ad1

Monday, 20 August 2018

डोन्ट चीट युवर कस्टमर!



'व्हेन अ कस्टमर एंटर्स माय स्टोअर, फरगेट मी, ही इज किंग' - जॉन वॅनामेकर


लायका लॅब्स लिमिटेड. औषधाचे उत्पादन करणारी भारतातील एक नावाजलेली कंपनी. गुजरातमध्ये औषधांचं उत्पादन तर मुंबईचं उपनगर विले-पार्ले पूर्व येथील सेंटॉर हॉटेलसमोर त्यांच कॉर्पोरेट ऑफिस होतं.  औषधी उत्पादन, वितरण, विक्री आणि कार्पोरेट ऑफिस असा भला मोठा त्यांचा स्टाफ आणि पसारा होता. वर्ष १९५७ मध्ये सोव्हिएत युनियनने एक सजीवप्रयोग म्हणून अवकाशयानात 'लायका' नावाची कुत्री पाठवली होती. त्या नावावरूनच कंपनीच 'लायका लॅब्स लिमिटेड' असं  ठेवल्या गेलं, त्यावेळी असं म्हणलं जाई.

वर्ष १९९१ मध्ये भारतदेशाने विदेशी कंपन्यांसाठी उद्योगाचे द्वार खुलं केलं. त्या योगाने परदेशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यानी आपले पाय भारतीय उद्योग जगतात रोवायला सुरुवात केली. सर्वच क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ लागल्या. ज्या परदेशी कंपन्या भारतात स्वतःची गुंतवणूक करण्यास सक्षम नव्हत्या अशा कंपन्या  आपला माल सहजपणे विकण्यासाठी योग्य तो भारतीय भागीदार शोधत होत्या. अशाच एका युएसच्या कंपनीनं भारताच्या लायका लॅब्ससोबत करार केला.  त्या अमेरिकन कंपनीचं नावं होतं- एअरसेफ कॉर्पोरेशन. आणि त्याचं प्रॉडक्ट होतं- ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर.

दमा, अस्थमा, ब्रॉंक्याटीस अशा जुनाट फुफुसाच्या आजार असलेल्या रुग्णासं ऑक्सिजन म्हणजे जीव कि प्राण असतो. फुफुसाची क्षमता कमी झाल्यामुले किंवा दम्यामुळे वातावरणातील नैसर्गिक प्राणवायू ते आत घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना नियमित सिलेंडरद्वारे कृत्रिम ऑक्सिजन वापरणे आवश्यक असते. अशा मोठ्या खर्चिक ऑक्सिजन सिलेंडरला सोपा पर्याय म्हणजे 'ऑक्सिजन कोंसेन्ट्रेटर' मशीन. हा एक नवीनच कन्सेप्ट होता. अशा उपकरणाच्या भारतात विक्रीसाठी  अमेरिकन एअरसेफ कॉर्पोरेशननं लायकासोबत करार केला होता.

लायका मुळात एक ऍलोपॅथी औषध उत्पादन करणारी कंपनी. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरद्वारे विक्री करणारे सर्व कर्मचारी म्हणजे औषधी प्रतिनिधी. तर हे उपकरण म्हणजे एक तांत्रिक मशीन.  त्यामुळं ते विकण्यासाठी लायकाच्या व्यवस्थापण मंडळाने अंधेरी येथं वेगळं नवीन डिव्हिजनचं सुरु केलं. विक्री आणि तत्पर तांत्रिक सेवा मिळावी म्हणून त्या डिव्हिजनमध्ये काम करण्यासाठी सर्व अनुभवि व उच्चशिक्षित इंजिनियर निवडले गेले. ऑफिसमध्ये एक मॅनेजर, एक प्रोडक्ट इंजिनियर, एक सेल्स-सर्विस इंजिनियर, दोन ऑफिस कर्मचारी असा छोटा स्टाफ होता. मी त्यापैकीच एक. डेमो, विक्री आणि दुरुस्ती-सेवा अशी दोहेरी जबाबदारी कंपनीनं माझ्यावर टाकली होती. मोठं उपकरन, नवीन कन्सेप्ट आणि एक लाख रुपयाच्या जवळपास किंमत,  त्यामुळं त्या मशीनची विक्री म्हणजे एक दिव्य काम होतं.  रोज नवनवीन अस्थमाग्रस्थ पेशन्टला भेटणे, त्यांना कन्सेप्ट समजवणे, मग टॅक्सीमध्ये मशीन घेऊन डेमो देणे, सर्व जमत आलं कि मग किमतीची घासाघिस करून विकणे.  हे सर्व आटापिटा करून ग्राहकानं मशीन विकत घेतली तर ठीक नाहीतर मशीन घेऊन परत ऑफिस. आणि मशीन विक्री झाली तर सेवा देणं, दुरुस्ती करणं काम माझंच. नवीन कन्सेप्ट असल्यानं डेमो दाखवल्याशिवाय, १-२ दिवस वापरल्याशिवाय कोणी मशीन विकत घेतही नसे. त्यामुळे भरपूर डेमो, कितीतरी मिटिंग व्हायच्या आणि मग विक्री व्हायची.

विक्री आणि सेवा याद्वारे कंपनीला रेव्हेन्यू मिळत असतो. काहीही करून हा डिव्हिजन नफेत राहावं अशी जिम्मेदारी मॅनेजरची असते. मागील काही दिवसात आमची विक्री घटली होती. विक्री वाढावी म्हंणून बरेच प्रयत्न चालू होते.  पुढे पुढे विक्री कमी आणि ऑफिसचा खर्च वाढत गेला. बऱ्याच वेळेस आम्ही महिन्यातुन फक्त एक-दोनच मशीन विकत असू, तेंव्हा आमचे एमबीए मॅनेजर जाम चिडत असत. अशातच एक दुपारी आमच्या ऑफिसचा फोन खणखणला. पलीकडली व्यक्ती बांदऱ्याच्या पाली हिल्सहून बोलत होती. फोन करणाऱ्या युवकाला आपल्या  दमा असलेल्या वृद्ध वडीलासाठी मशीनची माहिती हवी होती.  मला आठवतं, तो एक सधन काश्मिरी मुस्लिम ग्राहक होता. पालि हिल्सला ऑफिस तर नरिमन पॉईंट येथे ओबेरॉय हॉटेलच्या शॉपिंग सेंटरमध्ये त्याचं गालीच्या, स्टोन, पर्ल्सचं मोठं दुकान होत. म्हणून एक लाखाची मशीन घेनं त्याच्यासाठी काही मोठा व्यवहार नव्हता. त्यांनं ऑक्सिजन मशीनबद्दल भरपूर विचारपूस करून एक डेमो देण्याची विनंती केली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अंधेरीहुन टॅक्सीमध्ये नवीन डेमो मशीन घेऊन मी पाली हिल्सला पोहचलो.  सुरुवातीस रुग्णाच्या नातेवाईकास मी कन्सेप्ट समजावून सांगितला, मग डेमो दिला.  खात्री व्हावी म्हणून त्यांनी दोन दिवस मशीन वापरून पाहतो अशी इच्छा दाखवली. ठरल्याप्रमाणे त्यांना आम्ही ती मशीन दोन दिवस वापरू दिली.  तिसऱ्या दिवशी मी पुन्हा पाली हिल्सला गेलो. त्यांना मशीन, कन्सेप्ट सर्वकाही आवडलं पण गाडी किंमतीवर आडली. एक तास किंमतबद्दल घासाघीस झाली पण ती चर्चा निष्फळ ठरली.  बोलता बोलता त्या युवकांनं आमच्या विक्री पश्चात सेवेची विचारपूस केली. आमच्या सेवेत त्रुटी नव्हती म्हणून मी त्याला मशीन वापरणाऱ्या ग्राहकांची सर्व नाव, फोन नंबर दिले. आपण आमच्या जुन्या ग्राहकाशी बोलून घ्या असं मी सांगितलं.

पुढं आमच्या आणि ग्राहकामध्ये  २-३ मिटिंग झाल्या, किमतीची घासाघीस झाली पण  खरेदीची ऑर्डर काही मिळत नव्हती. काही ग्राहक खूपच चिकित्सक, 'हार्ड-नट अँड डिफिकल्ट टू क्रॅक' असतात, हा त्यापैकीच एक होता.  शेवटचा प्रयत्न करावं म्हणून आमच्या मॅनेजरने कंपनीच्या व्हाईस-प्रेसिडेंटकडून एक खूपच स्पेशल किंमत दिली, तरी तो ग्राहक टसचा मस झाला नाही. शेवटी वैतागून आम्ही त्या ग्राहकांचा पिच्छा सोडून दिला.

साधारण पंधरा दिवसानंतर त्याच ग्राहकांचा मला फोन आला. 'आमच्याकडं तुमच्याच कंपनीची एक मशीन आहे, ती व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही सर्व टूल घेऊन घरी या, आम्ही होईल ते सर्विस चार्ज देऊ'. मी लगेच हा कॉल घेतला. पाली हिल्सला गेलो. तिथे एक जुनी मशीन होती. मी दिलेल्या एका जुन्या ग्राहकाकडून त्यानं ती सेकंड-हॅंड मशीन कमी किमतीत विकत घेतली होती. मी दिलेल्या ग्राहकाची यादी, फोनचा त्यानं योग्य फायदा करून घेतला होता.  त्याला फक्त खात्री करावयाची होती कि ती मशीन सुस्थितीत आहे की नाही. मी सर्व बाबतीत ती मशीन चेक केली. ती मशीन उत्तम स्थितीत होती आणि त्यात काहीही दोष नव्हता. मी मॅनेजरला विचारलं 'मशीन चांगली आहे मग चेकिंग चार्ज किती लावू?'  या ग्राहकाने नवीन मशीन घेण्यासाठी मॅनेजरच् खूप डोकं खालं होतं आणि शेवटी सेकंड-हॅंड मशीन घेतली त्यामुळे ते खूपचं जास्त चिडले होते. आता त्या वैतागाचा बदला घ्यायची त्यांची इच्छा होत होती. मला त्यांनी सूचना दिली की- एक मोठा पार्ट खराब आहे असं सांगून दे आणि ₹ २१०००/-असा खर्च सांग. थोडक्यात मॅनेजरने मला खोटं बोलून ग्राहकाला मोठा चुना लावायला सांगितलं होतं. खाजगी कंपनीत वरिष्ठ सांगतील ती पूर्वदिशा. मी मॅनेजरनं जे सांगितलं तसंच केलं. मशीनचा ऑक्सिजन वेगळा करणारा महाग पार्टच खराब आहे आणि तो पार्ट बदलावा लागेल असं ग्राहकाला खोटं सांगितलं. ग्राहक खर्चासाठी तयार झाला. मी ती मशीन दुरुस्तीसाठी ऑफिसला घेऊन आलो.

मुळात ती मशीन अगदी चांगल्या स्थितीत होती. त्याला काहीच करायची आवश्यकता नव्हती.  फक्त फाकफुक स्वच्छ करून, पार्ट बदलण्याचं खोटंनाट नाटक करून ₹२१०००/- च बिल मला त्या ग्राहकाला ठोकायचा आदेश होता. मी आज्ञाधारकानं चार दिवसानंतर ती मशीन आणि बिल ग्राहकाला पोहचत केलं. ग्राहकांनी लगेच मला ₹२१०००/- चा चेक दिला. चेक घेऊन ऑफिसला आल्यानंतर आमच्या मॅनेजरचा चेहरा बघण्यासारखा होता. ते खूपच खुश होते. ' कैसे आया उट पहाड के निचे' म्हणत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पण आतून मला हे पटणार नव्हतं. माझं मन मलाच खात होतं कारण हा चेक मला चुकीच्या मार्गाने मिळाला होता. त्या अर्थाला काहीच अर्थ नव्हता. पण मॅनेजर महाशय जाम खुश होते. एक अध्याय संपला होता. तो दिवस आनंदात गेला.

दुसऱ्या दिवशी नियमितपणे ऑफिस सुरु झालं. सर्व सुरळीत चालू होतं.  सकाळी पुन्हा फोन खनंखनला. पलीकडं तो कालचाच ग्राहक होता. आता काय नवीन भानगड म्हणून मी मॅनेजरला विचारलं. आता त्या ग्राहकांच म्हणन होतं की काही तांत्रिक कारणानं त्यानं दिलेला चेक वटणार नाही, तेंव्हा चेक परत करून तुम्ही रोकड-कॅशच घेऊन जा.  आता तर मॅनेजर महाशय जास्तच खुश. कारण त्याकाळी चेक लवकर वटत नसे शिवाय डिसऑनरची भिती असतेच. 'शुभम शिघ्रम', मी लगेच कॅश घ्यायला निघालो. त्यांनी मला ओबेरॉय हॉटेलच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बोलावलं होतं. माझ्या खुशीचा ठिकाणा नव्हता. मी लगेच त्यांच्या शॉपमध्ये पोहचून चेक त्याच्या सुपूर्द केला. हसत हसत त्यांनी चेक घेतला आणि शांतपणे मला परत जाण्यास सांगितलं. आधी मला काही समजलंच नाही आणि मी त्याना कॅश देण्याची विनंती केली. त्यांनी शांतपणे माझ्यासमक्ष तो चेक फाडला आणि तुम्हाला मी काहीच देणार नाही असं सांगून मला परत जाण्यास सांगितलं. त्यानंतर तो जे बोलला त्यानं मी अगदी थंडच झालो. त्याच्या एसी शॉपमध्ये मला घाम फुटल्यासारखं होतं होत. डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी आल्यासारखं झालं. जो पार्ट बदलण्यासाठी मी मशीन घेवून गेलो होतो त्या पार्टला त्या ग्राहकाने आधीच फुल्लिची छोटी  मार्किंग करून ठेवली होती. मशीन परत आल्यानंतर त्यांना तो पार्ट आहे त्या स्थितीतच आणि जुनाचं आढळला. आपल्याला मूर्ख समजून हि लोकं आपला गैरफायदा घेत आहेत, फसवत आहेत म्हणून त्यानं हा किस्सा सरळ कंपनीच्या व्हॉईस-प्रेसिडेंटला कळवला होता. एखाद्या चोराला रंगेहात पकडल्यानंतर जे घडत ते सर्व माझ्यासोबत घडत होतं. डोकं सुन्न झालं होतं. मी कसाबसा ऑफिसला पोहचलो. कॅशच्या प्रतीक्षेत असलेल्या आमच्या मॅनेजरला मी संपूर्ण हकीगत सांगितली. आम्हाला हसावं कि रडावं काहीच कळतं नव्हतं. लायकाने चेअरमन श्री नानुभाई गांधी एक तत्वनिष्ठ गुजराती होते. मूल्य आणि तत्वाशी तडजोड त्यांना पटत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत कंपनीचं नाव खराब होनं त्याना जमणारं नव्हतं. बिझनेस एथिक्स, मूल्य त्यांना जास्त प्यारे होते. आमच्या या कृष्णकर्त्यांनं लायकाच्या नावाला धब्बा लागून त्याचा वाईट परिणाम विश्वासावर चालणाऱ्या  मोठया औषधी-वैद्यकीय क्षेत्राला झाला असता.

आता हे प्रकरणं सावरनं खूप कठीण काम झालं होतं. खाजगी कंपनीत यशाचे सर्वच बाप असतात पण एखादी वाईट घटना घडली कि त्याची कुणीही स्वतःवर जिम्मेदारी घेत नाही, ते अपत्य अनाथ असतं. कंपनीचे वरिष्ठ खूप चिडले होते. हे 'अपत्य' कोणाचं जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरु केली. वातावरण गरम झालं होतं. कुणाची दांडी उडते कि काय अशी भीती होती. एक खोटं लपवण्यासाठी कितीतरी खोट्या कुबड्या लागत असतात. मग नको ती कथा सांगून आम्ही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण सत्य हे पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या तुकड्यासारखं असतं. कितीही खोलात ढकललं तर वर तरंगतच! या प्रकरणाचा 'बोलविता धनी' आमचे मॅनेजर होते त्यामुळे त्यांच्याच नावावर हे बिल फाडल्या जाणार होतं. जे अपेक्षित होतं तसंच झालं. पुढील काही दिवसातं पुन्हा असं एक प्रकरण घडलं. मी माझ्या मूल्य आणि तत्वाशी चिपकून राहिलो. मॅनेजरनं नको असे काही बोल्ड निर्णय घेतले. नाईलाजानं कंपनीला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला.

लायकामध्ये आम्ही जो खेळ खेळला तो व्यवहार-उद्योग क्षेत्रातला काही नवीन प्रकार नव्हता. सेवा-सर्विस क्षेत्रात अशा घटना हमखास घडतं असतात, आजही घडतात. कार्यालयीन कम्प्युटर , युपीएस, इन्व्हर्टर असो की घरगुती मोटर,एसी, रेफ्रिजरेटर किंवा अजून इलेक्ट्रिक रिपेअर असो,  ग्राहकाच्या अज्ञानाचा दुरुस्तीवाले हमखास फायदा घेत असतात. अशा फसवणुकीच्या बातम्या आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असतो. अर्थात याला काही अपवादही असतात. पण काही चिकित्सक, जिद्दी ग्राहक ग्राहकमंचामध्ये आवाज उठवून कंपन्यांना अद्दल घडवत असतात.  ग्राहकाला सरंक्षण मिळावं म्हणून शासनानं कायदा करून ग्राहकास अभय दिलं आहे, त्यामुळं ग्राहक आज खरोखरच राजा आहे.

व्यवस्थापन शास्त्राच उच्च शिक्षण-एमबीए- केलेले तरुण-तडफदार युवक कंपन्यात काम करताना खूपचं वेगळ्या तोऱ्यात वागतात. आपल्या व्यक्तिमत्व, भाषा प्रभुत्वाने ते इतरांवर राज्य करण्याचा, हाताखालील कर्मचाऱ्यांना कमी लेखण्याचा, ग्राहकाला फिरवण्याचा प्रयत्न करत असतात. अस करत असताना कधी कधी ते ग्राहकाला कमी लेखण्याची मोठी चूक करतात, आणि फसतात. जास्त शिक्षण व अनुभवाचा अभावमुळं कदाचित हे घडतं असावं. एमबीएमध्ये शिकलेल्या मॅनेजमेंट टेक्टीजपेक्षा आई-वडील तसेच प्राथमिक शिक्षकाकडून मिळालेलं जीवनमूल्याच शिक्षण व संस्कारशिक्षण अति महत्वाचं असतं. मूल्य हे वैश्विक असतात. सर्व जगात ते तेव्हढेच महत्वाचे असतात. खोटं बोलू नये, इतरांचा आदर करा, कुणास कमी लेखू नका, फसवू नका, दुसऱ्यासाठी खड्डा कराल तर तुम्हीच पडाल इ. हे सर्व आपण लहानपणी कथा, पाठयपुस्तकातील धड्यामार्फत शिकत आलो. पण एमबीए शिकल्यानंतर मॅनेजमेंट टेक्टीज पुढे आणि जीवन उपयोगी मूल्य मागे पडतात.  दिलेलं सेल्स, रेव्हेन्यू टार्गेट पूर्ण करण्यासाठी मग हे युवक रेशनल-इमोशनचा विचार न करता वाटेल ते गोंधळ करताना दिसतात.

वरील प्रकरणात मॅनेजरने समंजसपणाने आपल्या रागाला आवर घातला असता तर पुढचं अघटिक घडलचं नसतं.  समाजात फिरताना सर्व ग्राहक एक सारखेच मिळतील असं शक्य नाही.  भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर अशक्यच. आणि उद्योग म्हंटल तर भिन्नभिन्न व्यक्ती, समाजातील ग्राहकांशी एकरूप होऊन, त्यांच्या फ्रेक्युन्सी, वेवलेन्थशी जुळवूनच व्यवहार करायचा असतो. कोणताही व्यवहार घडताना कंपनी, ग्राहक, समाज आणि सर्वांचाच फायदा होईल अशेच निर्णय घ्यावे लागतात. कुणीही आर्थिक, भावनिक दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.

व्यवसाय, उद्योगात सेल्स विभागच असा असतो की ज्याचा कायम बाहेरील जगाशी दररोज संपर्क होतं असतो. सेल्स-सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कंपनीचा खरा चेहरा असतात. ते जसं वागतात, बोलतात, राहतात यावरूनच ग्राहक  त्याच्या कंपनीचा अंदाज बांधू शकतो.  उद्योग ही वीरांची भूमी असते आणि तर मार्केटिंगची टीम एका सैनिकाप्रमाणे असते. विक्रीच्या युद्धात कंपनीसाठी लढणारे ते खरे यौध्ये असतात. विक्री, सेवा करून ते कंपन्यांची उलाढाल, पत वाढवत असतात.  कंपनी नफ्यात येत. अवॉर्ड, बोनस, मेडल सारखे सन्मान सेल्सटिमसाठी जास्त असतात. त्यामुळं बाहेरच्या जगाशी संवाद साधणाऱ्या विक्री-सेवा प्रतिनिधींचा व्यवहार चांगला असावा लागतो.

हे एक प्रकरण माझ्या आयुष्यात मला खुप काही शिकवूनं गेलं. अर्थात शिकणं हे ऐच्छिक असतं. मी शिकलो आणि पुन्हा अशा चुका टाळत गेलो. आम्ही स्वतःला खूप ग्रेट समजतो पण जगात शेरला सव्वाशेर मिळतातच. वरील प्रकरणात आम्ही दुसऱ्यासाठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यात आम्हीच अलगद जाऊन पडलो होतो. व्यवसाय उद्योगात लबाडी चालत नाही. चालली तरी जास्त दिवस टिकत नाही. उद्योग-कंपन्या बंद पडण्याचं हे एक कारण असू शकतं. एक लबाडी लपवण्यासाठी कितीतरी जास्त खोटं बोलावं लागतं. कधी कधी ते खूप घातक ठरतं.

खुल्या अर्थव्यस्थेमुळे परदेशी कंपन्या भारतात येऊन त्यांनी येथील देशी कंपन्यांना ग्राहकहिताचं महत्व दाखवून दिलं.  त्यामुळं ग्राहकसेवामध्ये अफाट बदल झाले आहेत. एकही ग्राहक दूर जाणे त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे ग्राहकांच खरंच भलं व्हावं असा सात्विक विचार करून कंपन्यानं आपलं व्यवस्थापन बदललं आहे. त्याचा त्याना फायदाचं होत आहे. कंपनी मग ती उत्पादन क्षेत्रातील असो की सेवा, ग्राहकाबद्दल ती खूप जागरूक असते.  एकही असंतुष्ट ग्राहक त्यांना नको असतो. तसंच ग्राहकाच्या तक्रारी त्या सकारात्मकतेने घेत असतात कारण या तक्रारीवरून त्या वस्तू आणि सेवेतील त्रुटी कंपन्यांना माहित पडतात व त्यात नियमित बदल केले जातात. त्यामुळे खास ग्राहकांची काळजी घेण्यासाठी कंपन्या एक स्वतंत्र विभाग-कस्टमर केअर सेंटर तसेच त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी कॉल सेंटरची व्यवस्था असते.

आज गरज आहे ग्राहक राजाने जाग होण्याची. दिवस भरात आपल्याकडं मोबाईल, पेपर, टीव्ही आणि इतर माध्यमाद्वारेद्वारे अनेक ऑफरचं जाळं फेकल्या जातं.  रात्री-अपरात्री कधीतरी येणारे दुसऱ्या देशातील कॉल्स हे काळजीपूर्वक विणलेल एक जाळचं असतं.  थोडक्यात 24 X7 आपल्या सभोवताली कंपन्यांनी ऑफरच जाळं टाकलेलं असतं. त्या जाळयात अलगद शिकार अडकवण्याचं अतोनात प्रयत्न कंपन्या करत असतात. तेंव्हा ग्राहकाने सद्सदविवेक बुद्धीनं विचार करून, चिकित्सक होऊन आपण फसवलं जावू नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

आता थोडक्यात महत्वाचे. दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तू व सेवा उपभोगत असतो. बऱ्याचदा उपभोगत असलेल्या वस्तूमध्ये आपल्याला दोष आढळतो. अशी तक्रार आपण स्थानिक ऑफिसला कळविली असता तेथील कर्मचारी चालढकल करतात. त्यांच्याकडून पाहिजे तशी सेवा वा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही. अशा वेळेस ग्राहकांनी खचून न जाता आपली लिखित सविस्तर तक्रार त्या कंपनीच्या वरिष्ठाना निदर्शनात आणने कधीही चांगले.  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कंपनीन भरपूर अधिकार दिलेले असतात. सर्व कायद्याविषयी ते जागरूक असतात. पुढील कायदेशीर कार्यवाही टळावी म्हणून वरीष्ठ अधिकारी ग्राहकाला पूर्णपणे संतुष्ट करतात. थोडक्यात हा फायदेशीर मार्ग असतो.

©प्रेम जैस्वाल 9822108775
( हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)
         - - - - - - - - - - - - -

Monday, 6 August 2018

हिरावलेलं बालपण



  
'बाळपणीचा काळ सुखाचा किंवा लहानपण देगा देवा.....' आता या म्हणीचं काही खरं राहीलं नाही कारण आता बाळपणीचा काळ तेव्हड़ा काही सुखाचा राहिला नाही. शिक्षणाचा वाढता व्याप आणि त्रस्त पालकांच्या अवाजवी अपेक्षेचे ओझे त्यांच्यावर लादून त्यांच्या सुखावरच घाला जात असल्याचं चित्र दिसत आहेत.

पूर्वी बालपण म्हणजे उडाण टप्पूगिरी, आटयापाट्या,गोट्या, विटी-दांडुनी मैदानं, असा सर्व गल्याबोळयात दणदणाट व्हायचा. शाळा व्यतिरिक्त फक्त खेळच हा उद्योग असायचा. मुलं असो की मुली दिवसभर मुक्त मातीमधे खेळून गुडघे-कोपरे फोड़ून घरी यायचे, जुजबी इलाज करून दुसऱ्या दिवशी खेळायला हजर! त्यामुळे आपसुकचं शरीराची हालचाल आणि वाढत्या वयात आवश्यक व्यायाम होवून जायचा. मनोरंजनाचे इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुलांचं बालपण हे मनसोक्त खेळण्याचचं बालपण होत, कदाचित हेच कारण असावे की त्याकाळी सण- उत्सवसुद्धा सर्व कुटुंबात खुप आनंदाने साजरे व्हायचे आणि मुलंही त्यात पूर्णपणे सामील होवून वेगळा आनंद मिळवयाची. उतरंडीसारखी जास्त भावंडे आणि त्यातल्या त्यात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ही मूलं कधी लहानाची मोठी व्हायची हे समजत नव्हतं. मोठ्याच्या खांद्यावर लहानाचे ओझे असं चित्र होतं.

८०च्या दशकात आपल्याकडे दुरचित्रवाणी आली आणि बालपणाला ग्रहण लागायला सुरुवात झाली. घरोघरी टीव्ही आले तसेच इतर भौतिक सुखांचे साधनं  जसेकी  फ्रिज, कूलर, म्यूसिक सिस्टम,वाशिंगमशीन ओवन आली. ह्या उपकरणांनी कुटुंबाचा खर्च आणि आर्थिक समीकरण बदलून टाकलं. त्यात इंग्रजी शाळेच्या खर्चाने फोड़णी दिली आणि झेपत नाही म्हणून ' हम दो हमारे दो' किंवा हल्ली 'एकच पुरे'चा नारा सुरु झाला. अर्थात समाज आणि देशाच्या लोकसंखेचा विचार केल्यास त्यात वावगं असं काहीच नाही. छोट्या अशा न्यूक्लियर कुटुंबात जोपर्यंत दुरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शन होत तोपर्यन्त वातावरण ठीक होतं. वाहिनी आणि त्यावर प्रक्षेपित होत असलेल्या सीरियल्स यावर माहिती प्रसारण मंत्रालयाचा अंकुश होता. मुळातंच या दूरदर्शनचा उद्देश माहिती, दूरसंचार आणि शिक्षणासाठी होता. पण जसजसे या टीवीवर खाजगी वाहिन्यांची गर्दी वाढली मग मुळ उद्देश बाजूला राहून सीरियल, डेली सोपने जागा व्यापली. एव्हड़च काय पण मुलासाठी 'खास स्टफ' म्हणून कार्टूनचं प्रसारण सुरु झालं आणि चित्र बदललं! खेळाच्या मैदानातील खेळणारी मूलं पक्के टीवीदर्शक, मार्केटिंगच्या भाषेत 'टारगेट ऑडियंस' बनली. विट्टी-दांण्डूु आट्यापाट्या, कब्बडी खोखो, कंचे सारखे मैदानी खेळ खेळणारी मंडळी डोरेमॉन, शिनच्यन, नोबीता हे कार्टून कैरेक्टर बघण्यासाठी रिमोटवर बोटं फिरवू लागली. आजही बरीच मूल कार्टूनच्या कैरेक्टरसारखी विचित्र बोलताना दिसतात. विभक्त कुटुंबपध्दतीत ना आईला वेळ ना बाबाला! संस्कार करण्याच काम येवून पडलं ते शाळेच्या शिक्षकावर आणि ड्राइंगहॉलच्या टीवीवर. सीरयलच मनोरंजन कमी म्हणून की काय मग मनोरजंक जाहिराती सुरु झाल्या जेणेकरून बसल्या जागेवरून उठुच नये.


हल्लीच्या जनरेशनला 'टीनेजर' म्हणावे कि 'स्क्रिनेजर' हेच समजत नाही. आज हया मुलाना शाळेचा वेळ सोडला तर खऱ्या जगाकड़े पाहण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. कोणती ना कोणती एक स्क्रिन मग ती मोबाइल, टैब असो कि टीवी की कंप्यूटर त्यांना हवी असते. यात फक्त त्यांचाच दोष आहे असे नाही कारण पालक मंडळी ही त्यास जबाबदार आहेतच. सहज सोपे मनोरंजनाचे साधन उपलब्ध असताना मूल बाहेर खेळायला जातीलच कशाला? हातात सामावणाऱ्या मोबाइलमधेच त्यांच मैदान आणि कोर्ट, त्यावरच मनसोक्त बोटे फिरवून क्रिकेट, बैडमिंटन आणि वाटेल ते खेळ खेळायचं, त्यावरच जिंकांयचं, हरायचं आणि धन्यता मानायची! त्यामुळे मैदानी खेळ खेळणारी मित्रमण्डळी घटूण फक्त स्क्रीन वर खेळनारे 'डिजिटल फ्रेंड्स' तयार झाले. आणि स्क्रिनच्या जाळयात ही बालमण्डळी एव्हढी अडकलेली आहेत की त्यांना एखाद्या शहरातील वाण्याच्या दुकानाचा पत्ता किंवा व्यवहारिक अशा काही गोष्टी जरी विचारल्या तर ते सरळ 'गूगल' मधे टाकतात. मोबाइल आणि माहिती तंत्रज्ञानामुळे दूरवरच जग जरी जवळ आल्यासारखं वाटत असेल पण मुळात जवळची माणसं दूर होताना दिसत आहे. या समस्येला फक्त मुलंच जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे होईल, उलट पालक जास्त जबाबदार आहेत. हल्ली बरेच पालक जेंव्हा आपल्या अगदी छोट्यामुलांच 'मोबाइलकौशल्या' ची फुशारकी मारतात तेंव्हा त्यांची कीव येते आणि वाईट वाटते. 'अहो आमच्या बंटी खूपच हुशार, त्याला मोबाइलचे कोणतेही ऑपरेशन विचार, सर्व माहित आहे त्याला, जे मला माहित नाही ते त्याला माहीत! पण शोकांतिका अशी की याच बंटीला आपल्या वडिलांचे जवळचे नातेवाईक जसे चुलत काका, मामा इत्यादि माहित नसतात. अगदी शरीराचे सर्व अवयव, बौद्विक क्षमता विकसित न झालेल्या बालअवस्थेत बाळ गुंतुन राहावे म्हणून पालक जेंव्हा मुलांच्या हातात मोबाइल देतात तेंव्हा त्यानी मोबाइलच्या दुष्परिणामांचा थोड़ातरी विचार करावयास हवा. आज कोवळया वयाची मूले मोठया नम्बरचा चष्मा वापरताना दिसत आहेत. अर्थात खाण्याच्या आधुनिक सवयी, जंकफ़ूड याचाही परिणाम डोळ्यावर होतोच.


जस जसा शिक्षणाचा प्रसार वाढला, स्पर्धा वाढली मग या स्पर्धेत आपला मुलगा मागे नको म्हणून पालक सतर्क झाले. जे आपल्याला मिळाले नाही किंवा जिथे आपण कमी पडलो ते मुलासोबत होता कामा नये म्हणून चांगल्या, उत्तम अति उत्तम शाळेत मुलांचा प्रवेश झाला. जशी मागणी तसा पुरवठा होणे गरजचे म्हणून जुजबी मैदान असलेल्या नेशनल, इंटेरनैशनल आईसीएसई, सीबीएसई शाळा सुरु झाल्या. शाळेच्या वारंवार घटक चाचण्या, सहामायीं आणि वार्षिक परिक्षेव्यतिरिक्त इतर परीक्षा सायन्स ओलिम्पियड, मैथ ओलिम्पियड, होमी भाभा अशा परीक्षेत छोटी मण्डळी गुंतत गेली विद्यार्थी न राहता तो फक्त परीक्षार्थी बनला. आज एखाद्या सीबीएसई किंवा आईसीएसई शाळेचा विद्यार्थी जेंव्हा घरी येतो तेंव्हा चेहऱ्यावर एखादा थकुन आलेल्या सुपरक्लासवन ऑफिसर, बँकेच्या मैनेजरसारखे थकलेले हावभाव आणि तनाव असतात. एव्हढा हया शिक्षणाच्या व्याप आणि तणावाने मुलांची खेळायची तर सोडा झोपायची वेळ खावून टाकली.

काही दिवसाआधी एका दैनिकात जाहिरात आली होती कि आमच्याकड़े पाचवीपासून आयआयटीचे क्लास घेतल्या जातात आणि एव्हढंच नाही तर एका समाजमाध्यमामध्ये एका उच्चशिक्षित महिलेने प्रश्न विचारला की आयआयटी फाऊंडेशनच्या क्लाससाठी मी माझ्या मुलास कधी पाठवायला पाहिजे ? विचारपुस केल्यानंतर माहित झाले की तिचा बाळ आज घडीला फक्त दुसऱ्यावर्गातच आहे! मागणी तसा पुरवठा, आज पहिल्या वर्गापासूनच आम्ही आयआयटी फाउंडेशन घेतो अशा 'बहाद्दर' शाळेच्या जेंव्हा जाहिराती बघतो तेंव्हा डोके सुन्न होतं. अशा शाळेचा आपल्याकडे वाणवा नाही. गुणवत्तापूर्वक शिक्षण हे अत्यावश्यकच हे मान्य, पण ही कोणती गुणवत्ता आणि हा कोणता अतिरेक आणि कोणत्या कीमतीवर? जर संपूर्ण बालपन, शारीरिक व्यायाम, जीवनमूल्य अशा मुलभुत बाबी जर एखाद शिक्षण हिरावून घेत असेल तर ते किती कामाच? ज्या वयात मुलाना घरगुती, समाज मूल्यांचे, संस्काराचे शिक्षण आवश्यक असते अशा वयात ते जर विज्ञान आणि गणिताचे किचकट समीकरण, सिद्धान्त शिकुन ते विद्यार्थी काय साध्य करतील?


आज बरीच पालक मंडळी मुलाना वेगवेगळे कला आणि अवांतर शिक्षणाचे वर्ग लावताना दिसतात. आपला मुलगा कोणत्याच क्षेत्रात कमी पडु नये हा त्यामागील विचार. मुलांचा सर्वांगीण विकास, संस्कार किंवा छंद म्हणून ते आवश्यकच आहे पण त्यासही काही मर्यादा असावी. प्राथमिक शिक्षण घेणारा विद्यार्थी ट्यूशनसहित जर सकाळी चित्रकलेला, दुपारी शाळेतुन आल्यानन्तर बैडमिंटन, त्यानन्तर संगीतक्लास आणि रविवारी अबेकस क्लासला जात असेल तर यात तो विद्यार्थी काय काय साध्य करेल. जर वैज्ञानिक आईंस्टाईन, न्यूटन, पायथागोरस, एडिसन हे असेच क्लास लावत बसले असते तर त्यांना हे विज्ञानाचे शोध लावता आले असते का. साधेसरळ उदाहरण द्यायच तर बागेत किंवा शेतात जेंव्हा आपन एखाद फळ-फूल-धान्य देणार झाड़ लावतो तेंव्हा त्याच्या वाढीसाठी किंवा त्याला पूरक असं जीवनसत्व मिळावी म्हणून त्याबाजुचे तण आपण वाढू देत नाही आणि वाढलं तरी आपण ते नाहीसे करतो. जेणेकरून त्या झाड़ाला सम्पूर्ण शक्ति मिळावी आणि ती इतरत्र विभागली जावू नये. तसा एखादा छंद जोपासने ठीक आहे कारण त्यातच चांगला अभ्यास, रियाज मेहनत करून तो पुढे नाव, पैसा कमावू शकतो, करियर घडवू शकतो. पण 'एकना धड़' असे वेगवेगळे प्रशिक्षण घेवून मुळात काही साध्य होणार नाही.


बालपण हे वर्तमानात जगत असतं. गरज आहे पालकानी जागरूक होण्याची, मुलांच्या शैक्षणिकसह शारीरिक, बौद्धिक सर्वांगीण वाढीकड़े लक्ष देण्याची आणि त्यांना वर्तमानातच आनंदी ठेवण्याची. आजची मूलं म्हणजे उद्या देशाचं भविष्य घडवणारी पिढी, तिचे काळजीपुर्वक संगोपन होणे जरूरी आहे, तेंव्हा वेळीच जागे होने गरजेचे आहे.

© प्रेम जैस्वाल, औरंगाबाद 9822108775
(हा लेख आपण नावासह शेअर करू शकता)


बिन पैशाची विंडो-शॉपिंग !




'ओहो, व्हॉट हैपन बेटा ?'
'आय एम गेटिंग बॊअर्ड, मम्मा'
'व्हाय डोन्ट यु गो फॉर शॉपिंग ? बेटा, थोडा मन बहल जायेगा!'

एखाद्या हिंदी मालिकेमध्ये जेंव्हा असे संवाद घडत असतात तेंव्हा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय विचारधारा असलेल्या लोकांच्या मनात असा प्रश्न पडणे साहजिक आहे कि बोअर होनं आणि शॉपिंगला जानं याचा काय संबंध?

मुळात शॉपिंग आता दोन प्रकारच झालं आहे. पहिला प्रकार हा निवळ शॉपिंग. हा एक सरळ सरळ शुद्ध व्यवहाराचा भाग आहे ज्यामध्ये आपण एखाद दुकान किंवा मॉलमध्ये जाऊन, पाहिजे त्या वस्तू निरखून, पारखून, भावठाव आणि घासाघीस करून आपण विकत घेत असतो. हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्या वस्तूची आपल्याला गरज आणि खरेदीसाठी खिशात पैसा, मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना आवश्यक असतो.

दुसरा प्रकार म्हणजे विंडो शॉपिंग. ही बिनपैशाची शॉपिंग. यासाठी आपल्या खिशात खडकू नसला तरी हरकत नाही पण अमाप वेळ आणि वस्तू न्याहळण्याची प्रबळ इच्छा हवी. भावठाव करून टाईमपास करणे, ट्रेंड-फॅशनची माहिती करून निखळ मनोरंजनासाठीसुद्धा विंडो शॉपरस याचा उपयोग करत असतात.

भारतात मॉल संस्कृती वाढल्यापासून हा दुसरा प्रकार म्हणजे विंडो शॉपिंग प्रचंड वाढला. चकाचक मॉल मध्ये बिनधोक शिरायचं. एका शोरुममधून दुसऱ्या. मग तिसऱ्या अस करत करत वेळ घालवायचा. हल्ली मॉल हे बहुमजली, मग एस्केलेटरवरून खालवर फिरायच, मध्येच थोड्या वस्तूचे भाव, ऑफर माहित करून थोडे फूडकोर्टमध्ये खाऊन-पिऊन परत! आता प्रत्येक शहरात मॉल संस्कृती रुजू झाल्यामुळे सगळीकडे हा प्रकार बघायला मिळतो. वरील संवादातील आईचा आपल्या बेट्यास शॉपिंगला पाठवण्याचा उद्देश हाच कि तिचा लाडला शॉपिंगला जाईल, मॉलमध्ये काही वस्तू खरेदी करून किंवा न जमल्यास विंडो शॉपिंग करून तो परत येईल. मॉलमध्ये त्याच मनोरंजन होऊन त्याच मन रमेल.

विंडो शॉपिंग हि संकल्पना फार जुनी नाही. सतराव्या शतकापूर्वी जगात दोनच वर्ग होते, एक गडगंज धनसंपती असलेला अप्पर क्लास आणि दुसरा तळागाळातील गरीब लोवरक्लास. सधन अप्परक्लास हा सरळ सरळ पाहिजे त्या वस्तू खरेदी करून उपभोग घ्यायचा तर गरीब लोवरक्लासच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाच पुऱ्या होत नसल्यामुळे चैनीच्या वस्तू खरेदीचा प्रश्नच उदभवत नव्हता. एव्हढच नाही तर सतराव्या शतकापूर्वी शोरूम, मॉल हा प्रकार नव्हताच. रस्त्याच्या कडेला एक छोटस दुकान आणि त्याला समोरून पत्र्याच्या दोन झडपा असतं. दोन झडपापैकी एक भाग वर उचलून, हुक लावून तो ऊन, पावसापासून आडोसा म्हंणून वापरल्या जायचा आणि खालच्या भागावर दुकानाच्या नावाचा बोर्ड असायचा. आजही गाव-तालुक्याच्या ठिकाणी बसस्टँडजवळ अशी दुकाने हमखास दिसायला मिळतील. दुकान एव्हडया लहान असायच्या कि वस्तू घेणाऱ्या ग्राहकाला मुश्किलीने तिथे उभे राहता यायचे. तसेच पुरेसा प्रकाश नसल्यामुळे आपण घेत असलेल्या मालाची गुणवत्ता कशी हे बघायची मुभा नसायची. कित्येक वस्तूचा दर्जा हा ती वस्तू विकत घेऊन वापरल्यानंतरच कळायचा. 

सतराव्या किंवा अठराव्या शतकात जेंव्हा युरोप खंडात मध्यमवर्गाची संख्या वाढली तेंव्हा हे चित्र पालटले. वाढत्या मध्यमवर्गीय संख्येमुळे लोकांचे जीवनमान उंचावून चैनीच्या वस्तूची मागणी वाढली. मग चैनीच्या वस्तू, कपडे घेणे का होत नाही पण हाताने स्पर्श करून, एकदा का होईना नेसून आनंद घ्यायचे प्रकार वाढले. अशा प्रकारे शॉपिंग न करताही आनंद लुटण्याच्या विंडो शॉपिंगचा जन्म झाला. असा विंडो शॉपिंग करणारा मध्यमवर्ग वाढल्यामुळे विंडो शॉपर हा प्रकार पुढे आला.

हळूहळू चैनीच्या वस्तू खरेदी करणे मध्यमवर्गाच्या आवाक्यात येऊ लागल्या तशी खरेदीदाराच्या संख्येमध्ये वाढ झाली. वस्तू खरेदी करणे हि एक व्यवहाराची बाब न रहाता एक मनोरंजन आणि वेळ घालवण्याचा भाग बनला. मध्यमवर्गाची संख्या वाढल्यामुळे साधारण अठराव्या शतकापासून युरोप आणि प्रदेशात चकाकनारे शोरूम आणि त्याला लागूनच विंडो शॉपरससाठी एक सुशोभित काचेची एक विंडो असे शोरूम उदयास आले. या विंडोमध्ये ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी वस्तू ठेवणे सोपे झाले. सध्याचा फॅशनट्रेंड काय, नवीन फॅशन कोणती, चालू किंमत आणि त्यावर सूट किती हे दाखवण्यासाठी त्या विंडोचा उपयोग करण्यात आला. मग शोरूममध्ये न जाता त्या विंडोमध्ये ठेवलेल्या वस्तूवरून आतील कपडे कसे असतील, दर्जा कसा असेल, किंमत-सूट किती आणि इतर बऱ्याच गोष्टीचा शॉपरला अंदाज यायचा. विंडोच्या सुविधेमुले विंडो-शॉपरच्या संख्येत खुप मोठी वाढ झाली.

पुढे रस्त्यावर वाढती गर्दी, गोंधळ, महिलांची सुरक्षितता आणि वाहनतळाची समस्या या एकंदरीत समस्यपासून मुक्ती मिळून लोकांना खरेदीचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून वर्दळीच्या रस्त्यापासून दूर असे मॉल हि संकल्पना रुजू झाली. जगात पहिला मॉल पॅरिस या देशात सुरु झाला. मनोरंजन, आनंद आणि सर्वच सुखचैनीच्या वस्तू यासह कॉफीशॉप, सलोन, गेमझोन आणि फूडकोर्ट हे ओघाने आलेच. या पॅरिसमधील मॉलला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जगात सगळीकडे मॉल संस्कृती वाढली. मुबलक काचेच्या उपलब्धतेमुळे फक्त विंडो नाही तर अख्या शोरूममध्ये काच, लख्ख प्रकाशयोजना आणि आरशाचा वापर वाढला. त्याचा मोठा फायदा म्हणजे मॉलमध्ये उजेड, प्रकाश आणि चकाकी वाढली. बघता बघता पॅरिस, लंडनसहीत सर्व युरोपात झकपाक चकाकणारे मॉल सुरु झाले.
मुबलक पैसेवाला अप्परक्लास हा शॉपिंग करणारा. तो वाटेल तेंव्हा, आहे त्या किमतीत पाहिजे त्या वस्तू खरेदी करायचा. तरीसुद्धा सुरुवातीच्या काळात फक्त पुरुषच शॉपिंगचा आनंद घ्यायचे. महिलांनी एकटे फिरणे किंवा शॉपिंगला जाणे गैर मानल्या जायचे. हळूहळू चैनीच्या वस्तू मध्यमवर्गाच्या खरेदीच्या आवाक्यात येऊ लागल्या. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी मध्यमवर्गांनीही चैनीच्या वस्तू बघाव्यात, हाताळाव्यात म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी पुढे वेगवेगळ्या युक्तया, जाहिरात हे प्रकार वाढले. मग त्यासाठी मोठमोठे ग्लासपॅनलच्या विंडो तयार करून त्यात मेनेक्यू ठेवण्याचे प्रकार सुरू झाले.

पुढे खास विंडो डेकोरेटर हा नवीन उद्योग सुरु झाला. आज मॉलमध्ये फिरताना विविध शोरूमच्या विंडो ह्या एका विशिष्ट 'थीम'ने सजलेल्या आपल्याला दिसतात. जसेकी स्वातंत्रादिनी तिरंगी रंग अशी थीम, संक्रातीत पतंग वगैरे. त्यासाठी विंडो डेकोरेटरची नियमित सेवा घेतली जाते. यामुळे एक चांगले झाले आता अप्पर आणि मिडलक्लाससह सर्वच लोकांना बिनदिक्कत शॉपिंग करत करत मनोरंजनासाठी विंडो शॉपिंग करण्याचीही मुभा मिळाली. त्यांना टाईमपाससाठी एक जागा मिळाली. ग्राहकाला खरेदीचा अपार आंनद लुटता यावा म्हणून आज प्रत्येक मॉलमध्ये खरेदी आणि मनोरंजनाच एक व्यवस्थित मिश्रण आपल्यासमोर वाढलेलं असत.

विंडो शॉपिंग फक्त मॉल, शोरूम, शहरातील दुकान आणि रस्त्यावरच होते असे नाही. झपाट्याने वाढून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेटवर आज हजारो शॉपिंग वेबसाईट उपलब्ध आहेत. या इ-शॉपिंग मध्येसुद्धा 'इ-विंडो शॉपर' कितीतरी वेळ घंटो न गिनती विंडो शॉपिंग करत असतात. त्यासाठी बाहेर जायचा खर्च नाही किंवा खिश्यात पैसे ठेवायची गरज नाही, हवा असतो फक्त नेटडाटा. इंटरनेटवर अशा हजारो शॉपिंग वेबसाईट आहेत ज्याचा ब्राउझर दिवसभर वेगवेगळ्या वस्तू बघून आंनद घेऊ शकतात. फायदा असा की या इ-शॉपिंगच्या साईटवर विंडो शॉपिंग करून ग्राहकाना नवनवीन फॅशन ट्रेंड, स्टाईल आणि किमतीचा अंदाज येऊन ते एक जागरूक ग्राहक बनतात. मग खरोखर शॉपिंग करताना घासाघीस करण्यासाठी या ऑन-लाईन टाईमपासचा त्यांना निश्चित फायदा होतो.

विंडो शॉपिंग हि कल्पना मुळात जरी मध्यमवर्गीयांमुळे सुरु झाली तरी मागील काही वर्षात यात खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. हल्ली उद्योजकांनी विक्री वाढून नफा वाढवा यासाठी 'सर्वांसाठी सर्वकाही' असे धोरण अवलंबिले आहे. त्यामुले ज्या वस्तू अप्परक्लासला मिळतात तशाच वस्तू, कमी दर्जाच्या का होईना मिडलक्लास तसेच लोवरक्लासला त्यांनी उपलब्ध करून देत आहेत. मग ते तयार कपडे जसेकी थ्री पीस ब्लेजर, टाय, शु आणि कोट सारखे तयार कपडे असो की इतर जीवनउपयोगी चैनीच्या वस्तू.

असे घडल्यामुळे अर्थातच शॉपरची संख्या वाढली. पण त्यामुळे विंडो शॉपरच्या संख्येत काहीही फरक पडला नाही, हा प्रकार वाढतच गेला. कारण मॉलमध्ये शॉपिंगसह मनोरंजन हा एक मोठा भाग जोडलेला असतो. त्यामुळे नेहमी खरेदी करायचीच, असा नियम तरी कुठे आहे. एका चकाचक, एसी वातावरणात पैसे न मोजता फेरफटका मारणे कुणाला बरे नाही आवडणार ? शिरताक्षणी सेक्युरिटीचा आदबशीर नमस्कार, बाहेर हिरवंगच्च हिरवळ, मॉलमध्ये शिरताच प्रसन्न एसी थंड वातावरण, मनमोहक सजावट, चकाचक फ्लोरिंग, गालिचे, खालीवर जायला एस्केलेटर, आस्थेने विचारपुस करणारे सेल्समन, सेल्सवूमन आणि त्यांचं विनम्र वागणं. आणि एव्हडी सर्व सुख तेही एक रुपया न मोजता!

आधीतर मला हाच प्रश्न पडायचा कि या मॉलची नावे इंग्लिशमध्येच का? कोरम, प्रोझोन, सेंट्रल, विवेयाना, ओरबीट असंच का आणि बालाजी, रमनलाल, जगनलाल अस मोकळंचाकळ मराठी-हिंदीत का नाही ? नंतर लक्षात आलं की मॉल हा प्रकारचं मुळात पाश्चिमात्य. मॉलमधील उपलब्ध ब्रँड सर्व पाश्चिमात्य आणि बाहेर रमनलाल, जगनलाल अशी एकोणिसाव्या शतकातील मॉल बरं नाही वाटणार. एरव्ही तरी अशी जुनी नावे विशी-तिशीच्या मोठ्या 'यंग जनरेशन' खरेदीदारास आवडत नाहीत. मी मंगलदास मॉलमध्ये जाऊन आलो यापेक्षा आय हॅंड बिन टु ओरबीट मॉल, हे कधीही 'कुल' वाटतं ना, कदाचित त्यामुळेच.

मॉलमध्ये दर तिसरा ग्राहक हा बिनकामाने इकडे तिकडे फिरनारा विंडो शॉपर असतो. एका शोरूममधून दुसऱ्या मग तिसऱ्या असा तो बिनदिकत फिरत असतो. आणि असे रिकामे-बिनकामे कोण हे रोज बघून बघून त्या शोरूमच्या सेल्समनालाही माहित झालेलं असत. त्यामुळे अशा गिऱ्हाकाने कितीही अभिनय केला तरी त्या सेल्समनच मानसिकशास्त्र खूप पक्क झालेलं असत. अशा ग्राहकाकडून त्या सेल्समनला एकच अपेक्षा असते कि उद्या जर मोठा ऑफर-डिस्काऊन्टचा सेल लागला तर हीच विंडो शॉपिंगवाली मंडळी उद्या भरपूर सेल देऊन जाईल व आपली विक्री होऊन नफा वाढेल, पैसा वसूल होईल.

तयार कपड्याचंच उदाहरण घेतलं तर प्रत्येक ब्रँड हा एका विशिष्ट वर्गासाठी तयार झालेला असतो. सर्व ब्रँड हे सर्वे करून, त्या विशिष्ट क्लासची आवड-नावड, दर्जा बघूनच त्याची निर्मिती केलेली असते. त्यासाठी सर्वेसाठी त्या कंपनीकडे वेगळा विभागच असतो. लोवर क्लाससाठी वेगळा ब्रॅण्ड, लोवर-मिडल क्लाससाठी वेगळा ब्रँड, मिडलक्लाससाठी वेगळा आणि अप्परक्लाससाठी वेगळा. आणि त्या क्लासनुसार त्या कपड्याच्या जाहिरातीसुद्धा तशाच तयार केलेल्या असतात. त्यामुळे ग्राहकच एकंदरीत व्यक्तिमत्व बघून हा ग्राहक कोणत्या क्लासचा आहे आणि आपला खरा ग्राहक आहे किंवा नाही हे सेल्समनला लगेच कळतं असत. किंबहुना त्यांना याची सवय झालेली असते. मग तेही त्याप्रमाणेच वागतात.

उदाहरण द्यायचे झाल्यास 'ऍर्रो' ह्या अप्परक्लासच्या शोरूममध्ये एखादा लोवर-मिडल क्लासचा ग्राहक विंडो शॉपिंगसाठी शिरला तर त्या शोरूमचे सेल्समन जागचे हालत नाहीत. एका जागेवर मठ बसलेले दिसतात. ग्राहकालाही थोडे आश्चर्य वाटते. तो सेल्समन आपल्या जागेवरून उठावा म्हणून हा विंडो शॉपर मुद्दाम उसना आवसान आणून जास्तच इंटरेस्ट दाखवतो. मग त्या शोरूमचा एक सेल्समन दुसऱ्या सेल्समनला इशारा करून ' तू दिखादे और कटा' म्हणून पाठवतो. मग त्या सेल्समनला खूश करण्यासाठी हा ग्राहकही एक-दोन महागडे टॅग बघून एखादी घडी विसकटून हा पॅटर्न त्या कलरमध्ये नाही का? तो कलर ह्या पॅटर्नमध्ये नाही का? असे सवाल करतो. खुपचं वेळ असेल तर एखाद्या चांगल्या कपड्याची ट्रायल मारून 'सेल्फी' काढून घेतो. एव्हाना त्याच्या फेसबुक डीपीची सोय आता झालेली असते. आता घ्यायचं तर नाही, मग 'नया स्टॉक कब आयेगा? ये टेक्चरमें वो कलर आते नही क्या? ' असे उपदेशाचे डोज पाजत ही स्वारी सटकण्याची तयारी करते. जणू 'नया स्टॉक' आला तर हे महाशय घेणारच! मग यदाकदाचित एखाद्याला खरंच एखादी वस्तू आवडलीच तर 'आज भलेही नाही पण आहेरासाठी एक दिवस सासरकडच्या मंडळीला इथंच आणून गाडतो', अस मनात बडबडत हा ग्राहक परत फिरतो.

आता दुसऱ्या शोरूमची बारी. येथील ब्रँड मिडल-क्लाससाठी आहेत आणि अप्परक्लासचा एक छोटं कुटुंब विंडो शॉपिंगसाठी शिरतं. लगेच सारखे युनिफॉर्म घातलेले सेल्समन जणू काही 'वरातीतील मंडळींचा' स्वागत करावं तशी पुढे पुढे येतात. आपुलकीने विचार करतात तसा हा ग्राहक फुगतो. अशा ग्राहकाकडून त्यांना खूप अपेक्षा असतात. मग एका कोपऱ्यात उभा त्यांचा मॅनेजर वरिष्ठ सेल्समनला खुणावून सांगतो की 'तू हँडल कर'. लवकरच थंड पाणी येते. 'क्यों सर बहोत दिनके बाद' असा सेल्समनकडून मस्का मारल्या जातो. आपल्याला सेल्समन ओळखतो अस समजून ग्राहकाच मूठभर मांस वाढत. तसा खरेदीसाठी प्रेशर बिल्ड-उप होतो. आता हा ग्राहक इकडे तिकडे फिरत, मध्येच मोबाईलवर बोटं फिरवीत, काही कपड्याचे टॅग न बघता मटेरियल दोन बोटात चुरगळत कट मारण्याची युक्ती शोधतो. मग सोबत बायको-मुले असतील तर एकदोन इंग्रजी वाक्य झाडून आपल्याला कपड्यातील जास्तच कळत या अविर्भाजात 'मी तुमच्याकडून फलांन-फलान वस्त्र घेऊन गेलो पण काही दिवसात ते फिक पडलं आणि मी त्याला फक्त चार-पाचदाच वापरून फेकून दिलं" अस सेल्समनला सांगून परतीची तयारी करतो. आपल्या पतीला काही घ्यायचं नाही आणि '५०% ऑफ' शिवाय ते काही घेणारबी नाही हे त्याच्या पत्नीलाही माहित असत, मग तीही थोडं 'पसंदच पडत नाही ना, नाहीतर घेतलं असत' असा अभिनय करून, तोंड वाकड करत बाहेर पडतात. मुलं लहान असली तर हे असले प्रकार बघून आपल्या ममी-पप्पानी उगीच त्या सेल्समन काकाला त्रास दिला म्हणून मनातल्या मनात रागावतात.

हल्ली प्रत्येक मॉलमध्ये मनोरंजनासाठी मल्टीप्लेक्स आहेत. सकाळ आणि दुपारची वेळ म्हणचे या मॉलसाठी रिलॅक्स टाइम असतो. थिएटर जरी चालू असलं तरी सेल्समनसाठी हा वेळ म्हणजे 'बॅकऑफिस किंवा अरेंजमेंट टाइम' असतो. मग अशातच काही प्रेमीयुगुल किंवा नवीन जोडपं विंडो शॉपिंगसाठी येतात. चकाचक प्रसन्न वातावरणासह त्यांना 'प्रायवसी 'सहीत इतर मनोरंजन उपलब्ध असते. मग ते एखाद्या शोरूममध्ये एंट्री मारतात. इकडे-तिकडे फिरून थोडे कपडे विचकटतात. दोघापैकी ज्याची इंग्लिश चांगली तो जरा जास्तच जोरात बोलून आपण किती ग्रेट हे जोडीदाराला दाखवत इम्प्रेस करत असतो. इंग्लिश बोलणारा सेल्समन भेटल्यामुळे त्याला हा मौका मिळालेला असतो. मग हे जोडपं टॅग बघून, डिस्काउंट बघत फिरत असतात. एखाद दुसऱ्या नवीन फॅशनची ट्रायल घेतात. '५०% ऑफ' चा बोर्ड बघण्यासाठी त्यांची नजर भिरभिरत असते. पण तसा डिस्प्ले कुठे दिसत नाही. तो पर्यंत सिनेमाची वेळ झालेली असते. मग 'ऑफर कब आयेगी, वगैरे' विचारपूस करून आपण ऑफर आली की नक्की येऊ अस वचन देऊन सटकण्याची तयारी सुरु होते. सिनेमाची वेळ, बघण्याची घाई आणि एकंदरीत हावभाव बघून हे आपले नसुन 'थिएटरचे ग्राहक' असल्याचं सेल्समनला कळलेलं असत. अशातच एखादा खोडकर सेल्समन असेल तर तो 'सर आपके शोका टाईम हो गया?' असं म्हणून ग्राहकांना आपली जागा दाखवून देतो! पण हल्ली ग्राहक हा राजाच, त्यामुळे असले प्रकार घडत नाहीत. कारण त्यामुळे ग्राहक कायमचा निघून जाण्याची शक्यता असते म्हणुन सेल्समन सबुरीने घेतात.

आज पुणे मुंबई सारख्या शहरात कितीतरी ठिकाणी मॉल आहेत. हे मॉल म्हणचे एक विरंगुळा आणि करमणुकीचे केंद्र बनले आहेत. मग कॉलेजची उडान मुलंमुली यात मागे कसे राहतील. मग चालू क्लास बुडवून, खोटनाट बोलून ह्या विध्यार्थ्याचं घोळक घंटोगणित मॉलमध्ये थोडंफार खाऊन पिऊन विंडो शॉपिंग करत असत. बिनदिक्कत एका ब्रॅण्डमधून दुसऱ्या ब्रॅण्डमध्ये. मग एस्केलेटरने वर, वर जाणाऱ्या एस्केलेटरने खाली, खाली जाणाऱ्या एस्केलेटरने वर असे प्रकार बघायला मिळतात. सेल्फी काढत, उडानगिरी करत आणि ओळखीच्या लोकांपासून नजर चुकवीत ही मंडळी बिंदास फिरत असते. त्यांच्या पॉकेटमनीची धाव फक्त फूडकोर्ट किंवा गेमझोनपर्यंतच आहे हे सर्व ब्रॅण्डच्या सेल्समनला माहित असत. यांना ओळखण्यासाठी वेगळ्या मानसशास्त्राची गरज असते. हे विध्यार्थी अगदी मोठया ब्रॅण्डमध्ये शिरतच नाही. आणि जरी कुठे विचारपूस करण्यासाठी ते गेले तर थोडंफार माहिती देऊन सेल्समन त्यांची बोळवन करतात.

शेवटी आणि परंतु खूप महत्वाचे. विंडो शॉपिंगचा खरा आनंद घ्यावा तो महिलानीचं! एकतर त्याच्याकडे स्टाईल, डिजाईन, कलर, पॅटर्न आणि मटेरियल याला 'इंफिनिटी' हि लिमिट कमी पडते. मग भैया इस कलरमे ये पॅटर्न नहीं है क्या? इस स्टाईलमे ये पॅटर्न, इस पॅटर्नमें ये कलर आणि इस डिझाईनमें यह कलर, और उस मटेरियलमें ये डिझाईन नही है क्या ? झालं! मग वस्तू पसंद पडण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी होऊन जाते. अशात त्यांच्या सोबत छोटी मुलं असली तर मम्मीची विंडो शॉपिंग होईपर्यंत मुलांचे लपंडावचे कितीतरी डाव झालेले असतात, त्यांना भूक लागलेली असते. यदाकदाचित पॅटर्न, डिझाईन, मटेरियल, स्टाईल, कलर, साईज या सर्व बाबीचं 'इंटरसेकशन' होऊन काही आवडलेच तर डिस्काउंटवर गाडी अडते. दुसरीकडे सोबतची मुलं 'मम्मा, हमे भूक लगी है' म्हणत मम्मीना बाहेर ओढत असतात. एकतर ग्राहक आणि वरून महिला म्हणून त्यांच्याशी रागावून न जाता, संयम ठेवत, विनम्र वागून आणि सौजन्याने सर्व दाखवण्याची कसरत सेल्समनला करणे भाग असते. छोट्या मुलांचा त्रास वेगळाच. शेवटी, 'नया स्टोक कब आयेगा, सेल कब लगेगा ? घरमे दो-दो शादिया है, बहोत खरेदी बाकी है, भैया, मै मेरा फोन नंबर देकर जाती हूँ!' अशी हमी देऊन त्या बाहेर पडतात. त्यांची विंडो शॉपिंग आणि मुलांचं हुदडन होऊन मोर्चा फूडकोर्ट कळे वळतो. सेल्समनलाही मुक्ती मिळते.
क्लास कोणताही असो हा मानवी स्वभाव आहे कि ग्राहकाला कोणतीही वस्तू कमी किमतीतच हवी असते. सर्वांना पैसा प्यारा असतो आणि तो काटकसरीने खर्च करणे यात काही गैर नाही. त्यामुळे सर्वांना ५०% किंवा त्यापेक्षा मोठी 'ऑफर' चा इंतजार असतो. मग एकदा का 'सेल' लागला कि गावखेड्यात लोक जसे एका वर्षासाठी पुरेल एव्हडा धान्यस्टॉक भरून ठेवतात तशी ही मंडळी भरपूर कपडे खरेदी करून स्टॉक करून ठेवतात. त्यामुळे सेल दरम्यान विंडो शॉपिंग कमी होते, शॉपिंगला उतू येतो.

बऱ्याचदा सेल्समनकडून ग्राहकाच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज चुकण्याची भिती असते. तेंव्हा सकारात्मक विचार करून सरसगट सर्वच ग्राहकांना चांगलीच वागणूक आणि माहिती द्यायची असा सल्ला मॅनेजर सेल्समनला देतात. कधी कधी हा अंदाज चुकून प्रकरण अंगलटही येतं. इतिहासात याचं एक चांगलं उदाहरण आहे, आणि ते सर्वश्रुत आहे. सन १९२० मध्ये राजस्थानच्या अलवरप्रांताचे राजा महाराज जयसिंग लंडनला फिरत फिरत रोल्सरॉयस कारच्या शोरूममध्ये जातात. त्यांचा साधा हिंदुस्तानी पेहराव, धोती बघून तेथील सेल्समन त्यांना व्यवस्थित बोलतं नाहीत आणि चांगली वागणूकही देत नाहीत. याचा त्यांना प्रचंड राग येतो. ते लगेच हॉटेलवर जाऊन पेहेराव बदलून पुन्हा त्याच शोरूममध्ये जातात, काही रोल्सरॉयस कार बुक करतात. त्या गाड्या भारतात आणून त्याला झाडू बांधून त्याचा उपयोग राजाच्या नगरातील कचरा टाकण्यासाठी केला होतो. ह्या बातमीला जगभरात प्रसिद्धी मिळून त्या रोल्सरॉयल कार ब्रॅण्डची पत घसरते. शेवटी त्या कंपनीची लोक टेलिग्राफने जयसिंग महाराजही माफी मागतात, प्रकरण निवळते.

वस्तू कोणतीही असो शोरूमवाल्याना विंडो शॉपर हे हवेच असतात. मुळातच ते गृहीत धरलेले असतात. कारण त्यातूनच उदयाचे खरे शॉपरस तयार होणार असतात. समाजात आर्थिक बदल होत असतात. आजचे गरीब उद्या श्रीमंत होतात. कालांतराने प्रत्येकाची ब्रॅण्डची निवड,आवड बदलत जाते. पगार, आय आणि त्यायोगे खरेदीची शक्ती वाढतच असते. त्यामुळे सेल्समन, त्यांचे मालक भविष्याचा विचार करून ही पेरणी होऊ देतात, आणि दीर्घ काळात त्याचं त्यांना चांगलं फळही मिळतच.

तर अशा या बिन पैशाच्या विंडो शॉपिंगला आपण येथेच स्टॉप देऊ.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
premshjaiswal@gmail.com   - - - - - - - - - - - -


Sunday, 5 August 2018

शिक्षणाचे बाजारीकरण

इंटरनेटने आम्हाला काय दिलं ?



विज्ञानातील नवनवीन शोध हे समाज आणि मनुष्यजीवन जीवन सुसह्य करण्यासाठीच असतात. मग तो अगदी सुरुवातीचा विस्तवाचा शोध असो की चाकाचा. जोपर्यंत विस्तवाचा शोध लागला नव्हता मनुष्य हा कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न खाऊन उपजीविका करत असे. कच्च,अस्वच्छ, बेचव शाकाहार किंवा मांसाहार करून विपरीत परिस्थितीतही मनुष्य तगून आणि त्या भौगोलीक परिस्थितीशी जुळवून घेत होता, मानवजाती टिकून होती. कालांतराने विस्तवाचा शोध लागला आणि एक मोठी क्रांती घडली. कच्चे अन्न-मांस खाणारा प्राणी आता भाजलेले, शिजवलेले अन्न, मांस खाऊ लागला, थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला अग्नीची ऊब मिळाली, जीवन सुसह्य झाले. जाळं करून तो फक्त अंधार नाही तर हिंस्र प्राण्यांपासूनही बचाव करू लागला. आता त्याची अचानक पडणाऱ्या अंधाराची भीतीही दूर झाली होती. 

विस्तवानंतरची मोठी क्रांती म्हणजे चाकाचा शोध. मानवजातीच्या उत्क्रांतीतील टप्याची ही एक महत्वाची घटना. चाकाच्या शोधामुळे मानवाला अनेक क्षेत्रात गती मिळाली. चाकावर चालणाऱ्या गाडीमुळे स्थलांतर करणे सोपे झाले, चाकावर मडके बनवने, फिरते चाकाचा वापर करून पाणी शेंदण्यासारखी कामे सोपी झाली. विशेष म्हणजे हे दोन शोध लागून क्रांती घडण्यासाठी कितीतरी काळखण्ड उलटून गेला होता, थोडक्यात बदलाची गती खूपच कमी होती. 

विज्ञानात जसे नवनवीन शोध लागत गेले तसे ह्या बदलाची गती वाढतच गेली. येथे दोन गोष्टी ध्यानात घेण्यासारख्या आहेत. एक बदल आणि दुसरं म्हणजे बदलाची गती. एका शतकामध्ये जे बद्दल झाले त्याच्या कितीतरी जास्त गतीने बदल फक्त मागील दहा वर्षात घडले. बदल होणे हे सहाजिक पण बदलाच्या गतीसोबत टिकून राहणे कठीण. उदाहरनादाखल सांगायचे तर लँडलाईन आणि मोबाईलच्या शोधात कितीतरी वर्षाचे अंतर आहे. पण किपॅडवाला मोबाईल ते टचस्क्रीन आणि त्यापुढील नेक्स्ट जनरेशन मोबाईल हे बदल काही महिन्यातच झाले. थोडक्यात इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाची गती अगाध आहे आणि यापुढे ती वाढतच जाऊन कुठे घेऊन जाणार हे अनिश्चित.

हा सर्व उपद्व्याप कशासाठी तर एकंदरीत दैनंदिन मानवीजीवन हे अधिकाधिक आरामशीर, सुसह्य व्हावं, कष्ट कमी पडावे यासाठीच. इंटरनेटचा शोध जरी १९६९ साली लागला पण भारतात आणि तेही साधारण तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेट पोहचण्यासाठी २००५ वर्ष उजाडले. आजही भारतातील काही अत्यन्त दुर्दम्यप्रदेशात ही सुविधा कदाचित पोहचली नसावी, तो भाग अलहिदा.

आज कळत न कळत, या बदलाची चव चाखत समाज हा इंटरनेटच्या आहारी जाऊन मानवीजीवन हे नेटमय होऊन तुम्ही आम्ही नेटकरी झालो आहोत, हे निश्चित. विज्ञानाचे शोध हे दुधारी शस्त्रासारखे असतात आणि त्याची कोणती बाजू वापरावी हे आपण ठरवायचे असते. दूरचित्रवाणीच उदाहरण घ्या. आपल्या सभोवतालच्या जगात घडणाऱ्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक घटनेची इतंभूत माहिती मिळावी, इतर जगाशी आपला एकेरी का होईना संवाद घडावा तसेच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावं ह्या सात्विक कामासाठी दूरदर्शनचा वापर होणे अपेक्षित होते. पण घडले भलतेच. मूळ उद्देश बाजूला राहून आज दूरदर्शन म्हणचे निवळ मनोरंजनाचे साधन झाले आहे. दिशा भरकटलेलं मनोरंजन, पचनी न पडणाऱ्या भडक बातम्या, विविध पक्षधार्जिणे वाहिन्या, किळसवाणा मनोरंजन व न संपणाऱ्या जाहिराती असे प्रकार घडत आहेत.

हीच गत आज इंटरनेटचीही झाली आहे. इंटरनेटमुळे जग जरी एका खेड्यासारखे वाटत असेल पण त्याच्या अति वापरामुळे समाज दुरावला आहे. ९०च्या दशकात तुरलीक लोकांकडे इंटरनेट होता. त्याचा प्रसार तळागाळात पोहचला नव्हता त्यामुळे उद्योग आणि कार्यालयीन कामासाठी, इ-मेल साठी त्याचा उपयोग होई. देशी-परदेशी कंपन्याचे पत्रव्यवहार, डाटा ट्रान्सफरसाठी त्याचा खूप उपयोग होई. तोपर्यंत जास्त वेबसाईट, इ-शॉपिंग असले प्रकार विकसित झाले नव्हते. झपाट्याने वाढणारी माहिती तंत्रज्ञानाची गती बघून कालांतराणे प्रत्येक व्यापारी-उद्योजकाने नेटचा वापर सुरू केला. आपण त्यात मागे कसे म्हणून सर्वच उद्योग जगतातील कँपन्यानी आपली माहितीची वेबसाईट नेटवर उपलब्ध केली. त्यामुळे इंटरनेट हे फक्त कम्युनिकेशनच्या परिघात राहता त्याच्या कक्षा अफाट रुंदावल्या, आज नेट नको त्या क्षेत्रात वाढत आहे. आज अस कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथे इंटरनेट नाही. त्यातच निरनिराळे अँप्लिकेशन(अँप्प) उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक काम हे आज अँप करत आहेत. या अप्पच्या नादात विध्यार्थी आपलं डोकंही एक अप्प आणि ते वापरून आपण खूप काही करू शकतो हे विसरले आहे.

रेस्टिंग इज रस्टिंग. आज एकंदरीत सर्वच कामं नेटयुक्त झाल्यामुळे साहजिकच श्रम आणि हालचालीं मर्यादित झाल्या आहेत. बँकेत, सिनेमासाठीच्या तिकीटाच्या रांगा बंद, टॅक्सीसाठी बाहेर जाणे बंद, किराणा सामान घरीच उपलब्ध एव्हढच नव्हे तर चार नेटकरी मित्र एक दुसऱ्याला न भेटता मोबाईलवर गेम खेळू शकतात. त्यामुळे आंगण किंवा मैदानाची गरज नाही. त्याचाच परिणाम आज मुलांना एखादं छोट गणित जरी विचारलं तर ते आधी मोबाईल हातात घेतात. एखाद्या वाण्याच्या दुकानाचा पत्ता जरी विचारला तर जीपीएस लावतात त्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली आणि संवादाला मर्यादा आली आहे. मोबाईल सर्वच गरजा पूर्ण करणारा 'अल्लादिनच्या चिराग' झाल्यामुले मुलांना आता इतर वस्तूंची गरज उरली नाही. एव्हढच काय जर शेजारी कुणी वारलं तर लगेच व्हाट्सप्प, फेसबुकवर RIP RIP टाईप करून मोकळे. कॉपी-पेस्टमुळे टाईप करायची गरज नसते. शरीराच्या बौद्धिक तसेच शारीरिक वाढीसाठी श्रम आवश्यक असतात. हल्लीची तरुण मंडळी सर्व कामे मोबाईलवर करतात. त्यामुळे काही बोटाचा व्यायाम सोडला तर शरीराची पाहिजे तशी हालचाल होत नाही. एखादा खिळा न वापरता गंजून जाण्यासारखा हा प्रकार आहे. बुद्धी, शरीराने श्रमच केले नाही तर त्याचा विकास कसा होणार.

थोडक्यात दुःखी, कष्टी मनुष्यजीवन सुसह्य करणारा नेट हे स्वतः आज एक आजाराच कारण बनले आहे. आजारापेक्षा इलाज भारी असा हा प्रकार आहे. पूर्वी खेड्यातील परिस्थितीत शहरांपेक्षा वेगळी असायची. पण विद्युतीकरण आणि नेटच्या जाळ्यामुळे हि तफावत कमी झाली. त्यामुळे ग्रामीण, खेड्यातही परिस्थिती वेगळी राहिली नाही. खेड्यातील मुलांना एका दिवसात दीड जीबी डाटासुद्धा कमी पडत आहे. एकीकडे शिक्षणाची बोंब असताना फुकटात मिळणारा हा डाटा एकदरीत पूर्ण दिवस खाऊन जात आहे. स्वस्तात मिळणारा हा डाटा शेतातील कामातही अडचण बनत आहे. शेतातील कामे, नांगर, वखरणाऱ्या हातात आज फक्त मोबाईल खेळत आहे. गल्लीबोलीत, चावडीवर, कट्ट्यावर आठ-दहा मुलं बसले असतील तर त्यांच्या सर्वांच्या माना ह्या एका ओळीत मोबाईलवर गुंतलेल्या दिसतात. फेसबुक, व्हाटसप, गुगल आणि गेम यापुढे त्यांना काही सुचत नाही. 

आज तंबाखु, दारूच्या व्यसनाइतकंच भयंकर रौद्ररूप या नेटच्या व्यसनान घेतलं आहे. रोज त्याबद्दल बोललं लिहिलं जात ते या मुळेच. ' अति सर्वत्र व्रजयेत' तेंव्हा मर्यादेपेक्षा वापर हा व्यसनला जन्म देतो. पुढं हे व्यसन मानसिक आजार बनून पेशन्ट निर्माण करतं. त्यामुळे आज गरज आहे की आपण सर्वांनी हा धोका लक्षात ठेवून याबद्दल वेळीच पाऊलं उचलून हा अतिरेक थांबवावा. मनाचा ब्रेक सर्वोत्तम ब्रेक, तो लावून फेसबुक व व्हाट्सप्पचा अतिरेक थांबवावा. इंटरनेट किंवा तत्सम तांत्रिक उपकरनानी कितीही प्रगती केली तरी ती मानवतेची जागा कदापि घेऊ शकत नाही. एखादं यंत्र मनुष्यपेक्षा हुशार होऊ शकत पण त्यात माणुसकी येऊ शकत नाही.

द ग्रेट डिक्टेटरमध्ये चार्ली चॅप्लिन म्हणतो, ' लोभाने मानवाचे आत्मे पोखरलेत. जगभर द्वेष पसरलाय. आपण गति वाढवली, पण स्वतः त्यात कैद झालो.भरपूर उत्पादन करणारी यंत्र आपली सततचा हाव वाढवत बसली. ज्ञानामुळे आपण सिनिकल झालो. आपण खूप विचार करायला लागलो आणि आपल्या खूप कमी जानीवा उरल्या. आज आपल्याला यंत्रापेक्षा जास्त मानवतावादाची गरज आहे. हुशारीपेक्षा दयाळूपणाची जास्त गरज आहे. या शिवाय आयुष्य आणि पर्यायानं मनुष्यजात संपून जाईन. मनुष्याला करायला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल अस जग आपल्याला हवंय. जिथे विज्ञान आणि मानवाचा विकास हातात हात घालून जाईल. असं जग घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, एकत्र येऊ'.

©
प्रेम जैस्वाल पेडगावकर  
   ९८२२१०८७७५   
(एस्पी अकॅडमी संस्थेचे संचालक व करियर मार्गदर्शक, पोस्ट नावासह सामायिक करू शकता)

संजूबाबत.....





प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

*समाजात तुम्ही कोणासोबत राहता त्यापेक्षा* 
*कोणासोबत राहत नाही हे तेव्हडच महत्वाचं*

हे ज्यांना पटत त्यांनी संजू हा सिनेमा बघायला हरकत नाही. कारण यापूर्वीही दहशतवादी, देशद्रोही, माफिया, इनकाउंटर, आणि इतर गुन्हेगारी जगतावर आधारित भरपूर चित्रपट आले आणि बरेचसे आपण पाहिले आहेत. उदा. सत्या, कंपनी,अबतक छप्पन, इ. एरव्ही गुन्हेगारी जगतावर आधारित कितीतरी पुस्तक आपण वाचतच असतो. या वाचण्यामागील कारण आणि हेतू वेगळा असतो. हे गुन्हेगारी अंडरवर्ल्ड विश्व कस चालत असावं, कशी सुपारी घेतल्या जाते, गेम कसा करतात, एन्काऊंटर म्हणचे काय याची उत्सुकता सामान्य जनतेला असते. कित्येकांना तर ही अंडर्वल्डची लोक कशी दिसतात, भाई कसा राहतो, तो कसा वागतो, भाईचा खालच्या लोकांशी वागणे कसे, पोलिसांशी कसा व्यवहार असतो, जेलमधलं जीवन कस असत, आणि मुख्य म्हणजे हे निर्दोष कसे सुटतात हे कळायला दुसरा मार्ग नसतो म्हणून असे चित्रपट बघून त्यांची ही भूक शमते.
बॉलिवूडतर्फे ऑस्करसाठी पाठवलेल्या आणि चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'मदर इंडिया' ह्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रमुख नायक-नायिका नर्गिस आणि सुनील दत्त या दिग्ग्ज कलाकाराचा संजय हा मुलगा. नर्गिस-सुनील दत्त हे हिंदी चित्रपटाचे उत्कृष्ट कलाकार. चित्रपटसृष्टीत सुनील दत्त एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पुढे काँग्रेसच्या तिकिटावर सुनील दत्त खासदारही झाले. बहीण प्रिया दत्तही खासदार म्हणून सर्वपरिचित. कोणतीही गुन्हेगारी घराण्याची पार्श्वभूमी नसताना, समाजातील आदर्शव्यक्ती पालक असताना संजय दत्तसारखा मुलगा गुन्हेगारी जगात ओढल्या जातो आणि त्या चक्रव्यूहात एव्हडा आत शिरतो कि देश बरबाद करणाऱ्या गुंडांचा तो साथीदार बनतो. त्याचे नाव अंडरवर्ल्ड आणि देशद्रोह्यांसोबत जोडले जाते. तसे चित्रपट आणि अंडर्वर्ल्डचे घनिष्ट संबंध खूप जुने आहेत. सत्तरच्या दशकात जेंव्हा चित्रपटसृष्टी बहरात आली तेंव्हापासून हाजीमस्तानसारखे तस्कर चित्रपटसंबंधीत लोकांच्या संपर्कात असत. जिथे अडमाप पैसा तिथे अंडरवर्ल्ड असणे साहजिक. नेहमी देश-विदेशातील कार्यक्रमात, प्रोग्रॅम-इव्हेंटच्या निमित्ताने या लोकांच्या भेटीगाठी होत असतात. कित्येक आघाडीच्या कलाकारांच्या अंडरवर्ल्डच्या संबंधाच्या बातम्या फोटो आपण वृत्तपत्रात बघत असतो. पण आजही अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जे अशा गोष्टींच्या आहारी गेली नाहीत. त्यांनी थोडा दुरावा ठेवला. कदाचित त्यामुळे त्यांना चांगले चित्रपट मिळाले नसतील, कारकीर्द बहरली नसेल, पण तत्वांशी तडजोड मात्र त्यांना जमली नाही. *कळत ना कळत जीवनात कधी कधी वाईट व्यक्तीच्या, व्यसनाच्या सान्निध्यात आलोच तर आपण कुठे थांबायचे हे आपल्याला कळले पाहिजे.* संजय दत्तला हे जमले नाही आणि तो फसला. चित्रपटसृष्टीच ग्लॅमर , कलाकारसोबत वावरणं हे अंडरवर्ल्डनाही खूप आवडतं. चित्रपट निर्मात्यांना लागणारा पैसा तसेच स्पर्धकाला धाक, दडपण्यासाठी गुंडांची गरज असते त्यामुळे ते अंडरवर्ल्डचा सहारा घेत असतात. याची परतफेड म्हणून चित्रपटात कोणते नायक-नायिका घेण्यापासून तो कुठे कसा रिलीज करायचा, आपली भागीदारी किती हे सर्व गणित अंडर्वर्ल्डच ठरवत. त्यांच्या मनासारखे घडले नाही तर खास बातम्या आपल्याला आयकू येतात, उदाहरण द्यायचे असतील तर गुलशनकुमारचा खून, एका अभिनेत्रीची आत्महत्या, राकेशरोशनवर झालेला हमला आणि काही कलाकाराचे बरबाद करियर! थोडक्यात लॉगीन जरी चित्रपटसृष्टीच असेल पण ओटीपी हा अंडरवर्ल्डकडूनच यायचा असतो, अर्थात याला काही अपवादही आहेच. 
हा चित्रपट परवा रिलीज झाला. ठरल्याप्रमाणे गुन्हेगारी जीवनावर आधारित 'संजू' वर टिकेची झोड उठणे साहजिकच होते. 'बायोपिक' आणि तोही एका सराईत गुन्हेगारावर आधारित! अस कोणतं गुन्हेगारी क्षेत्र जे संजयने पादाक्रांत नाही केलं असेल. खरं म्हणजे चित्रपट किंवा टीव्ही मालिका ह्या समाजाच्या आरशासारख्या असतात आणि समाजात काय घडतंय हे त्या दाखवत असतात. प्रत्येक चित्रपटामध्ये एक संदेशही असतो. खलनायक चूक असेल तर त्यास शिक्षा, ज्याने पाप केलं त्याच वाईट होणे, नायकाने काही चूक केली तर त्यास शिक्षा, शिक्षणाने भलं होणे, अशिक्षिताच नुकसान होणे, वगैरे वगैरे. 
पण चित्रपटाचा हेतूच फक्त गल्ला भरण्याचा असेल तर मग नितीमत्ता, मूल्य बाजूला राहतात. आणि ह्या चित्रपटातही हिरानीनेही वेगळं काही केलं नाही. त्यामुळे स्वतःचा गल्ला भरण्यासाठी देशद्रोहीसारख्या गुन्हयात अडकलेल्या गुन्हेगारांचे उद्दातीकरन करणे चूकच. चित्रपट निर्मात्याला खरोखरच समाजाचीच काळजी असती तर एखादा बायोपिक समाजाला नवी दिशा देणाऱ्या क्रांतिकारकावर, खेळाडू, पत्रकार, समाजसेवक, साहित्यकावरही तयार झाला असता, आणि तसे बायोपिक आपणे पाहिलेही आहेत उदा.एमएसधोनी, भाग मिल्खा भाग इ. आजही बऱ्याचशा मोटिवेशनल प्रोग्रॅम मध्ये या चित्रपटाचे उदाहरण दिल्या जातात. समाज घडवण्यामध्ये चित्रपट, मालिका, साहित्य आणि समाजातील जबाबदार व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते. कारण समाज यांचेच अनुकरण करत असतो. मागील काही दिवसात घडलेल्या भय्यूमहाराज, हिमांशू रॉययावर होणाऱ्या नकारात्मक टीका याचेच उदाहरण आहे. कारण त्या समाजाच्या जबाबदार व्यक्ती होत्या, त्याकडून हे कृत्य अपेक्षित नव्हते.
प्रक्षेपित होणारा चित्रपट प्रेक्षकासाठी चांगले कि वाईट हे ठरवण्यासाठी आपल्याकडे सेंसारबोर्ड आहे. चित्रपटसृष्टीतील नामांकित मंडळी या बोर्डाचे सदस्य असतात. पण मागील काही घटना बघता या बोर्डाची विश्वासहर्ता राहीली नाही. निवडून दिलेल्या राजकर्त्याचे हस्तक आता बोर्डाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे पक्षाचा खिसा भरला तर सर्वकाही साध्य होत. तसेच चित्रपटउद्योगात एकमेकांचे एव्हडे संबंध आणि हेवेदावे असतात की ते आपल्या आप्तमंडळीचे चित्रपट अडवू शकत नाही. एके काळी फक्त सलवार-कमीज परिधान केलेल्या नायिकेने दुपट्टा घेतला नसल्यामुळे ते दृष्य कापणारा सेंसार, नायकाच्या तोंडून 'साले' हि शिवी निघाली म्हणून चित्रपट प्रक्षेपित न होऊ देणारा सेंसारची भूमिका आज वादातीत आहे. आज साले आणि त्यापुढील शिवी असल्याशिवाय चित्रपट आणि गाण्यात थ्रिल येत नाही. बदल मान्य पण तो कुठे? जर पैसा कमवणे हाच चित्रपटाचा हेतू असेल मान्य पण समाजाने या चित्रपटातून काय शिकायचंय हा उद्देश असेल तर खरच कठीण आहे. कारण समाज हे चित्रपटाचे अनुकरण करतच असतो.
दुसरं म्हणजे, या चित्रपटाचा उदोउदो करणारी काही मंडळी असे बोलून हात झटकु शकते कि चित्रपटनिर्मात्याने जे दाखवायच ते दाखवलं त्यातून काय घ्यायचं, काय शिकायचं आणि काय सोडायचं ते प्रेक्षकांने ठरवावं. काही दिवसापूर्वी टीव्ही मालिकावरील अश्लील, भडक दृशाबद्दल टीकेची झोड उडाली होती तेंव्हा एका गाजलेल्या मराठी नायकेने (कदाचित रेणुका शहाणे), 'रिमोट तुमच्या हातात आहे' असे बोलून अकलेचे तार तोडले होते. जर हिच भूमिका चित्रपटसृष्टीच्या लोकांची असेल तर मग सेंसारबोर्डची गरजच काय? चला मान्य करू कि 'चहा गाळताना पिण्यासाठी योग्य चहा खाली पडतो पत्ती मागे उरते आणि सुफात धान्य पाखडताना उपयोगी धान्य मागे राहून कचरा निघून जातो, मग चाळणी वापरावी कि सुफ हे प्रेक्षकांने ठरवावे'! पण चित्रपट पाहताना सर्व प्रेक्षकमंडली हे सुफच वापरतील हे ग्राह्य धरणे चूक. थोडक्यात समाजाच्या नित्तीमुल्याचा ऱ्हास होतो तो असा. गुन्हेगारी वाढते ती अशी. 
थोडक्यात मूल्याचे रक्षकच भ्रष्ट झाले तर वेगळं काही घडने कठीण आहे, असो.