ad1

Sunday, 29 December 2024

कल चाचणी का करावी?

                     कल चाचणी का करावी? 

प्रत्येक विध्यार्थी हा युनिक व परिपूर्ण असतो.  कोणत्याच बाबतीत तो कमी नसतो. सर्व विध्यार्थ्यामध्ये उपजतच काही विशेष कला गुण असतात. एक विध्यार्थी गणितामध्ये तर दुसरा विज्ञानामध्ये तर तिसरा कलेमध्ये पुढे असतो. काहींना वाणिज्य शिकून  उद्योग-व्यापाराचं क्षेत्र पादाक्रांत करायचं असतं तर काहींना आकाशातील विमान 'पायलट हो' असं खुणावत असतं.  पालक व शिक्षकांनी  मुलांचे हे सुप्त गुण ओळखून त्याला पूरक अशी मदत केल्यास निश्चितच ते त्या क्षेत्रात नाव, पद, प्रतिष्ठा आणि पैसा कमावू शकतात. हेच कारण सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे जगप्रसिद्ध क्रिकेटर तर गानकोकिळा लतादिदी विश्वप्रसिद्ध गायिका झाल्यात.  थोडक्यात संगीत,खेळ, कला, लेखन, सामाजिक कार्य असे किती तरी क्षेत्र आहेत ज्यामध्ये देशातील युवक यशाचं शिखर सर करू शकतात. गरज आहे त्यांच्या जिद्दीची, योग्य गुरू आणि मार्गदर्शनाची.

आपल्या घरामध्ये छोटसं झाडं असतं. वाढीसाठी आपण नित्यनियमाने त्यास खत-पाणी देत असतो. सोबतच त्याच्या सभोवती वाढणारं तण आपण वाढू देत नाही. तसं नाही केल्यास खत-पाण्याची शक्ती, ऊर्जा तणामध्ये विभागली जाते व  झाडाची वाढ खुंटते. मुलांचं तसंच असतं. अंगी पेंटिंगची कला ठासून भरलेला विध्यार्थी सकाळी बॅडमिन्टन, दुपारी गिटार आणि संध्याकाळी अबॅकस क्लासला उपस्थित राहत असेल तर त्याच्या आवडत्या पेंटिंग कलेचं काय होणार? गरज आहे पालकांनी ही गोष्ट समजून घेण्याची. 

हल्ली दहावीत शिकणाऱ्या विध्यार्थी व पालकांना दोनच पारंपारिक क्षेत्राची माहिती असते. किंबहुना सभोवतालच्या मंडळीकडून त्यांच्या मनात ती ठासवली जाते. ते क्षेत्र म्हणजे - इंजिनियरिंग आणि मेडिकल! दोन पिढ्यापूर्वी पालकांची हिच मानसिकता होती आणि शोकांतिका अशी की अजूनही त्या मानसिकतेत बदल झाला नाही.  मागील तीस वर्षात विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड बदल घडलेत. त्यानुसार व्यापार, उद्योग बदलले. सेवा क्षेत्रातील उद्योग प्रचंड प्रमाणात वाढले. आपण आज डिजीटल क्षेत्रात वावरत आहोत ज्यामुळे पारंपारिक उद्योग-नोकऱ्या मागे पडून देश-परदेशात करियर व व्यवसायाचे हजारो नवीन क्षेत्र खुले झाले आहेत. आता डॉक्टर व इंजिनियरपेक्षा किती तरी उत्तम नोकरी व व्यवसायाच्या नवनवीन संधी सध्या उपलब्ध आहेत. वीस-पंचेविशीतील युवक लाखो पॅकेजची नोकरी,  बिजनेस स्टार्ट-अपमध्ये नाव व पैसा कमवत असल्याचे आपण बघतच आहोत. आणि हे सर्व डॉक्टर- इंजिनियर आहेत का? मुळीच नाही! 

ज्यांचा इंजिनियरिंग-मेडिकलकडे कल आहे, बौद्धीक आर्थिक क्षमता आहे अशांनी ती क्षेत्र निवडायला मुळीच हरकत नाही. पण विज्ञान, गणिताची आवड नसतांना 'मित्र जात आहेत म्हणून मी' हा प्रकार चुकीचा होईल. त्यांच प्रमाणे गणित जमत नाही म्हणून मेडिकल आणि बायोलॉजी आवडत नाही म्हणून इंजिनियरिंग कडे वळने किती योग्य?  कारण जगात करियर करण्यासारखे फक्त दोनच क्षेत्र नाहीत.  सेवावृत्ती नसलेले विध्यार्थी मेडिकलला आणि तंत्रज्ञानाची आवड नसलेले विध्यार्थी इंजिनियरिंगकडे वळून फसतात.   बरेच असे विध्यार्थी आवड व क्षमता नसतांना भलत्या क्षेत्राकडे वळून स्वतःच नुकसान करतात.  त्या चुकीच्या करियर मार्गात त्यांच्या पैशासह अमूल्य वेळही वाया जातो. 

गरज आहे पालक व गुरूजनांनी आपल्या विध्यार्थ्यांशी मनमोकळी चर्चा करण्याची.  त्यांचा एकूण कल जाणून घेण्याची. गरज पडल्यास एखाद्या निष्णात मानसोपचारतज्ञाकडून त्याची विज्ञाननिष्ठ कल चाचणी करुन घेण्याची. इंग्रजीत एक म्हण आहे, 
A stitch on time saves the nine! 

दहावीत शिकणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर, 9822108775.
(लेखक एस्पी इन्फोटेक या छ. संभाजीनगर येथील 
शैक्षणिक संस्थेचे संचालक व करियर मार्गदर्शक आहे.)

Sunday, 1 December 2024

अहो, शिष्यवृती परीक्षा कि विद्यार्थ्यांची थट्टा?





प्रेम जैस्वाल 
premshjaiswal@gmail.com



अहो, शिष्यवृती परीक्षा कि विद्यार्थ्यांची थट्टा?
१८ फेब्रुवारी, २०१८ ला इयत्ता ५वी आणि ८वीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृती परीक्षेचा निकाल ६ ऑगस्ट, २०१८ लागला. शिष्यवृत्तीपात्र निकालाची शेवटची यादी जाहीर करण्यासाठी या मंडळाला १-२ नाहीतर तब्बल ६ महिने लागले !
'स्कॉलरशिप' च्या नावाने परीचित या परिक्षेस राज्यातील ६१७७ केंद्राद्वारे ५वी आणि ८वीचे ऐकुन ८ लाख ५८ हजार ४६५ विद्यार्थ्या बसले होते. कंप्युटर आणि इंटरनेटच्या जमान्यात निकालासाठी जर या मंडळाला ६ महिने लागत असतील तर या वरूनच ह्या शिक्षण मंडळाच शिष्यवृत्तीबद्दलच गांभीर्य लक्षात येईल.
दुसरी बाब अशी कि शासनाकडून १९५४ पासून घेणाऱ्या ह्या परिक्षेचा हेतु राज्यातील गरीब होतकरु गुणवंत विद्यार्थी निवडने आणि तो पुढील शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यास थोड़ा आर्थिक हातभार लावणे असा होता. म्हणून काही गुणवंत विद्यार्थीची या परीक्षेद्वारे निवड करून त्यांना 'शिष्यवृती' देण्यात येते. पण ह्या शिष्यवृतीसाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तसेच मिळणाऱ्या रक्कमेत पाहिजे तसा बदल झालेला दिसत नाही. किंबहुना हा शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय दुर्लक्षित प्रांत झालाआहे. इयत्ता ५वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला फक्त ₹ ५०० आणि ८वी इयतेत शिकणाऱ्याना फक्त ₹७५० स्कॉलरशिप म्हणून दिले जातात !
काळ बदलला वेळ बदलली सरकार बदलले आणि मंत्रीही बदलले पण प्रज्ञावंत विद्यार्थी दुर्लक्षितच राहिले. मागील काही वर्षात लोकसंख्येप्रमाणे शाळासंख्येमधे झपात्याने वाढ झाली आणि स्कॉलरशिप देणारे विद्यार्थिही वाढले. पण स्कॉलरशिपपात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत पाहिजे तेव्हड़ी वाढ झालेली दिसत नाही. शाळेला मान्यता, तुकड्या, पगारवाढ यातच सर्व शिक्षणखाते एव्हड़े व्यस्त आहे कि त्यांना ह्या परिक्षा दुय्यम वाटतात. खर्च वाढला म्हणून मंत्रिपासून खासदार, आमदार आणि सेक्रेटरी सह सर्व कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ झाली. भत्ते आणि सुविधा वाढल्या. शिक्षकच आपल्या संसारात सुखी नसतील तर ते विद्यार्थ्याना काय शिकवतील म्हणून त्यांच्या पगारात भरमसाठ वाढ झाली. एव्हड़च काय जेंव्हा पगार वाढत नव्हते तेंव्हा शिक्षकांणी संघटित होवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. पण उद्याच देशाच भविष्य ज्यांच्या हातात त्या मुलांच्या संख्येत व शिष्यवृती रक्कमेत बदल झाले नाही. आज जिल्हा परिषद शाळा सोडल्या तर इतर शाळेची फि भरमसाठ आहे. जि प्र ची स्थिति एव्हड़ी वाईट आहे की तेथील शिक्षकच आपल्या पाल्यांचा प्रवेश इतर खाजगी शाळेत घेतात. थोडक्यात ८व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शालेय वार्षिक खर्च कमीत कमी ₹ १२०००/- आणि हाच खर्च उच्चभ्रू शाळेत १ लाखाच्या घरात जातो. या सोबत जर शिष्यवृतीची शिकवनी, ने-आण खर्च, वह्या-पुस्तके आणि इतर खर्च जोड़ला तर त्या रकमेसमोर मिळणाऱ्या बक्षिसरूपी शिष्यवृतीची रक्कम फारच कमी असते. आज शैक्षणिक खर्चासह प्रत्येक वस्तु आणि सेवेचे भाव कितीतरी पटिने वाढले आहेत. किमान शासनाने एव्हड़ा तरी विचार करावा कि विद्यार्थी एव्हड़ी छोटी रक्कम कमावून पालकांना कोणता हातभार लावतील, किंवा पुढील शिक्षणात कोणता खर्च कमी होईल. ही प्रज्ञावन्त विद्यार्थ्याची थट्टा नव्हे का?
आपल्याकडे विद्यार्थ्याची गळती थांबावी म्हणून कालपर्यंत पहिली ते आठवी इयतेपर्यन्त परीक्षाच नव्हती त्यामुळे अभ्यासात पुढे कोण आणि मागे कोण हे पालकाना कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे ही एकच अशी स्पर्धापरीक्षा आहे की ज्यामुळे विद्यार्थ्याची इयत्ता ५वी किंवा ८वी पर्यन्तची खरी शैक्षणिक प्रगति पालकाना माहित पड़ते. कदाचित त्यामुळे पालकवर्गातही या परिक्षेला खुप महत्व आहे त्यामुळे ते या परीक्षेसाठी मुलाना प्रोत्साहित करतात. परीक्षा उतीर्ण केल्यानंतर आपले समाजात कौतुक होईल, 'आपली पहिली खरी कमाई' या आशेने बिचारे विद्यार्थिही जीव तोडून मेहनत करतात. शिष्यवृतीसह शाळेय अभ्यास असे दोहेरी ओझे वाहत असतात. त्यात शिकवणी लावली तर खुप ताण पडतो. हल्ली पालकही या परिक्षेसाठी स्वतःला झोकुन देतात. तयारीसाठी शिकवणी लावणे, वेगवेगळे वह्या-पुस्तक पूरवणे, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, इंटरनेटवरुन माहिती शोधने, तसेच शिकवणीच्या ठिकाणी ने-आण करणे या उद्योगात गुंतले जातात. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीत आईवडील दोन्ही नोकरी करत असतील तर ही समस्या तारेवरच्या कसरतीपेक्षा कमी नसते. पण आपला पाल्य या स्पर्धेमधे मागे राहता कामा नये म्हणून ते मुकाट सहन करतात. वेळप्रसंगी पालक महत्वाचे कामे, विवाह,समारंभ टाळतात. हा एव्हड़ा सर्व उपदव्याप, जीवतोड़ मेहनत करून निवडलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्याला शासनाकडून जी शिष्यवृतीची रक्कम मिळते ती ऐकुन कुणालाही आश्चर्यच होईल. कारण आज घडिला ५००-७०० रुपयामधे विद्यार्थी पाठयपुस्तकही विकत घेवू शकत नाही.
जेंव्हा महागाई आणि लोकसंख्या प्रत्येक वर्षी वाढते, तुकड्या वाढतात, शाळेय फीसमधेही दरवर्षी वाढ होत असते मग स्कॉलरशिपपात्र संख्येत आणि रकमेत दरवर्षी वाढ का नको? त्यामुळे आज गरज आहे कि माननीय शिक्षणमंत्र्यानी शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेवून शिष्यवृतिच्या रकमेत भरघोस वाढ करावी. जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्याला या स्कॉलरशिपचा फायदा होईल आणि त्यांच्या शिक्षणाला थोडा हातभार लागेल.





ड्रोन तंत्रज्ञान

'जीवनातील कला ह्या निसर्गाच्या नकला असतात.' तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा हे वाक्य लागू पडतं. असं म्हणतात की विमानाचं शोध लावण्यापूर्वी राईट बंधूनी आकाशात उडणाऱ्या पक्षांचा अभ्यास केला होता. पक्षी कशा प्रकारे हवेत झेपावतात, ते परत जमिनीवर कसे उतरतात आणि या क्रियेत ते कोणकोणत्या बळाचा उपयोग करतात याच सूक्ष्म निरीक्षण करूनच त्यांनी विमानाचा शोध लावला होता.  पण शोकांतिका अशी कि आज विमानाजवळ आकाशात उडणारे पक्षी जवळही फिरकू नये यासाठी विमानाला एक खास प्रणाली जोडलेली असते!  असो.  युद्धजन्य परिस्थितीमुळे आज सगळीकडे मानवरहीत ड्रोनची चर्चा आहे.  अगदी पक्षाप्रमाणे दिसणारे ड्रोन आकाशात उडताना आपण बघत असतो.  डिजिटल युगातील या अविष्काराबद्दल हा लेख.

२०१६ मध्ये उरी येथे लष्करतळावर झालेल्या हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ज्याने मौलाची कामगिरी निभावली ते हवाई उपकरण म्हणजे 'ड्रोन'.  त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ड्रोनचा उपयोग अतिरेक्याची नेमकी ठिकाण शोधून काढण्यासाठी  झाला. मानवरहीत एखाद्या पक्षी किंवा भुंग्यासारखं उडणार तंत्रज्ञान हल्ली सर्वत्र पाहावयास मिळतं. खास करून लग्न समारंभात, गर्दीच्या ठिकाणी जिथे छायाचित्र काढणे अवघड असते अशा ठिकाणी हमखास ड्रोन वापरल्या जातं. ड्रोनचं प्रथम दर्शन आपल्याला आमिर खानच्या खूपच गाजलेल्या 'थ्री-इडियट' या चित्रपटात झालं होतं. पण ड्रोनचा शोध लावून कितीतरी वर्ष होत आहेत.

ड्रोन म्हणजे पायलट नसलेलं छोटं पण अगदी हलकं विमानचं.  त्याला 'अनमॅनड एअरक्राफ्ट' असेही संबोधतात.  हवेत उडणार ड्रोन एखाद्या रोबोट सारखं काम करतो. यामध्ये विविध सेन्सर आणि जीपीएस असल्यामुळे त्याकडून आपण अनेक कामं करून घेऊ शकतो. ड्रोनमध्ये असलेल्या इलेक्टरोनिक सर्किट व सॉफ्टवेअरमुले अतिदूर अंतरावरून त्याला नियंत्रित करता येत.   पूर्वी  शत्रू राष्ट्राच्या भागात टेहळणी करण्यासाठी, त्यांच्या हालचाली टीपण्यासाठी अनुभवी पायलट असलेली विमानं वापरल्या जायची. हे काम खुप जोखमीच होतं. कारण शत्रूराष्ट्राच्या रडारवर ही विमान दिसली की ती पाडली जायची. त्यामुळे महागड्या विमानासह पायलटचा जीव जात असे. आवश्यकता हि अविष्काराची जननी आहे असे म्हणतात ड्रोनमुळे हि समस्या दूर झाली.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या वायुदलाने शत्रू राष्ट्रावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच एक ड्रोन आपल्या सीमेवर फिरत होतं.  अर्थात पाकिस्तानच्या सैन्यानी भारताची युद्ध तयारीचा अंदाज घेण्यासाठी ते पाठविलं होतं. वायुदलाच्या रडारवर येताच ते पाडण्यात आलं.

ड्रोन तंत्रज्ञानची सुरुवात
डिजिटल तंत्रज्ञान जसेकी इंटरनेट, जीपीएसचा शोध आणि वापर सर्वात आधी अमेरिकासारख्या पाश्चिमात्य देशाच्या संरक्षण विभागात झाला आहे.  त्याचप्रमाणे ड्रोनचा वापर सुद्धा सुरुवातीला सरंक्षण क्षेत्रातच झाला आहे. पहिलं मानवरहित ड्रोन तयार करण्याचं श्रेय पहिल्या विश्वयुद्धात ब्रिटिश रॉयल फ्लायइंगच्या रेजिनॉल्ड डेनीला जातं. त्यानंतर इज्राईलचा ज्यू वैज्ञानिक अब्राहम करीमने पहिला मानवरहित ड्रोन तयार केला. त्यामुळे त्याला फादर ऑफ ड्रोन असे म्हणतात. अमेरिकेच्या वर्ल्ड टॉवरवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यातील कुविख्यात मास्टरमाइन्ड ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तसेच अफगाणिस्तानातून नेमक्या तालिबान दहशदवाद्याचे तळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अनेक बॉम्बहल्ले केले.  पण त्या बॉम्बहल्यात काही निष्पाप सामान्य नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर मात्र दहशदवाद्याची अचूक ठिकानं शोधण्यासाठी अमेरिकन गुप्त अजेंसी सीआयएने अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग केला.  आज भारतासह सर्व देशाच्या सैन्याकडे  अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध आहेत त्यामुळे शत्रूच्या नेमक्या ठिकाणावर ते अचूक हल्ला करू शकतात.

ड्रोन कसं काम करतं?
ड्रोन म्हंटल तर लोकांना फक्त कॅमेरा असलेला ड्रोन आठवतो, पण असं नाही.  खेळण्यातील हलके ड्रोन, फोटोग्राफी आणि देखरेखीसाठी उपयोगात येणारे वेगळे ड्रोन,  तर संरक्षण क्षेत्रात उपयोगी पडणारे आणि वेळप्रसंगी मिसाईल वाहू शकणारे अत्याधुनिक ड्रोन. हे रिमोटवर नियंत्रित करणारे उपकरण आहे. या मध्ये विविध प्रकारचे मोटर आणि रोटर असतात जे त्याला वर उडण्यासाठी मदत करतात. वजन कमीत कमी ठेवण्यासाठी त्यामध्ये हार्ड-प्लास्टिक किंवा कार्बन फायबरचा उपयोग केला जातो. ड्रोनला विविध ऍक्सिसला फिरवून दृश्य टिपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बोर्डामध्ये गिम्बल, गायरोस्कोप, अकॅसेलोमीटर आणि बॅटरी जोडलेली असते. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ड्रोनची दिशा, गती, उंची नियंत्रित केल्या जाते.

विविध क्षेत्रात ड्रोनचा उपयोग ?
संरक्षण क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातही उपयोग खूप वाढला आहे. दुर्गम ठिकानी घडलेली घटना, आगीची घटना, पूरस्थिती किंवा इतर जोखमीच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी, साहित्य पोहचवण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.  एखादया उंच ठिकाणचे तापमान माहीत करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. एखाद्या जमिनीचे सर्च रिपोर्ट काढण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. मोठ्या बांधकाम क्षेत्रात कामाची पाहणी करण्यासाठी तसेच टोलेजगं इमारतीचे कामाचे निरीक्षण, धोक्याच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी, ग्राहकांना कामाची गती दाखविण्यासाठी, इमारतीचे 3-डी फोटो काढण्यासाठी ड्रोनचा चांगला उपयोग होतो. कृषी क्षेत्रासाठी ड्रोन एक वरदान ठरलं आहे.  पिकाची देखरेख करण्यासाठी पिकावर खत, फवारणी करण्यासाठी, उंच ठिकाणावर बीज फेकण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.

ड्रोनबदल सरकारचे काही नियम
आज बाजारात काही हजार रुपयात ड्रोन उपलब्ध आहेत. असे असले तरी भारतीय हवाई हद्दीत ते उडवताना काही नियमावली आहे. आपल्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या उंचीपर्यंतच आपण ते उडवू शकतो.  हवाई वाहतुकीच्या दृष्टीने तो नियम योग्यच आहे.  सुरक्षिततेच्या कारणामूळे काही ठराविक ४०० फूट उंचीपर्यन्तच आपण ड्रोन उडवू शकतो. तर हवाईतळाच्या जवळ, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, राष्ट्रपती भवन, मंत्रालय, सचिवालय, संरक्षण विभागाची ठिकाण आणि इतर महत्वाच्या परिसरात ड्रोन उडवू शकत नाही. त्याला 'नो ड्रोन एरिया' म्हणतात. वजनानुसार ड्रोनचे वेगळे प्रकार आहेत. नॅनो (२५० ग्रॅम), मायक्रो (२किलोपर्यन्त), स्मॉल (२५ किलोपर्यंत), मेडीयम (१५० किलो), लार्ज (१५० कि.पेक्षा जास्त वजनी)    नॅनो आणि मायक्रो ड्रोनला २०० फूट उंचीपर्यन्त उडवण्यासाठी परवानगीची गरज नाही.
ड्रोन क्षेत्रात करियर ?

येत्या काही वर्षात ड्रोनला प्रचंड मागणी वाढणार आहे आणि त्यासोबत नोकरीच्या अनेक संधी चालून येतील. कृषी, इ-कॉमर्स, वाहतूक नियमन, अग्निशमन, वन्यजीव निगराणी, पोस्टल डिलिव्हरी आणि हवेचे नमुने आदी क्षेत्रात नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. त्यासाठी युएव्ही प्रमाणपत्र आणि ड्रोन नियमांची संपूर्ण माहिती असलेल्या युवकांना नोकऱ्या मिळू शकतील. तसेच ड्रोनच्या संशोधनात, उत्पादन क्षेत्रात, ड्रोनच्या मार्केटिंग आणि सेवा क्षेत्रात तसेच ड्रोनच प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित लोकांची गरज भासणार आहे. त्यामुळे नोकरीच एक नवीन दालन उघडलं आहे. तसेच स्वतःकडे ड्रोन असेल तर आपण कंत्राट पद्धतीने कामे घेऊ शकाल. हे लक्षात घेऊन भारतातील अनेक विद्यापीठात एव्हीएशन इंजिनियरिंग, ड्रोन टेक्नॉलॉजिचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तेंव्हा पारंपरिक पदवीच्या मागे न लागता ज्या क्षेत्रात संधी आहेत असे क्षेत्र निवडलेले कधीही उत्तमच.

स्वतःच्या स्वार्थ आणि सुरक्षिततेसाठी  मानवजातीने वृक्षतोड करून जंगल नष्ट केली. त्याची जागा आता उंचच उंच सिमेंटच्या जंगलानी घेतली.  मग या सिमेंटच्या जंगलात कुठे पक्षी बघायला मिळत नाही. पक्षाच्या किलबिलाटास आपण मुकलो. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात वाढता ड्रोनचा उपयोग बघता कदाचित पक्षाची जागा आता कृत्रिम पक्षीच म्हणजे 'ड्रोन' घेतील, असं म्हणन वावगं ठरणार नाही.

-© प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com