्छ असतात असा माझा समज होता. पण तो समज येथे चुकीचा निघाला. गाडी बरीच अस्वछ होती. खाकी युनिफोर्म नेसलेला चालकसुद्धा अस्वछ आणि त्याने तोंडात पान कोंबलेला होता. पान खात खात तो माझ्याशी संवाद करत होता, ‘किधोर जाना है?’. मधूनच तो खिडकीतून पचकन थूकत होता. आम्ही दोघे हिंदी या समान भाषेत बोलत होतो. दोन किलोमीटर गाडी चालवताच त्याने मला खुणवत गाडी उभी करतोय म्हणून सांगितलं. मला काही कळण्याआधी तो पटकन बाजूला जाऊन लघवी करून आला. मी या सर्व गोष्टीच निरीक्षण करत होतो. विचार केला की याला महाशयाला लघवी करायची होती तर तो एअरपोर्टवर का गेला नाही? पान खाऊन बाहेर थुंकणे हे येथे एव्हढ सामान्य आहे. काही वेळात त्याने मला सोल्टलेक परिसरातील आयआयटी खडकपूरच्या होस्टेलवर आणून सोडलं.
आयआयटी खडकपूर येथून साधारण १०० किमी दूर आहे. कोलकत्ता येथे सर्व सुविधा असल्यामुळे आयआयटीने येथे एक छोटसं होस्टेल ठेवल आहे. व्हिजिटिंग प्रोफेसर किंवा बाहेर देशातून येणार व्हिजिटर, विध्यार्थ्याना इलाजासाठी, मुकामासाठी या होस्टेलचा उपयोग होतो. शिवाय विध्यार्थीनचे पालक या ठिकाणी थांबू शकतात. तसं माझं काम आयआयएम कोलकत्ता येथे होतं. पण ते ठिकाण खूपच दूर असल्याने मी आयआयटी विध्यार्थ्यांचा नातलग म्हणून येथे थांबनार होतो.
होस्टेलवर फ्रेश होताच मी शहर फिरून घेण्यासाठी बाहेर पडलो. संध्याकाळचे साडे पाच वाजले होते. मुद्दामहून भाड्याची कार न घेता मी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याच ठरवलं. मुंबईत मी शेकडो वेळेस बस, डबलडेकर बसने प्रवास केला होता. कोलकत्ता शहर मला बरचं मुंबईसारखं वाटलं. थोडी गरीब मुंबई. बसमध्ये चढताच मला जागा मिळाली. बसचा कंडकटर तिकीट फाडत अगदी पुढे गेलेला होता. पाठीमागे प्रवासी चढताच तो मागे आला. त्याच्या डाव्या हाताच्या बोटामध्ये वेगवेगळ्या चलनी नोटा खूपसलेल्या होत्या. चिल्लर मात्र खिशात होती. सांगितलेल्या ठिकाणासाठी त्याने रु १३/- देण्यास सांगितले. एक छोटसं बोटाएव्हड रुंद चिरकुट तिकीट त्याने माझ्या हातात दिलं. कदाचित जास्त पेपर वापरून वृक्षतोड नको यासाठी तिकिटाचा आकार लहान केलेला असावा. तिकीट काढल्यानंतर मला कळलं की माझा स्टोप बराच पुढ आहे आणि मी त्या अलीकडच्या स्टोपचं तिकीट काढलं. त्यावर बाजूचा प्रवासी म्हणाला सर गरज नाही. . तेरा रुपयात तुम्ही त्याही पुढे प्रवास करू शकता. मला खूपच आश्चर्य वाटलं. स्टोप येताच ड्रायवरने आहे त्याचं लेनमध्ये बस थांबविली. त्याने बस रस्तेच्या कडेला सुद्धा घेतली नाही, हे विशेष. उतरणारे भरभर खाली उतरले. मीही त्यात शामिल झालो. बाहेर पडताच मी कोलकोत्याच्या मार्केटकडे बघत होतो. आपल्याकडे कोणतीही वस्तू घ्या, किंवा भाजीसुद्धा त्याची किमत पाचच्या पटीणे असते. मेथीची जुडी स्वस्त असेल तर पाचला, किमत वाढली तर सरळ दहा किंवा पुढे पंधरा होते. येथे मात्र तिकीट तेरा रुपये, चहा सहा रुपये असे प्रकार मी बघितले. मार्केटमधील वस्तू सुद्धा आपल्या तुलनेने बरयाच स्वस्थ होत्या. दोनशे रुपयात मी पोट भर सुकी फिश खाली. त्यासाठी इकडे मला किमान पाच-सहाशे रुपये मोजावे लागले असते. कपड्यांची आणि जीवन उपयोगी बऱ्याच वस्तूंची छोटी छोटी दुकाने मी येथे पाहिली आणि त्याचे भाव जाणून घेतले.
मार्केटच्या थोडे पुढे जाताच त्या ठिकाणी युवा वर्गाची प्रचंड गर्दी दिसली. क्रिकेट युनिफोर्ममधेय हजारो युवकांचे टोळके इकडे तिकडे भटकत होते. सगळीकडे गोंगाट होता. कित्येकांनी आपल्या तोंडावर हातावर भारत देशाचा तिरंगा रंगविला होता. फुटपाथवर अति कमी किमतीत टी शर्टसं विकले जात होते. त्यावर देशाच्या झेंड्याचे चिन्ह होते. विचारल्यानंतर कळालं की येथे बाजूलाच इडन गार्डन स्टेडियम आहे. आणि तिथे ‘डे अंड नाईट’ क्रिकेटचा सामना चालू आहे. सर्वत्र गोंगाट होता. त्यामुळेच मुंबई – कोलकत्ता प्रवासात मला विमानात युसुफ पठाण दिसला होता. कदाचित तो हा सामना बघण्यासाठी किंवा कॉमेंट्री करण्यासाठी आला असावा. आता मी थकलो होतो. भाड्याची कार घेवून मी परत होस्टेला परत आलो. इडन गार्डन ते माझं होस्टेल बरच लांब होतं. पण ठरविलेलं भाड बरच कमी होतं. कारच्या चालकाशी मी सतत प्रश्न विचारत होतो. त्यामुळे माझ्या ज्ञानात बरीच भर पडत होती. तुम्ही एका दिवसात साधारण किती कमावता? घर कसं चालतं? त्यांच्या म्हणण्यानुसार कोलकत्तासारख्या मेट्रो शहरात फक्त अठरा रुपयात एका व्यक्तीचं पोट भरतं. कसे तर मासे आणि भात खाऊन. दिवसात शंभर दीडशे जरी मिळाले तरी आम्हाला खूप होतात. तेव्हड्यात कुटुंबाच धकून जातं, असं तो म्हणाला. बिहार प्रांत या ठिकाणापासून जवळ त्यामुळे मुंबई प्रमाणे कोलकतामध्ये बरेच कार चालक हे बिहारी दिसले. येथिल स्वस्ताई बघून आपण मुंबई, पुणे आणि कोलकत्ता शहराची तुलना करून शकतो.
होस्टेलवर पोहोचताच तेथील सेवकानी उद्या ब्रेकफास्टमध्ये आपण काय खाणार? हे आधीच विचारून ठेवलं. दुसऱ्या दिवशी वीस रुपयात भरपूर पोहे, दोन अंडी आणि एक केळ वाढण्यात आलं. त्यासोबत चहासुद्धा. यापेक्षा स्वस्थ अजून काय असू शकतं. ‘दाढीसाठी येथे जवळ सलून आहे का?’ यावर त्या सेवकाने डावीकडे थोड्या अंतरावर एक झाड आहे. तेथे एक सलूनवाला खुर्ची लावतो तेथे तुम्ही दाढी करू शकता. दहा वाजता तो न्हावी हजर झाला. त्याने वीस सुपयात दाढी आणि लगेच थोडी मसाजसुद्धा. येतांना मी एका चौकात थांबलो. येथे चौकाला आयलंड म्हणतात. थोड्या वेळात पांढरया साड्या नेसलेल्या दोन जेष्ठ महिला आल्या. त्यांच्याकडे वृतपत्र होती आणि सोबत एक डिंकाचा डब्बा घेतलेला सहकारी होता. त्या चौकात एक मोठा लोखंडी स्टेन्ड होता. त्यावर त्यांनी डिंक लावून त्यावर लगेच वृतपत्राची पान चिपकिवली आणि ते निघून गेलेत. आजूबाजूच्या लोकांनी लगेच ते चिपकिवलेलं वृतपत्र वाचायला सुरुवात केली. मला ती कल्पना खूपच आवडली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकाना वृतपत्र विकत घेण्याचा खर्च वाचला. शिवाय रहदारीची जनता चालता चालता ते वृतपत्र वाचू शकता.
दुसऱ्या दिवशी मुलासोबत मी विक्टोरिया मेमोरियल बघून घेतला. इंग्र्जानी भारतात इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापना कोलकत्ता येथेच केली. त्यांच्या पावूनखुणा येथे स्पष्ट दिसतात. विक्टोरिया मेमोरियल येथे लॉर्ड कर्झनचा भव्य पुतळा आहे. येथील वास्तूचा नमुना बघून पूर्वी येथे इंग्रजांनी राज केल आहे हे स्पष्ट जाणवतं. रस्त्यावर फिरतांना इंग्रजांच्या काळातील जुन्या बऱ्याच इमारती येथे दिसतात. हे शहर बरचसं मुंबईसारख भासतं. रस्त्याची रचनासुद्धा मुंबईसारखीच आहे. एकेकाळी अख्ख बॉलीवूडचं केंद्र कोलकत्ता होतं. त्यामुळेच जुन्या चित्रपटात सर्व कथामध्ये कोलकत्ता शहराची झलक बघायला मिळते. या ठिकाणचं विशेष म्हणजे – अम्बेसेडर कार. आपल्याकडे हिंदुस्तान कंपनीची अम्बेसेडर कार बघायला मिळत नाही. सर्व इतिहास जमा झालेल्या आहेत. क्वचित वर्षातून एखादी दिसते. कारण ते तंत्रज्ञान खूपच जून झालं आहे. सगळीकडे एआय, इंटरनेटनी सज्ज कार उपलब्ध आहे. मॉडर्न कारमध्ये नवीन नवीन फिचर उपलब्ध आहेत. पण कोलकत्ता येथे आजही ही पिवळ्या रंगाची अम्बेसेडर कार रस्त्यावर बिनधास्त फिरतांना दिसते. या कारची संख्या खूपच जास्त असल्यामुळे कदाचित इतर कंपन्या त्यांना सुटे भाग तयार करून देत असतील कारण ह्या कारच उत्पादन कधीच थांबलेलं आहे. काही दिवसापूर्वी अम्बेसेडर कार नवीन रुपात पुन्हा अवतरणार आहे असं मी कुठ तरी वाचल्यासारखं आठवतं. असो.
कोलकत्ता येथील ट्रामबद्दल मी बरचं आयकून होतो पण त्यामध्ये बसण्याचा योग आला नाही. आदल्या रात्री मी या ट्रामबद्दल विचारला असता ठराविक मार्गावर ठराविक वेळी ती चालते असं ऐकल. पण त्या ट्रामचे लोखंडी ट्रेक मला बऱ्याच जागी दिसल्या.
विक्टोरिया मेमोरियल बघून नंतर आम्ही ‘सायन्स सिटी’ बघण्यासाठी गेलो. विज्ञान तंत्रज्ञान जाणून घेणाऱ्याना कोलकत्ता येथील सायन्स सिटी नक्कीच आवडेल. भारतीय अंतरीक्ष प्रवास, प्रकाशाचा परावर्तन, लोंगीट्युडीनल वेव, ट्रान्सवर्स वेव सारखे शेकडो वैज्ञानिक प्रयोगाचा येथे उलगडा करून दाखविला आहे. वोल्व्हकॅनो कसा तयार होतो इत्यादी. तीन तास येथील विज्ञानाचे प्रयोग बघून मी परत होस्टेलला परतलो. कोलकत्त्यामध्ये फिरतांना १९९० च्या मुंबईत फिरल्यासारखा भास होतो. दक्षिण मुंबईसारखे येथील रस्ते, रस्त्याच्या कडेच्या उंचच उंच इमारती. त्याचं आर्किटेकचर हे बरच मुंबईसारख वाटत. एवढचं नाही तर येथील वातावरणसुद्धा मुंबईसारख दमट वाटलं. फक्त फरक एवढाच की येथे मुंबईसारखी गर्दी आणि धावपळ करत फिरणारी जनता मात्र दिसत नाही.
आपल्याकडे हल्ली ब्रिज तयार होतात आणि उद्घाटनापूर्वी किंवा काही दिवसांनी ते पडतात. अर्थात त्यात चूक ब्रिज तयार करणाऱ्यांची नसते. हल्ली धरतीतून निघणार खनिज मटेरियल, वाळू, सिमेंटचा दर्जा बरोबर नसावा, असो. पण शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेला हावरा ब्रिज आजही दिमाखात उभा आहे. या लोखंडी पुलाबद्दल मी बरच वाचलं होत. किती तरी लिखाणामध्ये मी या ब्रिजचा उलेख केलेला आहे. त्यामुळे सरळ होस्टेलला जाता टक्सी चालकाला गाडी हावरा ब्रिजवरून घेण्यास सांगितली. या ब्रिज लोखंडाचा. खरं तर सतत वाहणाऱ्या हुगळी नदीच्या पाण्यामुळे लोखंड गंजून या ब्रिजचं नुकसान व्हायला पाहिजे होतं पण आजही तो ब्रिज शाबूत आहे आणि सतत त्यावरून वाहतूक होत असते. कोलकत्ता आणि हावरा या दोन शहराला जोडण्यासाठी इंग्रजांनी हा पूल तयार केला होता. या पुलाची विशेषता अशी हा पूल उभा करण्यासाठी कोणत्याही नट किंवा बोल्ट वापरल्या गेलं नाही. सर्व जोडण्या ह्या रिबीट लावून केलेल्या आहेत. वर्ष १८७१ मध्ये इंग्रजांनी हा पूल तयार करण्याचा कायदा तयार केला. हा पूलचं डिजाइन सर ब्रेडफोर्ड लेस्ली या इंग्रज डिजाईनर केलं होत. हा पूल १५२८ फुट लांब आणि रुंदीला ६२ फुट आहे. १९०६ मध्ये हावडा स्टेशन तयार झाल्यानंतर आधीचा पूल तात्पुर्त्ता ब्रिजच्या जागी न्विईन मोठा पूल तयार करण्यात आला. दुसरी विशेष बाब अशी की या पुलासाठी लागणार लोखंड प्रसिद्ध उद्योगपती टाटा यांनी पुरवलं होतं. तब्बल २५ कोटी खर्च करून तयार झालेल्या हावडा ब्रिजचं काम १९४२ मध्ये पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी सज्ज झाला. सन १९६५ या ब्रिजला रविंद सेतू असं नाव देण्यात आलं पण आजही तो हावरा ब्रिज नावानेच ओळखला जातो. हा ब्रिज एव्हढा प्रसिद्ध आहे कि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या नावानी एक चित्रपट सुद्धा आहे.
माझा एक अत्येंत जवळचा मित्र नितीन राठी, माझा कॉलेज ज्युनियर सध्या कोलकत्ता येथे स्थायिक झाला आहे. बरीच वर्ष कोलकत्त्यामध्ये काढल्यामुळे तो अस्खल बंगाली भाषा बोलतो. करियरच्या सुरुवातीची बरीच वर्ष त्यांने मुंबईला काढली. मार्केटीगमध्ये असल्यामुळे तो सतत फिरतीवर असायचा. त्यामुळे ‘जीवाची मुंबई’ काय असते हे त्याने चांगल अनुभवल होतं. नोकरी बदलताना त्याला कोलकत्ता हेड ऑफिस मिळालं आणि तो तिथे जो रुळला तो कायमचाच. आता त्याला मुंबई नकोशी वाटत्ते. कारण विचारलं तर त्याचं म्हणन पडतं – ज्या लक्झुरुयीस फ्लट मध्ये मी राहतो तसा मुंबईला घ्यायचा झाल्यास मला चार करोड रुपये खर्च करावे लागतील. आणि तो फ्लटसुद्धा मुंबईपासून जवळ नसणार. मग कशाला उगीच जीवाची मुंबई करायची. हवाई प्रवासाने कोलकत्ता ते नागपूर फक्त दोन तास लागतात. मला त्याचं म्हणन पटलं. मी सुद्धा एक दोन नाही तर तब्बल साडे सहा वर्ष जीवाची मुंबई करून घेतली आहे.
उन्हाचा त्रास टाळण्यासाठी जेव्हड जमेल तेव्हडा कोलकत्ता मी एक्सप्लोर केला. दिवसा कमी आणि रात्री जास्त फिरलो. कोलकत्ता येथील रोसगुल्ला जरा जास्तच प्रसिद्ध आहे. जागोजागी असलेल्या मिठाइच्या दुकानात रोसगुल्ला, सोन्देश, कलाकन प्रसिद्ध आहे. हे तिन्ही मिष्टान दुधाला फोडूनचं तयार केलेले असतात. आपल्याकडे हा प्रकार तेव्हडा प्रसिद्ध नाही. संध्याकाळी आयआयएम कोलकत्ता येथे पदवीदान समारंभला मला उपस्थित व्हायचे होते. दुपारी चारलाच मी नियोजित ठिकाणी पोहचलो. मुलाच्या निमित्ताने का होईना आयआयएमसारख्या देशाच्या उच्च संस्थेचा पदवीदान सोहळा कसा पार पडतो हे मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहू शकलो. देशभरातील पालक मंडली या अद्भुत सोहळ्याला जातीने हजर होती. बऱ्याच सभागृहात फिरतांना आणि भोजन करतांना बऱ्याच विध्यार्थ्यांच्या पालकाशी मी संवाद साधला. योग असा की मी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे माझ्या शेजारी बसलेलं कुटुंब हे जैस्वाल निघालं. रात्री परत होस्टेल गाठलं.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. दर दोन तीनशे किलोमीटरवर येथील संस्कृती बदलते. संस्कृती म्हणट की त्यात राहणीमानासह खानपान आलच. कोलकत्त्याच्या खानपान विषयी सांगायचं झाल्यास येथे सर्व मांसाहारी व्यंजनामध्ये मांसासोबतच बटाटा म्हणजे आलू असतोच. होस्टेलच्या जेवणात तसेच आयआयएम कोलकत्त्याच्या मांसाहारी डिशमध्ये मला बटाटा दिसलाच. हा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता. देशात कोणत्याही राज्यात फिरण्यासाठी गेलो असता तेथील प्रेक्षनिय, एतेहासिक आणि अध्यात्मिक स्थळाऐवजी तेथील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बघण्यात मला जास्त आनंद होतो. एकंदरीत कोलकत्ता शहर इतर शहराच्या तुलनेत मला खूपच स्वस्त वाटलं. राहण्यासाठी, फिरण्यासाठी, खाण्यासाठी हे शहर मला जास्त खर्चिक वाटलं नाही. परंतु प्रसारमाध्यमातील भाटांनी या राज्य आणि शहराविषयी अपप्रचार करून या शहराची प्रतिमा मलीन करण्याची कोणतीही कसर सोडली नाही हे निश्चित. अर्थात त्यामागे राजकीय पक्षाचा स्वार्थ आहेच.
© प्रेमकुमार जैस्वाल, पेडगावकर
ह. मू. छ संभाजीनगर, 9822108775
----------------------------
No comments:
Post a Comment