ad1

Saturday, 30 May 2020


        
 


 शिक्षण क्षेत्रात बदल आवश्यक


कोरोना विषाणू वर मात करणाऱ्या लसीचा जो पर्यंत शोध लागत नाही तो पर्यंत या रोगापासून स्वतःचा बचाव करणे एव्हडच आपल्या हातात आहे. वाढत जाणारी टाळेबंदी हा काही कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. उलट या टाळेबंदीमुळे सर्व उद्योग बंद पडून देश आर्थिक संकटात लोटला जाण्याची भिती आहे. 'जान है तो जहाँन है' असं असलं तरी त्यामुळे जीवन जगणंच सोडून द्यावं का? सध्या देशाची प्राथमिकता फक्त आरोग्य असलं तरी देशाचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कोरोनाच्या निमित्ताने का होईना शेवटी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याची संधी स्वतःहून चालून आली. खरं म्हणजे 'शिक्षणाचे बाजारीकरण' 'शिक्षणाचा गोरख धंदा' 'पोकळ शिक्षणव्यवस्था' अशा विषयावर शेकडो वांझोत्या चर्चासत्र झडून हा विषय अगदी गुळगुळीत झाला आहे. पण प्रत्येक्षात पाहिजे तशी अंमलबजावनी झालीच नाही.  फक्त संस्थाचालक आणि शिक्षकांच्या उदरनिर्वाहनाच साधन बनलेल्या शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठीच ज्ञान दुय्यम स्थानी राहून त्यांच्या परीक्षा व पदव्या एव्हडच काय ते उरलं आहे.

गरज अविष्काराची जननी आहे. त्यामुळे या टाळेबंदीमध्ये पारंपरिक चॉक, बोर्ड, टॉक या पद्धतीला तात्पुरतं बाजूला करून कदाचित संपूर्ण ऑन-लाईन शिक्षण देण्याचा शासनाचा विचार होत असेल, पण ही पद्धत किती प्रभावी आहे याचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा. कालपर्यन्त मोबाईल सारख्या घातक सवयीला बेंबीच्या देठापासून ओरडून विरोध करणारे आपण आज छोट्या विद्यार्थ्यांना स्क्रीन-फ्रेंडली व्हायला सांगत आहोत. हे किती बरोबर होईल? चंचल वयाचे विद्यार्थी सतत मोबाईल वापरत असतांना त्यावर नियंत्रण कुनी करायचं? कदाचित पुढे चालून 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असं नको व्हायला!

सत्तर पेक्षा जास्त वर्ष झालीत या जगातील सर्वच गोष्टी बदलल्या. यंत्र बदललं, तंत्र बदललं.  पण आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेत पाहिजे तसे बदल घडलेचं नाही. ब्रिटिश शासनाचं कारकून बनवण्याचं कॉपी-पेस्ट शिक्षण आपण आहे तसेच पुढं चालू ठेवलं. भराभर पुस्तक घोकून आणि तेच परीक्षेत ओकून, घोकंपट्टी करून ९८% मार्क घेऊन उत्तीर्ण होणारी पिढी तयार होत गेली. व्यवहारशुन्य असलेल्या या शिक्षणात फक्त एक पोकळ पदवीधर तयार करण्याचीच क्षमता आहे. पदवी आणि स्नाकोत्तर शिक्षण घेऊनसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारीक ज्ञानाचा अभाव दिसतो. या पेक्षा मोठी ती शोकांतिका कोणती? 

आज उच्च शिक्षित पदवीधारक विध्यार्थ्यांना  जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस निरीक्षक सारख्या जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे कार्य माहित नाही. गरज पडल्यास त्यांना संबोधून एक पत्रही ते लिहू शकत नाही.  मोजमाप साहित्याचा वापर करून आपण ज्या घरात राहतो त्या घराचं एकूण क्षेत्रफळ ते मोजू शकत नाही.  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला कैंचीने काही कापता येत नाही की एखाद्या दोरीची गाठ मारता येत नाही. जीवनावश्यक असलेले योग-प्राणायाम आणि त्याचं महत्व किती विध्यार्थ्यांना माहित आहे?  किती विद्यार्थ्यांना पोटापूरता स्वयंपाक करता येतो? किती विद्यार्थ्याना आपल्या घरातील विजेच्या उपकरणाची ईतंभूत माहिती आहे. वीज बचत काय आणि वीजमीटरची नियमित रिडींग घेऊन ती बचत कशी करावी, याचं ज्ञान किती विद्यार्थ्यांना आहे. आपल्या घरात येणाऱ्या पाण्याचे स्रोत कोणते? घरात येणाऱ्या पैशाचे स्रोत कोणते, पैशाची काटकसर, बचत कशी करावी? किती विद्यार्थ्यांना त्यांच्या नातेवाईकांची संपूर्ण माहिती आहे?  किती विद्यार्थ्यांनी आणीबाणीच्या काळी कामी येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात? वरवरून स्मार्ट पण आतून पोकळ शिक्षण घेतलेले हे विद्यार्थी व्यावहारिक ज्ञानात अगदी 'बिग झिरो' असतात. दोन वर्षांपूर्वी  'एन्युअल स्टेट्स ऑफ़ एजुकेशन रिपोर्ट' प्रकाशित झाला. त्यानुसार देशातील विद्यार्थ्याची विदारक स्थिती अशी : २५% विद्यार्थ्याना मातृभाषेत वाचता येत नाही, ४३% विद्यार्थ्याना भागाकर येत नाही. ४४% विद्यार्थ्याना मोजमाप येत नाही. ३६% विद्यार्थ्यांना आपल्या देशाची राजधानी माहित नाही. ५८% स्वतःचे राज्य माहित नाही. आणि मुख्य म्हणजे 72.6% विद्यार्थी मोबाइलचा वापर करतात. अशी स्थिति असतानाही जगात विज्ञानं आणि इंजीनियरिंगमधे पदवी घेणार्यांची संख्या भारतात सर्वाधिक, हे विशेष.

आपत्ती व्यवस्थापनाची गरज आज सर्वांनाच आहे. जीवनात संकट येतील आणि जातील, पण अशा परिस्थितीला सक्षमपणे खंबिर तोंड देण्याची कला उद्याच्या नागरिकांना नको का यायला? गेल्या वर्षी सुरतमध्ये आगीची मोठी घटना घडली. एका कोचिंग क्लासमध्ये दहावीत ९० ते ९९% टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्या आगीत दुर्दैवाने करून अंत झाला. ३० फुटाच्या उंचीवरून काही कल्पकता वापरून सुखरूप खाली कसं उतरावं याचा साधा विचार ते  विद्यार्थी करू शकले नाही. खरं तर पाच जीन्सला किचैन-चावीच्या रिंगणी एकमेकाला जोडून त्यांनी सहज खाली येण्याचा किमान प्रयत्न केला असता तर अनेक जीव वाचू शकले असते. असो.

थोडक्यात सांगायचे झाल्यास हि वेळ बदल करण्याची आहे.  ऑफ-लाईन घोकंपट्टीच्या जागी ऑन-लाईन घोकमपट्टी सुरु करुन काहीही साध्य होणार नाही. शेवटी विध्यार्थी हे पहिल्यासारखे परिक्षार्थीच राहतील. गरज आहे की विद्यार्थ्यांना त्याच्या घोकंपट्टीच्या चाकोरीतून बाहेर काढून जीवनावश्यक व्यवहारिक ज्ञान शिकविण्याची. त्यासाठी त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही. या टाळेबंदीमध्ये ते आपल्या घरात राहूनही ते ज्ञान संपादित करू शकतात. त्याला थोडं ऑन-लाईनशिक्षणाची जोड द्यावयास हरकत नाही. एक प्रयत्न म्हणून का होईना आगामी शैक्षणिक वर्षासाठी शासनाने हा प्रयोग करून बघावा. या शिक्षणात एकंदरीत सर्व जीवनावश्यक विषयाच्या प्रात्यक्षिक सह सर्व बाबीचा समावेश करावा. शासनाने सर्व इयतेसाठी चढत्या क्रमात योग्य असा सिलॅबस आखून तो सर्व शाळेना सोपवावा. सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्याचे १०-१० असे गट तयार करून त्यांच्या घरील कार्यावर नियमित मार्गदर्शक, निरीक्षक व शेवटी परीक्षक म्हणून कार्य करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान नं मिळता खरोखरंच ज्ञान मिळेल. प्रत्येक्ष कृतीमधून मिळणार ज्ञान हे पुस्तकी ज्ञानापेक्षा कधीही उत्तमच. साहित्यातील नोबेल प्राईज मिळालेले रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनमध्ये या प्रकारेच शिक्षण द्यायचे. तसे झाडावर चढण्याचे, पोहण्याचे किंवा सायकल चालविण्याचे प्रशिक्षण देणारं पुस्तक माझ्या ऐकिवात नाही. आणि हे जीवनावश्यक नाही असं कुणी म्हणणार नाही. या प्रक्रियेत विध्यार्थी फक्त घोकून परीक्षा देणारा परीक्षार्थी न बनता एक ज्ञानी शिष्य बनतील तर शिक्षक गुरुच्या रुपात येतील.

खरं तर हिच मोजपट्टी व्यावसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेसाठी उपयोगात आणावयास हरकत नसावी. एलएलबी, अभियांत्रिकी, वास्तूविशारद सारख्या व्यावसायीक शिक्षणाची बोंब या पलीकडची आहे. एलएलबीचं शिक्षणाची पदवी घेतलेल्या वकिलांना किमान पाच वर्षे ज्युनियरशिप करावी लागते, का? अभियांत्रिकी केलेले अभियंते एक घन फूट म्हणजे किती घन इंच हे साधं गणित विश्वासाने सांगू शकत नाहीत. अशा पोकळ शिक्षणाच्या पदवीची भेंडोळी घेतलेली उच्चशिक्षित बेकार मंडळी नोकरीसाठी वनवन फिरताना दिसतात. यासं कोण जबाबदार? विद्यार्थी की त्यांना पोकळ शैक्षणिक पदव्या देणाऱ्या गल्लेभरु शिक्षणसंस्था?

पुन्हा सांगावंसं वाटतं कोरोनामुळेचं का होईना शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची सुवर्ण संधी स्वतः होऊन चालून आली आहे.  शिक्षण क्षेत्राची भाकरी फिरवली नाही तर करपून जाईल. याला एक संधी समजून शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्राला बदलून टाकण्याची आज नितांत गरज आहे. शैक्षणिक धोरण ठरवताना सारासार संस्था-शिक्षकांच्या पोटापाण्याचा विचार न करता देशाचं भविष्य घडवणाऱ्या उद्याच्या नागरिकांचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा.  शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या मंडळींनी विद्यार्थ्यांना उद्याचे फक्त मतदार न बनवता ते देशाचं उत्तम मनुष्यसंसाधन कसं बनेल यावर गहन विचार करावा. असं जेंव्हा घडेल तेंव्हाच शिक्षणाला 'अच्छे दिन' आलेत असं आपण मानू.

© प्रेम जैस्वाल. मो.९८२२१०८७७५
(लेखक 'एस्पी अकॅडमी' औरंगाबाद या शैक्षणिक संस्थेचे संचालक असून करियर विषयक सल्लागार आहेत. नावासह हा लेख सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)

Friday, 22 May 2020


                  

           कोरोना  काय शिकवतोय?

नुकताच मधुमेह रुग्ण झालेल्या माझ्या मित्राला मी खूप आस्थेने विचारलं,  मधुमेहाने तुला खूपच त्रास होत असेल नाही? या आजारांने तुझ्या जीवनावर खूपच निर्बन्ध लावले असतील. त्यावर त्याच उत्तर होतं- मुळात मधुमेह हा आपल्याकडे मित्र म्हणून येतो. माझी आत्तापर्यंतची जीवनशैली खूपच चुकीची होती म्हणून मी मधुमेही रुग्ण झालो. आता हा मित्र माझ्या सोबत राहणार आहे त्यामुळे माझं जीवन आता अतिशय शिस्तबद्ध झालं. मी नित्य नियमाने योगा-प्राणायाम, व्यायाम करतो. प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून शरीरासाठी जे योग्य तेच खातो. शरीराच्या प्रत्येक अवयवाची योग्य काळजी घेतो, इत्यादी इत्यादी. यदा कदाचीत माझ्या मधुमेहाच निदान झालं नसतं तर माझ्या जगाण्यात शिस्त आली नसती. पुढे कदाचित मोठ्या संकटाला मला तोंड द्यावं लागलं असतं. हे एकूण मी चाट पडलो. या मधुमेहामुळे खचून न जाता माझ्या मित्राने त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने बघितलं होतं. म्हणजे हा मधुमेह त्याच्या जीवनात एक गुरु होऊन आला आणि त्याने त्याला सुतासारखं सरळ करून टाकलं. जे काम इतर कुणीला जमणार नव्हतं, ते त्या मधूमेहानं केलं! थोडक्यात जीवनातील संकट आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी आलेली असतात.  अर्थात हा लेख कोरोना विषाणूमुळे झालेल्या आपल्या जीवनातील बदला बद्दल आहे.

तसं कोरोना पूर्वीच आपलं जीवन खरोखरच खूप शिस्तप्रिय होतं का? किती जण आपले घाणेरडे हात  नित्य नियमाने स्वच्छ धुवायचे? किती कुटुंब आपलं घर स्वच्छ ठेवायचे?  आज कोरोना वगळता देशात इतर आजाराचे रुग्ण अत्यल्प आहेत. कारण आहे- आपलं सततच निर्जंतुकीकरण,शुद्ध हवा, सात्विक घरचं जेवण आणि उत्तम जीवनशैली. 'आरोग्यम धन संपदा' हे आता आपल्याला कळून चुकलं, किंबहुना कोरोनाने ते आपल्याला शिकवलं!     नाहीतर पोटात थोडी कळ आली की आपण इस्पितळ गाठायचो.  मग सुपर-स्पेशियालिस्ट, टेस्ट, सोनोग्राफी आणि शस्त्रक्रिया अशा त्या खर्चिक दुष्टचक्रात अडकुन पडायचो. मग या चक्रातून तुम्हाला कुणी मुक्त केलंय? यापुढे शासनाच्या बजेटमध्ये आयोग्यविषयीचा खर्चात मोठी वाढ होईल. तसं देशाची आरोग्यव्यवस्था सुुुधारन्याचं श्रेय कोरोना विषाणूलाच जातं.

कोरोना हा कुणालाही सहज होणारा आजार नाही. जर तुम्ही शिस्तबद्ध आयुष्य जगत आहात, नियमाच काटेकोर पालन करत आहात तर तो विषाणू तुमच्याजवळ फ़िरकनारच नाही. तो स्वतः होऊन शरीरात शिरत नाही. नित्य व्यायाम, प्राणायाम, आहार-विहारात बदल केल्यास आपण त्यापासून मुक्त राहू. आणि यदा कदाचित तो शरीरात शिरला तर उत्तम प्रतिकारशक्तीने तुम्ही त्यावर सहज मात करू शकता.

भौतिक सुख आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या मोहात अनेक कुटुंब गाव-खेड्यातूंन शहराकडे वळली. एकत्रित कुटुंब व्यवस्था काळात जमा होऊन विभक्त कुटुंब तयार झाली. घरची सुखाची भाकर सोडून, वृद्ध माता-पित्याला आहे त्या अवस्थेत सोडून ती शहराकडे वळली. 'माझं मौतीलं येणं होत नाही, मला फक्त अंत्यविधीचा व्हिडिओ पाठवा' येथंपर्यंत या नवीन पिढीची मजल गेली होती. अशा वाया गेलेल्या पिढीचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी एखाद्या विद्वान गुरूची समुपदेशन विद्या कमी पडली असती.  आज कोरोनामुळे का होईना अशा कुटुंबातील सदस्याना गावाची आठवण झाली. मुलं-सुना शेकडो मैलाची पायपीट करून गावाकडे वळली. चटणी-भाकर खाऊनच पण आज माय-बाप, मुलं-सुना, आणि नातवंड एकत्र जेवताना दिसत आहे. गांधीजी आणि आताच्या काळात सर अब्दुल कलाम नेहमी सांगत,'खरा भारत खेड्यात आहे'. पण लोकांचे कान बधिर झाले होते. चांगली बागायती वहितीची जमीन विकून लोंढा शहराकडे वाहत होता. गावात शेतंकामासाठी मजूर मिळत नव्हते. शहरी मंडळी मूळ गावाकडे वळल्यामुळे पुन्हा गाव-खेड्याला तसेच शेतीला 'अच्छे दिन' येण्याचे चिन्हे दिसत आहे. कुणामुळे हे घडलं 
सार ?

'आजी, आमच्या उठण्या आधीच सकाळी बाहेर जाणारे आणि खूप उशिरा घरी परत येणारे ते पुरुष व महिला कोण गं? 'बेटा ते तुझे ममी-पप्पा आहेत' हा मार्मिक संवाद आहे मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या कुटुंबाचा. असं म्हणतात,  मुंबईमध्ये तर पुढचा पाय मागच्या पायासाठी थांबत नाही. या मायानगरीत मुंबईचे चाकरमाने म्हणजे चालते-बोलते यंत्रमानव. टार्गेट, कामाच्या तंद्रीत त्यांची संवेदनशीलता, भावना लोप पावून ते स्वकेंद्रित बनतात. पैसा आणि यशाचं शिखर हेच यांचं जीवन. खरं जीवन म्हणजे काय हे त्यांच्या ध्यानीमनी नसते. त्यांच्या विचारांची कक्षा स्वतःच कुटुंबासाठी नोकरी-व्यवसाय व पैसा याच्या पलीकडे वाढतच नाही. या टाळेबंदीमध्ये असे यंत्रपुरुष आज घरी असतील. मुलांना ममी-पप्पासोबत खेळण्याचा वेळ मिळाल्याचा आनंद होईल. मुंबईकराना घर काय असतं हे कोरोनाची समजावून दिलं.

या विश्वाचे आम्हीच स्वामी. अशा अविर्भावात मनुष्य या जगात वावरत होता. आपल्या स्वार्थासाठी आम्ही नद्या-जंगले सपाट करून शेती केली. मुक्या प्राण्यांना बंद कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या ठिकाणावर एसईझेडच्या नावावर लाखो किमी वर्ग जंगल नष्ट करून ते उद्योजकांचा घशात टाकलं.  प्रदूषण वाढवून वातावरण दूषित केलं.  स्वच्छ गंगेमध्ये, घाण पाणी, उद्योगाचं घाणपाणी, आणि कर्मकांडाच्या नावावर इतर घाण टाकत राहिलो.  गंगा स्वछतेच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला पण स्वच्छ गंगा हि फक्त कल्पनाच राहिली होती. आज ती स्वच्छ वाहती आहे.  या उपद्रव्यास रोकणाच्या शक्ती फक्त कोरोनातच होती. विमानाचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञानी पक्षाच्या उडण्याच्या तंत्राचा अभ्यास केला. कालांतराने मनुष्याच्या विमान उडान प्रवासात उंच उडणारे पक्षी हेच अडचण होऊ लागले. मग पक्षांना दूर करणारे यंत्र विमानात लावण्यात आले. किती हा स्वार्थीपणा. आज जगातील सर्व विमानं जमिनीवर आहेत!

स्वदेशीचा वापर केल्याशिवाय आपला देश पारतंत्र्यातून मुक्त होणार नाही म्हणून बाळ गंगाधर टिळक, वि.दा. सावरकर  आणि गांधीजीं सारख्या राष्ट्रपुरुषांनी जीवाचे रान केले. स्वातंत्र्य मिळताच आपण या राष्ट्रपुरुषांची शिकवण विसरून इंग्लिश ब्रँडच्या वस्तुकडे वळलो. कालांतराने स्वदेशी उद्योग बंद करावे लागले. परदेशी जाणाऱ्या पैशाचा ओघ वाढतच गेला.  प्रत्येक गोष्टीत आपण हिंदू संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीला जवळ केलं. आज कोरोनामूळे का होईना सगळीकडे आत्मनिर्भर व स्वदेशीचा नारा ऐकू येत आहे.

घरपण काय असतं हे कोरोनाने शिकवलं. बऱ्याच मुलांनी आपल्या आईंना स्वयंपाकात मदत करून स्वतःच स्वयंपाकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल. सर्व कुटुंबातील सदस्यानी मिळून मिसळून लाल-पान सत्ती, कॅरमचे डाव खेळले असतील. सतत जंकफूड खाणाऱ्या तरुण मंडळींना घरच्या जेवनाचं महत्व समजलं असेल. तंबाकू, मद्याची उपलब्धताच नसल्याने कितीतरी लोक नशेपासून दूर गेले असतील. आज देशात हजारो संस्था नशामुक्ती क्षेत्रात काम करत आहेत. जे त्यांना जमलं नसेल ते कोरोनामुळे साध्य झाले आहे.

मृत्यू अटळ आहे. पण जाणारा मागे राहणाऱ्याचा खर्च वाढवून जातो. गावातील गरीब मंडळी मृत्यू नंतरचे कर्मकांड करण्यासाठी कर्जबाजारी होते. किती तरी संत या विषयावर प्रवचन, जनजागृती करून गेलेत. आज तो प्रकार बंद झालाय. विवाह समारंभात आयुष्याच्या कमाईचा मंडळी एका दिवसात चुराडा करत होती. एका दिवसात १ कोटी रुपये खर्च करण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. आज २५-५० लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत आहेत. असंच पुढं चालत राहिलं तर लाखो कुटुंबाचा पैसा कर्मकांडात खर्च होवून ते कर्जबाजारी होणार नाहीत. शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील. कोरोनाची हि शिकवण आपण पुढे कायम स्मरणात ठेवायला हवी.

शेवटी आपण एव्हडच समजून घ्यायला पाहिजे की कोरोनाच्या किती तरी चांगल्याही बाजू आहेत ज्या सूक्ष्मपणे बघितल्या तर दिसतील. ' शतदा प्रेम करावं असं जीवन काय आहे' हे या काळात आपल्याला कळलं. हवेत उडणार आपलं महत्वकांक्षी विमान त्यानं चक्क जमिनीवर आणून उभं केलं. तो आपल्या वाईट सवयी सुधारण्यासाठी, जीवनशैली सुधारण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी आला आहे. जातांना किंवा सोबत राहताना कोरोना आपल्याला चांगल्या सवयी लावून देईल.  ज्याचा आपलं जीवनमान उंचावण्यासाठी फायदाच होईल.

आज माहिती तंत्रज्ञानाने अचाट प्रगती केली आहे. यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता व सॉफ्टवेअरची जोडजाड करून आपण किती तरी गोष्टी सोशल-डिस्टनसिंगच तंतोतंत पालन करू शकतो. मानवजातीला पर्याय म्हणून समोर आलेलं हे तंत्रज्ञान मानवजातीच्या बुद्धीचं महत्व कमी करणारं आहे, यात शंका नसावी.  कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मनुष्यजात बंदिस्त होऊन स्वयंनियंत्रित नसलेले सर्व उद्योग थांबले.  त्यामुळे येणाऱ्या काळात ऑटोमायझेशनच्या दृष्टीने या तंत्रज्ञानामध्ये प्रचंड विकास होईल, हे निश्चित. आणि हा मार्ग दाखविणारा दिपस्तंभ म्हणून पुढील काळात कोरोनाच नाव घेण्यात येईल. या तंत्रज्ञानाणे सज्ज मानवजात येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यास समर्थ राहील.

कोरोना हे नुसतं संकट नसून तो सुद्धा आपल्या जीवनात एक मार्गदर्शक गुरु बनून आला आहे. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, दृष्टिकोन बदलला की ती दिसते. आज कोरोना संकटाशी मुकाबला करतानाच आपण एव्हडे मजबूत होऊ की उद्याच्या मोठ्या संकटाशी सामना करण्याची शक्ती आपल्याकडे असेन. माझे मित्र औरंगाबादचे वरिष्ठ बालरोगतज्ञ प्रा.डॉ.प्रशांत पाटिल यांच्याशी मनमोकळा संवाद साधताना हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मला जे समजलं उमजलं मी लिहिलं. आपलं मत भिन्न असू शकतं.

© प्रेम जैस्वाल, ९८२२१०८७७५
   पेडगावकर, ह.मु. औरंगाबाद
[नावासह हा लेख सामायिक करण्यास माझी हरकत नाही]



Wednesday, 20 May 2020


        
          

                        कोरोना व आर्थिक संकट

कोरोना विषाणूमूळे होणाऱ्या कोव्हिड-१९ आजाराने जगातील प्रत्येक व्यक्तींमध्ये भीतीच वातावरण निर्माण केलं आहे. सोबतच या अमर्याद संकटाने उद्याच्या अनिश्चित आर्थिक चिंतेलाही जन्म दिला आहे.  पाश्चिमात्य देशाची स्थिती बघता आपण कधी या संकटातून मुक्त होऊ या बद्दल कायम एक अनिश्चितता दिसत आहे.  जोपर्यंत एखाद्या देशात प्रभावी लसीचा शोध लागत नाही तो पर्यंत दिवसागणित आर्थिक चिंतेत भर पडत जाईल.  सततच्या टाळेबंदीमुळे छोटी दुकानं, लहान कुटीर उद्योग तसेच मोठे उद्योग संकटात सापडून त्यांच्यावर मंदी किंवा कायमची टाळेबंदी होण्याची टांगती तलवार आहे.  उद्योगधंदेच बंद झाल्यामुळे देशाच आर्थिक चक्र थांबल्यात जमा आहे. अर्थात याचा परिणाम समाजातील सर्वच स्तरावर होऊन जिण्या-मारण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेसाठी फक्त प्रश्नच आहे- उद्या काय होणार? किती काळ मंदी राहील? कसे दिवस काढायचे?

इतिहासात या पूर्वीसुद्धा अशी भीषण संकट येऊन गेलीत. दोन महायुद्ध, भीषण दुष्काळ, प्लेग सारख्या साथीरोगाबद्दल आपण वाचत आलोत. पण या संकटाचा सामना आपल्या पूर्वजांनी समर्थपणे केला. आपल्या जगण्याच्या सवयीत त्यांनी बदल केला. नवीन नियम लागू केले त्यामुळेच कदाचित आजचा दिवस बघण्यासाठी आपण जीवन्त आहोत. आपल्या नशिबात आलेलं कोरोना विषाणूचा संकट हे आपण वर्तमानात अनुभवत आहोत. हा जीवघेणारा कोरोना आपल्याला बरंच काही शिकविण्यासाठी आलेला आहे,  हे निश्चित. तसे 'हे हि दिवस निघून जातील' आणि या संकटाशी दोन हात करून उद्या आपणही पुढे निघून जाऊ.

मानवाने विज्ञानात कितीही प्रगती केली तरी निसर्ग आणि दैवापुढे त्याच काहीही चालत नाही, हे कोरोनाने पटवून दिलं. नियमाप्रमाणे गाडी चालवत असताना पुढील चालक तुम्हाला येऊन धडकतो, जख्मी करतो. तुमची काहीही चूक नसताना हे तुमच्या सोबत कसं घडतं, याला काय म्हणायचं? विज्ञान तंत्रज्ञानात झालेल्या अचाट प्रगतीमुळे  मनुष्यजातीचा दैववादापेक्षा विज्ञानवादावर जास्त विश्वास वाढला आहे.  या विज्ञानवादात एक स्वकेंद्री अहंकारपणा सुद्धा आहे. त्यामुळे मुलं जन्मल्याबरोबर तो शिकून काय होणार याच पूर्ण प्लॅनिंग आपण आधीच करून ठेवतो. काही लाखाची उलाढाल असलेले छोटे उद्योजक कोट्यवधींची कर्ज घेऊन बसतात. किती हा प्रचंड आशावाद!  जणू उद्याच्या सर्व घटना ह्या आपल्या मनासारख्याच घडणार आहेत. अनिश्चित भविष्याबाबत मनुष्य एव्हडा गाफील कसा राहू शकतो? आशावादी असणे ठीकच त्यामुळे जीवनात एक सकारात्मकता येते. पण उद्या काहीही घडू शकतं या बद्दल मनुष्य कधीच विचार का करत नाही?  कदाचित त्याच्या सभोवतालची स्पर्धा, तुलना व  वातावरण त्यास तस करू देत नसावं का?  विमा विकणाऱ्या कंपन्या नको त्याच्या गळ्यात मोठा हप्ता असलेल्या पॉलिसीज विकून टाकतात. कर्ज देणाऱ्या कंपन्या नको त्याला भलं मोठं कर्ज देऊन टाकतात. ज्यांच नुकतंच छोटं दुकान टाकलेलं आहे ते मोठं कर्ज घेऊन बसतात या आशेवर की धंदा वाढवायचा आहे.  ज्यांच उद्योगाच एक युनिट आहे तो पुढील पाच वर्षात डिमांड लक्षात घेऊन कर्ज घेऊन अजून दोन युनिटसाठी कर्ज घेऊन ठेवतो.  ज्यांना नुकताच जॉब लागलेला असतो ते नोकरीच्या भरवश्यावर घर-गाडीसाठी प्रचंड कर्ज घेऊन ठेवतात.   सर्वांचा उद्याच्या प्रगतीवर  पक्का विश्वास असतो म्हणुनच तर हे सर्व नियोजन केलेलं असतं. त्यामागे एक सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन असतो. पण हे करत असताना उद्याच्या अनिश्चिततेबद्दल आपण किंचितसा विचार का करत नाही.  उद्याचा दिवस आपला आणि आपण जे योजिले ते करणारच, यात भर पडते महान लोकांच्या सुविचाराची - 'काही भव्य-दिव्य करायचं असेल तर जोखीम तर घ्यावीच  लागेल.' नो रिस्क नो गेन', थिंक बिग! . एमबीए शिकलेले तरुण तर सर्व जोखमीच गणित करून कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन पुढील वीस वर्षाची प्लॅनिंग करून ठेवतात. जणू ठरवलेल्या प्रमाणे घडायला आपण ईश्ववरी वरदान मिळालेले अवतार पुरुषच आहोत ?

मुळात जगात भौतिक सुखाची स्पर्धा, विज्ञानवाद एव्हडा वाढलाय की दैववादाचा विचार कुणी करतच नाही.  त्यामुळे पुढील काळाची योजना करताना 'काहीही घडू शकत' हे कुणी गृहीत धरत नाही.  कोरोनामूळे निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्येचा सर्वात जास्त त्रास त्यांनाच होईल ज्यांनी भविष्याला गृहीत धरून योजना आखल्या होत्या. ज्यांच्या आर्थिक नियोजनत शिस्त नव्हती. उदाहरणार्थ- उद्याचा विचार न करता खाऊन-पिऊन घ्या अशी मानसिकता असलेला चैनी वर्ग, हातावर पोट असणारा मजूर वर्ग, अफाट कर्ज घेतलेला व्यापारी वर्ग, चुकीची विमा पॉलिसी/ गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता इतरांसाठी जगणारी दिखाऊ जनता, अनियंत्रित खर्च वाढवून ठेवणारे कुटुंब यांना या टाळेबंदीनंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो. अशा लोकांनी यापुढे तरी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करायला हवंय जेणेकरून पुढील आयुष्यात अशी वेळ येणार नाही. कोणतंही संकट हे दीर्घकाळ टिकत नसतं, कालांतराने त्यावर उपाय येतोच. 

कुठं तरी वाचलं होतं, एखादया उंचीवर दोर पकडून चढताना थोड्या थोड्या अंतरावर गाठ बांधत चढावे लागते. त्याचा फायदा असा की उंचावरून हात सैल झाला तर आपण एखाद्या गाठीवर अडकून थांबू शकतो. गाठ न बांधता सरळ वर चढत गेलो तर हात सैल होऊन सरळ 'फ्री-फॉल' होण्याची भीती असते. आर्थिक नियोजन करताना थोडी अशीच योजना केली तर कोरोनासारख्या एखाद्या संकटात मनुष्य सहज तग धरू शकतो आणि पुढील जीवन सुसह्य होऊ शकतं.

© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)