ad1

Monday, 24 November 2025

आर्ट ऑफ गिव्हिंग


'आर्ट ऑफ लिव्हिंग' सर्वाना परिचित आहे. आपल्या अवतीभवती कितीतरी लोक त्यांचे साधक असतील. 'जीवन जगण्याची कला' असा त्याचा अर्थ होतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सुदर्शनक्रिया, प्राणायाम, योग इ. त्यामध्ये शिकविले जाते. ज्यांच उदर भरलेले आहे त्यांच्यासाठी ते आवश्यकही आहे. पण समाजातील उपेक्षित, पिडीत, अनाथ घटकांचा विचार करता जगण्यासाठी अध्यात्म आणि योगा एव्हड़च पुरेस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा अशा मुलभुत गरजा पूर्ण झाल्याशिवाय योग आणि आध्यात्माला अर्थ नाही. 'भूके पेट न होये गोपाला....!' त्यामुळे आजही समाजाच्या तळागाळातील लोकांच्या मुलभुत गरजांचा विचार करता 'आर्ट ऑफ गिव्हिंग' हि तेव्हडेच महत्वाचे वाटते.

प्राचिन काळापासून मनुष्य हा कळपात राहणारा प्राणि होता. जेंव्हा शेती व्यवसाय विकसित नव्हता आणि मनुष्य परावलंबी होता, तेंव्हा जंगलात शिकार करण्यासाठी मनुष्य कळपात फिरायचा आणि मिळालेल्या शिकारीवर त्याची उपजीविका चालायची. अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय, हिंस्र प्राण्यापासून रक्षण, संकटकाळी धावून जाण्यासाठी, सुखदुःखात एकमेकाला मदत आदी कारणामुळे मनुष्याला कळपात राहणे आवश्यक होते. अड़ीअडचणीत एक दुसऱ्यांना देवून-घेवून लोक मदत करायचे. अनेक सण-उत्सवात धान्य, कपड्यांची देवान-घेवान व्हायची. त्यामुळे आपापसतील प्रेम-संबंध, नाते वृंदिगत व्हायचे. अडचणीत त्याचा फायदा होता. आणि त्यातुनच पुढे वेगवेगळ्या समाजाची निर्मिति झाली. गावखेड्यात आजही शेतातिल दूध,भाज्या-फळे, हुरड़ा, आंबे इ. शेजाऱ्याना वाटण्याची प्रथा आहे. कदाचित त्यामुळेच गावात भिक्षुक कमी आढळतात. शहरात यदा कदाचित असे कुणी केलेच तर त्याला 'शेअरिंग' असे 'सोफिस्टिकेटेड' नाव आहे. परंतु विज्ञानातील शोध आणि आर्थिक प्रगतिमुळे मनुष्य आता एव्हड़ा स्वावलंबी झाला आहे कि त्याला आता कळपात राहण्याची गरज उरली नाही. भौतिक सुखात तो गुरफटून गेल्यामुळे त्याला इतरांशी काही देने-घेणे, कुणाच्या सुखदुःखात, अडचणीत जाण्याची गरज वाटत नाही. जन्मदाते आई-वडील, जवळचे नातेसंबन्धी आणि समाजाचा येण्याजाण्याचा 'त्रास' नको म्हणून आज उच्चशिक्षित नोकरदार दूर नोकरी शोधत आहे. अशा असंवेदनशील आत्मकेंद्री वर्गाची संख्या दिवसंदिवस वाढून एक आत्मकेंद्री, चंगळवादी समाजाची निर्मिति होत आहे. ज्या समाजात राहून मनुष्य लहानाचा मोठा होतो, ज्या समाजाकडून संस्कार, जीवनमूल्य शिकलो तोच समाज आता त्यास नकोस वाटन, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पाऊस संपल्यानंतर छत्री अडचणीची होते, असा तो प्रकार आहे. सामाजिक बांधीलकी आणि संवाद फक्त व्हाट्सप आणि फेसबुकपुरते मर्यादित झाले आहे. हल्ली व्हाट्सप्प फेसबुकवरील हजारो मित्रातच मनुष्य मशगूल आहे. त्याला शेजारच्या 'व्हाट्सप' मित्राशी दोन मिनिटे बोलण्यासाठी वेळ नाही आणि गरजही वाटत नाही. थोडक्यात कळपात राहनारा प्राणि आज कुलुपात राहणे पसंद करत आहे. आपल्या गरजा पूर्ण होऊन स्वावलंबी झाल्याचा हा परिणाम आहे. विज्ञानाच्या प्रगतिमुळे जग जरी अगदी एका खेड्यासारखे वाटत असले तरी ह्या प्रगतिमुळे मनुष्य एकमेकापासून दुरावला गेला आहे, हेही तितकेच खरे. असो, 'कालाय तस्मै नमः' 


काळानुरूप मनुष्यात कितीही बदल झाले तरी त्यामुळे 'आर्ट ऑफ गिव्हिंग' चे महत्व कमी झालेले नाही. पण हल्ली धावपळीच्या युगात मनुष्य आपले काम आणि अर्थार्जनामध्ये खुप व्यस्त आहे. कुणास काही देणे तर दूर पण घेण्यासाठीही त्याच्याकड़े वेळ नाही. व्हाट्सप, फेसबुकवरील 'मित्रांना' गुड़ मॉर्निंग, गुड़ नाईट आणि मोठमोठे अवजड सुविचार (जे इतरांचे असतात) देण्याघेण्यामध्येच धन्यता मानतो. खऱ्या आर्ट ऑफ गिव्हिंगला आपल्या धनाच्या श्रीमंतीपेक्षा 'मनाशी श्रीमंती' लागते. याची प्रचिती घ्यायची असेल तर एक वेळेस हे करून तर बघा. त्यासाठी अगदी गावखेड्यातच जाण्याची गरज नाही. आपल्या शहरी जीवनात राहूनही 'आर्ट ऑफ' गिव्हिंग' चा अनुभव घेऊ शकता. 


औरंगाबादला माझा वैद्यकीय उपकरणाचा व्यवसाय होता तेंव्हाची ही घटना.  प्रसूतिनंतर बालरुग्णाना लागणारे वार्मर, फोटोथेरपी ज्याना सामान्यजनता 'काचेची पेटी' म्हणतात अशा उपकरणाची हॉस्पिटलला विक्री आणि दुरुस्ती आम्ही करायचो. कमी वजनाच्या, जन्मताच काविळ झालेल्या नवजात बाळाना ह्या उपकरणामध्ये उपचारासाठी ठेवल्या जाते. त्यावेळेस आमचं ऑफिस नव्हतं म्हणुन सर्व कामकाज घरूनच चालायच. मला आठवते सकाळची कामे, हॉस्पिटल-व्हिजीट आटोपूण मी दुपारी आरामात पहुडलो होतो. तेव्हड्यात कुणीतरी बेल वाजवून माझी झोपमोड़ केली. बाहेर बघतो तर एक नीटनेटक्या ड्रेसमध्ये ऑफिस एग्जीक्यूटिव वाटावे असे गृहस्थ उभे होते. अवकाळी पावसात ते थोड़े भिजलेही होते. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघता ते खुप घाबरलेले आणि गोंधळलेले वाटत होते. विचारपूस केल्यानंतर कळाल कि त्यांच नवजात बाळ शासकीय रुग्णालयाच्या अतिव दक्षता विभागात भरती होत. त्या बाळाला काविळ झाला होता आणि शासकीय रुग्नालयाच्या काविळ कमी करणाऱ्या फोटोथेरपी मशिनीची निळी ट्यूब काम करत नव्हती त्यामुळे इलाज होत नव्हता. अशा रुग्णालयात एखादा सुटाभाग खरेदी करायचा असल्यास एका वेळखाऊ दिव्यचक्रातुन जावे लागते. म्हणून ते स्वतः डॉक्टराकडून माझा पत्ता घेवून स्वखर्चाने माझ्याकडे ती ट्यूब खरेदी करण्यासाठी आले होते. इमर्जन्सी व त्यांची आर्थिक परिस्थिति बघून मी त्यांना ती ट्यूब मला आली त्या किमतीत देवून टाकली. पण पुढचा प्रश्न ती ट्यूब मशीनमध्ये बसवनार कोण? शासकीय रुग्णालयात काम करायच म्हणजे त्यांच्या लांबलचक, वेळखाऊ नियमाने जावे लागते. सर्विस चार्जेस तर मिळनार नव्हतेच, परन्तु नवजात बाळ आणि त्यांची अड़चन लक्षात घेवून पड़त्या पावसात मी ते उपकरण चालू करून दिले. फोटोथेरपी चालू झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आंनद बघण्यासारखा होता. पूर्ण व्यवहारात सरकारी नियम बाजूला ठेवून 'सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड' या भावनेने मी त्यांना निस्वार्थ मदत केली. कालांतराने मी ते सर्व विसरूनही गेलो होतो.


तीन वर्षानंतर औरंगाबादच्या रामा इंटरनेशनल या पंचतारांकित हॉटेलमध्ये बालरोगतज्ञानची कॉन्फ्रन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये आमच्या कंपनीचाही स्टॉल होता. पहिल्याच दिवशी स्टॉलची व्यवस्थित मांडणी करताना एक हॉटेल स्टाफ मला स्वतः येऊन विचारतो, 'साहब आपको कुछ ठंडा, पेप्सी कुछ चाहिये तो आप मुझे जरूर कहेना?', मला थोड़ आश्चर्यच वाटल की येथे कुणाशी माझा काही परिचय नसताना अस अचानक कुणी मला असं का विचाराव. मग त्याने मला स्वतःहुन आठवण करून दिली कि मी तोच व्यक्ती आहे ज्याच बाळ आजारी असताना तुम्ही भर पावसात मदत केली होती. ते महाशय रामा इंटरनेशनल पंचतारांकित हॉटेलचे 'कॅॅप्टन' होते.


कॉन्फ्रन्सच्या शेवटच्या रात्री रामा हॉटेलच्या लॉनवर बैंक्वेट होती. कंपनीस्टाफ व डिलरचे मिळून आम्ही आठजण होतो. आयोजकाने प्रत्येक स्टॉलला जेवणाच्या फक्त दोनच पासेस दिल्या होत्या. नियमानुसार आमच्यापैकी दोन जण बेंकवेटला जावू शकत होतो बाकी आम्ही बाहेर जेवन्याचं ठरवत होतो. कारण इतर सहा जणाना पंचतारंकित हॉटेलमध्ये पैसे देवून जेवने परवडणारे नव्हते. कोण बेनक़्वेट ज्वाइन करणार आणि बाहेर कोण जेवनार या द्विधेत असताना तेच रामा हॉटेलचे कैप्टन माझ्याकड़े येवून मला आस्थेने विचारतात की आपणास काही प्रोब्लेम आहे का. मी त्यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बैंकवेटच्या पासेसचा अख्खा गठ्ठाच माझ्या पुढे आणून ठेवला. 'सर, तुम्हाला हव्या तेव्हडया पासेस बिनधास्त घ्या!' मी त्यांच्याकडून बैंकवेटच्या सहा पासेस घेतल्या. शासकीय नियम आणि पैशाचा विचार न करता मी त्याला मदत केली होती आणि विसरून गेलो होतो पण त्याच्या ते पक्क लक्षात होत. 'रिटर्न गिफ्ट' म्हणून तेही पंचतारांकित हॉटेलचे सर्व नियम बाजूला करून किंवा आपले अधिकार वापरून आम्हास मदत करत करण्यास तयार होते. 'आर्ट ऑफ गिव्हिग' चा तो परिणाम होता. असं म्हणतात कि 'जे आपण इतराना देतो ते व्याजासहित परत मिळतं '.


निसर्गही आपल्याला भरभरुन देत असतो. प्रकाश, पाणी, हवा, पाऊस, ऊन, वारा, माती, जमीन, सावली, फूल, फळे, वृक्ष, इंद्रधनुष्य, पक्ष्यांची किलबिल अशा कितीतरी गोष्टी तो आपल्याला फुकटात घेतो. एखाद्या फळाचे बी चुकीने जरी शेतात पडल तर काही वर्षानी तिथे रसाळ फळाचे झाड़ उभे दिसते. सर्वच फळ-फुलांचे झाड़ आपण लावत नाही. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी निसर्गाकडून काहीही घेत नाही. मग निसर्गाकडून सर्वच गोष्टी फूकटात घेत असताना आपण फुकटात इतराना काय देतो, हे महत्वाचे आहे. म्हणूनच 'घेता' या कवितेत प्रसिद्ध कवि विन्दा करंदिकर म्हणतात -

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।।

©    -प्रेम जैस्वाल पेडगावकर
        9822108775