ad1

Monday, 26 May 2025




जत्रा जशी आठवते - भाग २


'मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर'. कालानुरूपे काही गोष्टी विस्मरणात जायला हव्या. मेंदूची सुद्धा काही क्षमता असते ना! तसा भूतकाळात मन रमवून आणि भविष्याची चिंता करून वर्तमानात काहीच साध्य होणार नसतं. पण काळाच्या ओघात आपण किती जरी पुढे गेलो तरी बालपणीच्या काही आठवणी एखाद्या शिल्पावर कोरून ठेवाव्यात तशा त्या मनात घर करून बसलेल्या असतात. 
आपला पिच्छा त्या सोडत नाही. तूम्ही कुठून आलात, कशे होता अशा विविध प्रश्नाचं कल्लोळ उठतं, खूप काही आठवतं आणि लिहावंसं वाटतं.

जत्रेच्या पहिल्या दिवसाच महत्व आमच्यासाठी 'नवस आणि थोडं मटनाचं मांसाहारी जेवण' या पलीकडे विशेष काही नव्हतं. घरातील  अध्यात्मिक वातावरणामुळे ते सुद्धा अगदी लपूनछपून करावं लागायचं. ज्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून उत्सुक असायचो ती खरी जत्रा दुसऱ्या दिवशापासून सुरु व्हायची.

दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी नसायची. शाळेच्या खोल्या कमी म्हणून शिक्षक शाळेच्या मैदानात, कोवळ्या उन्हात गोल रिंगणातं बसून आमचे वर्ग घ्यायचे. नितनवरे गुरुजी, मस्के गुरुजी, डोके गुरुजी सारखी शिक्षक मंडळी जीव तोडून शिकवायचे पण त्या दिवशी आमचं मन लागत नसे. गावाच्या उत्तरेला गांगुचा माळ', त्या माळावरून जत्रेच्या व्यापाऱ्याच्या गाड्या धडधड करत आमच्या जवळून वाघामायकडे वळायच्या.  आमची जत्रा त्यात खचून भरलेली असायची. मग वर्गातील मुलं त्याची जोरात चर्चा करायची. डोके गुरुजी हसरा चेहरा करत यायचे आणि पाठीमागे धपकन एक धपाटा मारून निघून जायचे. संपूर्ण लक्ष आता शाळा सुटण्यावर असायचं. 

मग अचानक आमचे 'दयाळु' गुरुजी दुपारची सुट्टी 'डिक्लेअर' करायचे. झालं, शाळेच दप्तर एखाद्या कोपऱ्यात फेकून आम्ही जत्रेकडे धूम ठोकायचो. जत्रेचे काही दुकानदार आपली दुकान लावण्यासाठी खड्डे करण्यात गुंतलेले असायचे.  काही थकलेले व्यापारी चुलीवर स्वयंपाक करून पोटापाण्याची व्यवस्था करायचे. आकाशपाळनेवाला सुद्धा पाळणा उभा करण्याची खड्डे खोदून तयारी करत असलेला दिसायचा.  डोक्यावर दोन्ही हात ठेवून आम्ही त्यांची तयारी बघत बसायचो. हि इतंभूत माहिती आम्ही गावात सर्वांना सांगत बसायचो.  तिसऱ्या दिवशी मात्र जत्रा 'फुल्ल फॉर्म' मध्ये यायची. सर्व दुकानदार नियोजित जागी आपले शेड-कणाद ठोकून एखाद्या शेठ सारखे मळकट जॅकेट घालून आरामात बसलेले दिसायचे. विशेष म्हणजे त्यांच्या जागा दरवर्षी फिक्स असायच्या. आकाशपाळणा, घोड्याचा गोलचक्री पाळणा सर्व तयारीत असायचे. मग आमच्यासारखे काही बहाद्दर सकाळी झोपेतून उठून, तोंड न धुता, घरी कोणाला न कळता धावत एक चक्कर मारून यायचे. 

आता गावात जत्रेची लगबग सुरु व्हायची. मग काय, जमा केलेली १०,२० आणि एखादी ५० पैशाची नाणी खिशात घेत आम्ही जत्रेचा आनंद घेण्यासाठी निघायचो. वाटेत परत येणारे मुलं चेंडू उडवत, भवरे फिरवत, डोळ्याला प्लास्टिकचा चष्मा लावून फुगा-कम-पुंगीचा पौंsss आवाज काढत, बासरी फुकट परत यायची. कुणाच्या हातात ऊस, फुटाणे तर कुणाच्या हातात डमनी. आमच्या वेळेस 'डमनी' हा प्रकार खूपच फेमस होता. बूटपॉलिशच्या डब्बीची दोन चाक, वर पत्र्याची डमनी आणि ओढायला एक लांब काडी. बस, ती डमनी ओढत मुलं घरी यायची. 

सैलानीपासूनच जत्रेचा गोंगाट ऐकू यायचा तशी आमची पावलं जोरात पडायची. आकाश पाळणे फिरण्याचा सतत क्वायं क्वायं आवाज, बासरी विकणाऱ्याचा मधुर गाण्याचा आवाज, फुगेवाल्या पुंग्याचा आवाज, 'माय मल चेंडू, मल चष्मा दे' असं मायच्या पदराला पकडून रडणाऱ्या लेकराचा आवाज. ' याडी मन बुगडा दरा द'  'तोन आबच पिसा दिनीती, कांई किदो, अब पिसा छेयी?' मध्येच गरम गरम भजेवाल्याचा आवाज आणि एव्हड काय कमी की अचानक भोंग्याचा आवाज ,' आता आलेली जोडी ७ सेकंड ३ पॉईंट, पावती घेऊन येणे!' सर्वत्र गोंगाट.

खरेदीची उत्सुकता तात्पुरती बाजूला ठेवून थोड्या गडबडीने आम्ही 'वाघामाय' च्या पाया पडायचो. देवळाजवळच 'संतोष आणि फुटनेवाली मावशी' फुटाणे, लेवड्या विकत बसायचे. 'फुटाणे' म्हणजे थोड्या पैशात जास्त वेळ आनंद!  दोन दोन फुटाणे खात आम्ही जत्रेत फिरत असू.  आमची आवडती दुकानं म्हणजे कटलरी. चेंडू, पुंगी, चष्मा, प्लास्टिकच्या छोट्या जीप, ट्रक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्मी टाकून बघायचे सिनेमे. या सर्व वस्तू २५ पैसे ते १ रुपयाच्या रेंजमध्ये असायच्या. खिशात पैसे नसले की हल्ली मॉल मध्ये करतो तशी 'ये कित्तेकू हय, वो कित्तेकू है' अशी फुकटी 'विंडो शॉपिंग' करायचो. पण कोणाच्या खिशात पैसे आहेत ते त्या जॅकेट घातलेल्या वैफल्यग्रस्त दुकानदाराला आधीच माहित असायचं.  मग सर्व फिरून एखादा चेंडू आणि प्लास्टिकचा चष्मा घ्यायचो. त्या चष्म्यातून सर्व जत्रा रंगीतमय वाटायची, भन्नाट मज्जा यायची. ती चार-पाच दुकान पुढेमागे फिरत आम्ही बाहेर निघायचो. बाजूच्या हाटेलित पाणी प्यायचो. त्यावेळेस बिस्लरी हा प्रकार नव्हता त्यामुळे इन्फेक्शन काय हे आम्हाला माहित नव्हतं.  हॉटेलिसमोर मोठ्या कढईत मळकट बनियन घालून आचारी भजे-जिलेबी तळत बसायचा. पाणी पिऊन आम्ही खदाणीतूंन पडलेल्या रस्त्याने मेनरोडवर यायचो. मध्येच कुठे शाळेचे गुरुजी दिसायचे, आम्ही कट् मारून दूर पळून जायचो. रोडवर ऊसवाला 'साटा' विकत उभा असायचा. त्याचा तो पांढरा मिशावाला चेहरा कधीच बदलला नाही. ज्यांना घरी जायचं ते 'मांदा, ५० पिसार साटा द' ऊस घेऊन सुसू करून त्याचा रस पीत पीत घरी जायचे. उसाच्या गाडीच्या बाजूला एक सिनेमावाला आपला 'दिल्लीला कुतूबमिनार देखो, आग्राका ताजमहल देखो. . . ..' असं म्हणत उभा असायचा. मग १० पैसे देऊन तो आम्हाला ताजमहल, कुतुबमिनार, इंडिया गेट अशी ठिकाण फिरवून आणायचा. वर त्याची धपधप अशी बॅकग्राऊंड 'म्युसिक' चाललेली असायची.  खाली गुढघ्यावर बसून त्या चार गोल खिडकीतून आम्ही सिनेमे पाहायचो. चार आने दिले तर दोन जण सिनेमे बघायचे. मग त्याच्याकडे पाच पैसे चिल्लर नसायची म्हणून पाच पैशात एक जण पुन्हा सिनेमा बघायचा. मोठा डिस्काऊंट मिळाल्याचा आनंद व्हायचा. कधी कधी झटपट पैसे कमविण्यासाठी जत्रेत चक्री यायची, लालची लोकांचे खिसे त्यामुळे पटकन खाली व्हायचे. बाजूलाच लाल-पिवळ्या गारीगर विकणारा 'गारीगरवाले, गारीगरवाले' म्हणत थंडगार गारीगर विकायचा. खिशात चेंडू, डोळ्यावर पन्नास पैशाचा रंगीन चष्मा, पाच पैशाची गारीगर चोखत स्वर्गानन्द मिळायचा.  तेथून पुढे आकाशपाळने  क्वांयन, क्वांयन आवाज काढून नुसते गोंगाट करायचे. गळ्याला बांधलेली दस्ती, एक टांगती पर्स आणि दोन्ही बाह्या एकदम वर केलेला तो आकाशपाळनेवाळा दोन्ही हातानी तो पाळणा गरगर फिरवायचा. कधी कधी पाळन्याचे चारही झोके फुल्ल भरत नसत म्हणून पाळणा संतुलित करण्यासाठी तो एखाद्या मुलाला फुकटात बसवायचा. हा 'योग' आपल्या नशिबात यावा म्हणून बरीच मुलं त्या पाळण्याजवळ प्रतीक्षेत ताटकळत उभी रहायची.  आकाशपाळण्यात बसलेली मंडळी खाली दस्ती फेकायची, मग ती उचलायची, ओरडाओरड करायची, शिट्या मारायची, भन्नाट मजा यायची. आता बारी घोड्याच्या चक्रीची.  मुद्दाम जवळजवळच्या घोड्यावर बसून आम्ही गरगर फिरत असू, एक दुसऱ्याच्या हाताला हात मारत काही सेकंदात तोही चक्र थांबायचं. घोड्याच्या चक्रीच्या पलीकडे भांड्याची दुकान असायची. दुरूनच तांबे-पितळेच्या भांड्याची उन्हात चमकणारी उतरंड दिसायची. गावातील आया-माया आपल्या मुलींसाठी भांडी विकत घ्यायच्या. भांड्यावर नाव टाकण्याचा टँगटँग आवाज दूर पर्यन्त यायचा. तिकडं कुणीही मुलं फिरकायची नाही. ती भांडी आमच्या काय कामाची?  अशी मजा लुटताना मध्येच,'आता आलेली जोडी ६ सेकंड ३ पॉईंट, पावती घेऊन येणे'  असा भोंग्याचा आवाज यायचा. मग धसकट-माती तुडवत आमची पावलं शंकरपटा कडे पडायची. 

ज्या प्राण्याकडून काम करून घ्यायचं, त्याच प्राण्यांचा थोडा मनोरंजनासाठीसुद्धा उपयोग करायचा, हि जुनीच परंपरा आहे. अशी प्राण्याची शर्यत सर्व जगात घडत असते फक्त स्वरूप वेगळं असतं. गावातील सर्व हौशी शेतकरी मंडळी आपल्या आवडत्या जोडीसह हजर रहायची. प्रेक्षक मंडळीच पूर्ण लक्ष त्या जोरात धावत येणाऱ्या जोडीकडं असायचं. जोडी हाकणारा जिव तोडून, दोन्ही हातानी चापटा मारत, शेपूट मुरगाळत जोडी हाकायचा.  क्वचीत ओढाताण करत ती नामचीन जोडी फरार व्हायची, मग,' आता आलेली जोडी फरार!'  झालं, मग त्या गड्याला खूप राग येऊन तो गोर्ह्याला बदबद बदडायचा. कारण भर स्पर्धेत त्याच्या इज्जतीचा पंचनामा व्हायचा. मग अशात एखाद्या उमद्या जोडीची चर्चा चालायची.  काही जाणकार  ' त्याची लय सोय हय हो, पहिला इनाम हीच जोडी हाणनार' असं बिडया फुकत, पानतंबाकू चघळत लोकं चर्चा करायची. विशेष म्हणजे हा लाऊडस्पीकर घडीवाले केळकर साहेब अनेक वर्षे सारखेच दिसायचे. वयाचा त्याच्यावर काही परीणाम झालेला दिसत नसे. खाकी हाफपेंट, पांढरा बाह्याची घडी केलेले उत्तम शरीरयष्टी असलेले केळकर सदैव हसतमुख दिसत. आता वाटते ते कदाचित आरएसएस चे साधक असावे. 

बऱ्याचदा शर्यतीत वाद निर्माण व्हायचे मग ते निसतारण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी टेबल-खुर्च्या टाकून बसायची. जोडीने दोरा तोडल्या क्षणी त्या घडीचा काटा गर्रकन फिरायचा. केळकर भिंग घेऊन 'रिडींग' बघायचे आणि मग माईकमध्ये  'आता आलेली.........., ' केळकरचा अर्धा वेळ गावकऱ्यांना मागे सारण्यात जायचा. त्यात एखादा 'फुल्ल रिचार्जड' असला तर त्याची विशेष 'कॉमेंट्री' चालायची मग त्यातही थोडी मजा यायची.

तर अशा जत्रेत दिवसातून आमच्या २- ३ चकरा व्हायच्या. फक्त जेवणासाठी आम्ही घरी यायचो. तीन दिवस भरपूर मजा यायची. जत्रेत खरेदी केलेल्या वस्तूची 'व्हॅलेडीटी' जास्तीत जास्त आठवडाभर असायची. आजच्या चायनीज वस्तूप्रमाणे. काही वस्तू दोन दिवसातच तुटून जायच्या.  उंच उंच उसळणारा चेंडू अचानक फाटून निकामी व्हायचा. त्या सोबत आमची हवा निघून जायची. सिनेम्यासोबत छोटछोट्या फिल्म यायच्या. त्या टाकून बघून, मनसोक्त आनंद मिळायचा. 

पाचव्या दिवशी कुस्तीचे सामने व्हायचे. हा जत्रेचा शेवटचा खेळ असायचा. आम्हाला त्यात खास अशी मजा येत नसे. आम्ही आमच्या जत्रेत गुंग असायचो.  जत्रेचे व्यापारी जत्रा गुंडाळण्यात व्येस्त असायचे. त्यांचं बिऱ्हाड पेडगावहून हलून दुसऱ्या जत्रेसाठी जण्याची ते तयारी करायचे. अशा प्रकारे पाच दिवसाची धुमधाम यात्रा संपायची आणि व्यापारी गाठोडं बांधून निघून जायचे.  पाच दिवसात पाऊलांना रोज तीन वेळेस जत्रेकडे जायची सवयच पडुन जायची. त्यामुळे सहाव्या दिवशी सकाळी काही गावातील पोरं जत्रेच्या ठिकाणी जायची, जत्रा उठलेली असायची पण पोरं तेथे वनवन फिरून हाताला काही लागतं का ते बघायची. चार दिवस दणदणाट वाटणारी हीच ती जागा होती का?  यावर विश्वास् होत नसे.  एका हुरहूर शिवाय काहीच हाती लागत नसे. आठवणी मागे ठेवून जत्रा निघून जायची, पूर्ण एका वर्षासाठी !

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
   ९८२२१०८७७५
 
                               





            


  गावची जत्रा जशी आठवते -  भाग १

बऱ्याच वर्षांपासून पेडगावच्या जत्रेला मी गेलो नाही किंवा असं समजा की तसा योग आला नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की पेडगावच्या जत्रेचा मी कधीच आनंद घेतला नाही. बालपणापासून साधारण दहावीपर्यंत मी प्रत्येक वर्षी जत्रेला गेलो आणि मनसोक्त आनंदही लुटला आहे.

आनंदाची व्याख्या व्यक्तिप्रमाणे बदलत जाते. शहरात राहणारे उच्चशिक्षित पुरोगामी उच्चभ्रू लोकं आनंद मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.  माया कमवून जस जशी श्रीमंती वाढते तसा आनंदही महाग होत जातो.  एखादं मोठं पर्यटन स्थळ पाहिल्याशिवाय किंवा एखादी परदेश वारी केल्याशिवाय त्यांना चैन, मजा येत नाही. पण तेव्हडाचं आनंद एका गावखेडयातील गरीब शेतकऱ्याला गावयात्रेत मिळत असतो. कारण त्याच्या मजेचा कक्षा जत्रेच्या पलीकडे गेलेल्या नसतात. थोडक्यात त्यांचं विश्वच छोटं असतं.  आजही गावातील जनता वर्तमानात जगत असताना दिसते त्यांना उद्याची जास्त चिंता नसते. छोटया छोटया गोष्टीत त्यांचं मन आनंदी होतं. पेडगावची जत्रा म्हणजे सर्व गावकऱ्यांच्या आनंदाचा एक उत्सवच. वर्षभर शेतातील काम आणि रोजरोजच्या कंटाळवाण्या कटकटीतुन सुटका मिळून थोडा आनंद भरणारा तो आनंदोत्सव आहे. 

वाघामायच्या जत्रेला 'जगदंबादेवीची यात्रा' म्हंटलं तर त्यातील अस्सलपणा निघून जाईल. हल्ली शहरी जीवन दिखाव्याचं झालं आहे. जगण्यातील अस्सलपणाच त्यात राहिला नाही. आजूबाजूचं जग दिखाव्याने भरलेलं वाटतं.  पण आजच्या या लेखात मी 'वाघामायच्या जत्रे' चं अस्सल म्हणजे खरंखुरं वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे माझे समकालीन म्हणजे १९६९ च्या पुढेमागे जन्मलेले असतील त्यांना हा लेख ३५-४० वर्षांपूर्वीच्या वाघामायची यात्रा फिरवून आणेलं. 'कालाय तस्मै नमः'  प्रमाणे कालांतराने गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनातं बरेच बदल घडले आहे. जीवनमान बरंच उंचावलं आहे, त्यामुळे सध्याच्या जत्रेत आणि मी किंवा आम्ही अनुभवलेल्या जत्रेत बरेच बदल घडले असतील, असं मला वाटतं.

रूढी, परंपरा आणि विश्वास या पुढे तत्वज्ञान, तर्क, विज्ञान आणि विवेकवाद याच काही चालत नसतं. त्यामुळे गावखेड्यात जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते पुढे हि असंच चालत राहणार. वाघमायची जत्रा त्याला अपवाद नाही. वाघामायच्या जत्रेच्या काही दिवस आधीच गावाकऱ्यांना जत्रेचे वेध लागायचे. शेतकरी शंकरपटात धावण्याजोग्या चांगल्या गोऱ्ह्याची निवड करत असत.  धावणाऱ्या जोडीच्या ,' खुराक' खाण्यापिण्याची जरा जास्तच सोय व्हायची. हौशी शेतकरी सुताराकडून शंकरपटासाठी वजनानी हलका-फुलका खासरा किंवा छकडा, कासरा, टोकदार पुराणी याची तयारी करायचे किंवा त्याची दुरुस्ती करायचे. सर्व तयारी जोरात चालायची. मग ज्यांना वाघामायचे नवस फेडायचे अशी मंडळी आधीच आपल्या आयपतीप्रमाणे लहान-मोठं बकरं 'बुक' करून ठेवायची. परिस्थिती असो वा नसो गावच्या वाघामायचा नवस लोकं चुकवत नसत, नाहीतर वाघामाय कोपेल अशी भीती. ज्यांना घडतं नसे ते ' पैशे मुंगा-उडदावर नखंर कापसावर देईन,  मी कुठं पळून चाललो का ?' असं वचन देऊन सावकाराकडून उधारउसनवारीने नवस पूर्ण करत. त्यासोबत आधीच दारूची सोय केल्या जाई. मग पिणारे हौशी ओढ्या-नाल्यात मोहादारू काढून आधीच 'पहिल्या धारेच्या' बाटल्या भरून ठेवत.  नव्यानं उजवलेल्या सासुरवासण्या पोरींना माहेरच्या जत्रेचे वेध लागे. जत्रे निमित्त चार दिवस का होईना एक परम सुखाची माहेरची वारी होईल अशी त्यांना आशा असे. मग कधी बाप सासरी येईल आन जत्रसाठी माहेरी घेऊन जाईन असं वाटे. 

लहान असल्यामुळे जत्रेची पूर्वतयारी आमच्या समजण्या पलीकडची असायची. फक्त एव्हड समजायचं की ढगळवगळ पायजमा सदरा, डोक्यावर रुमाल गुंडाळलेला गाव-हवालदार लगबघीने गावातील गल्ल्यात फिरून गावातील प्रतिष्टीत मंडळींना कुठे तरी जमवायचा. थंडीच्या दिवसात सकाळचं कोवळं ऊन खात हि चर्चा मारुतीच्या पारावर किंवा इतर कुठेतरी व्हायची. आता वाटतं ते जत्रेच काही तरी नियोजन करत असावे.  पण आम्हाला जत्रेबद्दल कळायचं ते फक्त 'हिंद प्रिंटिंग प्रेस' मध्ये छापलेल्या अतिपातळ गडद गुलाबी, पिवळे, लाल व जांभळे पाम्प्लेट हातात आल्यावरच. त्यावेळी आजच्या सारखे 'फास्ट कम्युनिकेशन' ची साधन नव्हती. पोस्ट नव्हतं की फोन नव्हते. त्यामुळे 'फणाल्या गावच्या यात्रेला कुणी जात असंल तर पाम्प्लेट पाठवा रे' असं करून पाम्प्लेट पाठवले जायचे. त्याकाळी एसटी बस बेभरवशाची होती त्यामुळे इतर गावाचे पाम्प्लेट पाऊलवाटेंने कुणीतरी गावात घेऊन यायचे. पेडगावच्या पुढे मागेच ढोलम्बरी, भटसांवगी सारख्या सभोवतालच्या गावाच्या जत्रा असायच्या.  हल्ली जसे आयपीएलचे सामने होतात तशी एका मागून एक सभोवतालच्या गावच्या जत्रा भरायच्या. मग गावातील बाया, लहान मोठी पोरं जत्रेची मजा लुटण्यासाठी किंवा खर्चासाठी आधीच पै पै जमवून ठेवायची. कुणी 'कापूस इकुन'कुणी थोडं धान्य इकून, मोलमजुरी करून जत्रेच्या तयारीत जुंपायची. आम्ही पाच पाच दहा दहा पैसे जमा करून ते एखाद्या डब्यात, उतरंडीच्या एखादया मटक्यात लपवून ठेवत असू. जत्रेत काय काय खरेदी करायचं ते आधीच ठरलेलं असायचं.  परिस्थिती कशीही असू दया, कर्ज उसनवारी करून का होईना गाव-खेड्यात सण साजरे होतातच, मग जत्रा तर गावातला मोठा उत्सव त्यामुळे कुठेही कसर सोडली जात नसे.

अशा तयारीत गाव असताना जत्रेचा तो पहिला दिवस उगवत असे. वाघामायचे नवस. 'देवावर भार ठेवोनिया' प्रमाणे गावातील सुखदुःखे जनता वाघामायच्या हवाली करायची. चांगलं झालं ते वाघामायच्या नवसं कबूल केल्यामुळं. ग्रामीन भागात नवस करण्यात महिला खूप पुढे असतात. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मापासून मरेपर्यंत महिला आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. संसारिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना अनेक दुःखाचा सामना करावा लागतो. ती एक अस्थिर तारेवरची कसरतचं. सासरी नांदणाऱ्या महिलांना आपल्या पती, मुलाबाळासह आपल्या माहेरच्या लहान भाऊ-बहीण, आई-वडिलांची आणि एकंदरीत सर्वांचीच काळजी लागलेली असे. काही आयाच्या चिंतेचा 'कव्हरेज एरिया'  एव्हडा दूर पर्यन्त पसरलेला असायचा की त्या आज्याना आपल्या नातवाच्या कुटुंबाचीसुद्धा फिकीर लागलेली असे. मग त्या नातेच सासर कुठं का असेना, ती आजी तिला पेडगावच्या वाघामायचा नवस कबूल करायला बोलवत असे.  'माय म्हया पोरीलं पोरगं होउदे, 'म्हया भावाचं दुखन बरं कर,' 'माय म्हया पोरीच्या पोरील लई पोरी झाल्या,एक पोरगं होउदे' असा नवस कबूल करायच्या. यात गावातील कोणताच समाज मागे नव्हता.  मग तो बंजारा असो की हटकर, आदिवाशी असो की मराठा,  कलाल असो की राजपूत, वाघामाय सर्वांचीच. मग गावातील बंजारा महिला 'वाघायाडी मार छोरीनं आजी एक छोरा व्हेयद याडी'  'मारं भियार घणो दुःखरंच, घणे पिसा लागगे याडी'  या बिचाऱ्या भाबड्या बायकांना हे नाही कळायचं की उद्या हा भाऊ बरं झाल्यानंतर तुला विचारणारसुद्धा नाही. पण आई-बहिणीची माया वेडी असते. माझ्या आईनं भारतात कुठे तरी भूकंप झाल्याचं ऐकलं होतं. तिला माझी फिकीर. तिनं लगेच नवस कबूल केला की 'वाघामाय मला पोराला काय होऊ देऊ नको, मी त्याच्या भारोभार गूळ वाटिन आन एक गाईचं गोऱ्ह दान करीन.'  नवस तर कबूल केला पण काही कारणाने बरेच वर्ष तिचा हा नवस पूर्ण करायचा राहूनच गेला. मग माझ्या लग्नानंतर तिनं तो नवस फेडण्याचा ठरवलं.  मग काय, वाघामाय मंदिरासमोर एका तराजूत मी आणि दुसऱ्यात ६७ किलो गूळ.  माझ्या भारोभार गूळ गावभर वाटण्यात आलं. तसंच एक गोऱ्ह मोकाट सोडून देण्यात आलं. मला मात्र आईचा तो अहिंसक, शाकाहारी नवस फार आवडला. नंतर कळालं की त्यासाठी नवस झाला तो भीषण भूकंप गुजरातच्या भुजमध्ये झाला होता, मी राहत असलेल्या मुंबईपासून ८५० किमी दूर! तर असं, या ना त्या कारणाने लोकं वाघामायला नवस करायचेच. लोकांच्या सर्व बिकट समस्येवर एकच उपाय असायचा - वाघामायची पूजा किंवा नवस.

जत्रेचा पहिल्या दिवस म्हणजे वाघामायचे नवस. नवसाच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यानंतर गावातील उत्सवाला उधाण यायचं.  गावभर  जाणकू-सटवाच्या डफड्याचा आवाज येई. गावातील वातावरण बदलून जायचं.  ज्यांच्या घरी नवसाच बकरं कापणार अशा घरी जवळच्या पाहुण्यारावळ्यांची रेलचेल असायची. जवळचे सग्गेसोयरे, खास करून पोरी-जवाईबापू, 'इव्हाही'  हजर असायचे. मग ही सर्व मंडळी हातात लाल झेंडे घेऊन सोबत दावणीला बांधलेला बोकडं घेऊन वाजत गाजत निघायची.  जाळावर तापवलेलं जानकूच डफडं 'डंगलंग व्हकलंन्ग डंगलंग व्हकलंन्ग करत पुढं चालायचं. लहानसहान पोरं लाल झेंडे, निशाण घेऊन पूड पुढं मिरवायची. मागे म्यांss  म्यांss  करणार बकरं घेतलेली पुरुष मंडळी, नवीन नऊवारी साड्या, हातभार बांगड्या आन आणि डोक्यावर पदर, पूजेची थाळी घेतलेल्या महिला व पोरंसोर असायची. उगीच इतर देवाची नाराजी नको म्हणून वाघामायच्या वाटेवर सत्यामाय व सैलानीची पूजा व्हायची. कदाचित बोकड्याला त्याच्या भविष्याची जाणीव व्हायची म्हणून त्याचे पाय पुढं पडत नसंत, बऱ्याचदा तो म्यांss  म्यांss ओरडत पाय जमिनीला रोवल्यावाणी जागेवरुन हालत नसे. सत्यामाय पासून वाघामाय पर्यन्त रस्त्यावर सर्वत्र लालझेंडे घेतलेली पोर माणसं अशी गर्दी दिसायची. 

सैलाणीच्या थोडं पुढं 'गाडा ओढण्यासाठी' गावातील काही बैलगाड्या एकमेकाला बांधून ठेवलेल्या असत. लहानपणी आम्ही त्या गाड्यात बसायचो. मग ज्याची गाडे ओढण्याचा नवस केला तो गाडा ओढत असे. त्याला थोडं सोपं जावं म्हनून इतर लोकं थोडा हातभार लावायची. हर हर महादेव, हर हर महादेव गाडे ओढणार गाडे ओढत. आमची थोडी पाळी व्हायची, शिरणी-गुळाचा प्रसाद खायला मिळे. जानकूच्या डफड्याचा 'डंगलंग व्हकलंन्ग डंगलंग व्हकलंन्ग' असा आसमांत गुंजनारा आवाज, दोरीला बांधलेले अनेक बोकडं, हातात लाल निशाणी झेंडे घेतलेले पोरं, नवीन कपडे घातलेली नवसा घरची मंडळी, त्यात कुंकुनी माखलेली त्यांची कपाळ अशी जत्रा निघायची.

आमच्या घरासमोर बैठक म्हणजे गावाच्या पश्चिम दिशेचं प्रवेशद्वारचं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जत्रा आम्हाला दिवसभर बघायला मिळायची. गावातील वृद्ध, प्रतिष्ठीत मंडळी कायम त्या जोत्यावर बसून असायची. बिडया फुकतं, तंबाकू-सुपारी चघळत विविध विषयांवर गप्पा मारत बसायची. मोहनसिंगकाका, मेंबर हरसिंगकाका, नथुभैया रेखा, किसन आमरुकाका, आमचे वडील-दादा, काका, गना गव्हाळेमामा, द्वारकामामा, गंगाभैया अशी अनेक प्रतिष्ठीत मंडळी बैठकीच्या जोत्यावर बसलेली असायची. आदिवासी समाजातील तसेच दोन्ही तांड्यातिल बायकांचे घोळके धुरडा उडवत वाघामायच्या दर्शनाला निघायचे. बंजारा  समाजाच्या आयाबहिणी कचोली-घागरा, गळ्यात काळी पोत, हातात पाटल्या व पायात कडे डोक्यावर रोवलेले दोन शींगे, त्यावर खालपर्यंत लोंबलेली चुनरी किवा ओढनी असा त्यांचा पेहराव असायचा. अशी पारंपारिक वेशभूषा करून लगबघिने जत्रेला निघायच्या. त्यात लहान मोठया सर्वच पोरीसोरी असायच्या. बैठकीजवळ आल्याबरोबर त्या आवाज न करत लाजून भरभर चालत निघायच्या. जोत्यावर बसलेले आमचे दादा तांबडा पटका सावरत मोठ्या आवाजात विचारायचे, 'इ दी छोरी तारं कांई बेटा ? त्यावर ती बया हसून म्हणायची,' हवं काका, इ दी मार छ,इ दी नानक्या वरलील, ये दी छोरा परलीलं छ'. मग कोणीतरी नवसाबद्दल विचारालं तर त्यावर ती बाई म्हणायची,    ' दी वरस वेगे काका, मारं छोरारं पेटे मांई घन्नो दुकरचं हिंगोली नांदेड से वेगे, घणे पिस्सा खर्च व्हेगे, कांयी फरक छेयी, जेती आब से वाघायाडीरे हातेमं आन उच् टाळेवाळ!' अज्ञानात सुख असतं ते असं.

तर अशी ही गर्दी उत्साहात वाघामायच्या मंदिरासमोर जमा व्हायची.  सर्व लोकं वाघामायची पूजा करून मनोभावे पाया पडतं. माया नववारी साडीचा पदर हातात घेऊन, 'वाघामाय, लेकराबाळालं सुखी ठेवं' असं म्हणून पाया पडायची.  मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात खाटीक पाणी टाकत टाकत चाकू घासत बसलेला असे. दुसरीकडे नारळ फोडले जायचे.  मग बोकड्याची पूजा करून त्यावर पाणी शिपडलं जाई. अर्थात त्या थंड पाण्याला तो 'रिस्पॉन्स' म्हनून अंगावरून उडवून देण्यासाठी बोकड आपलं अंगाची कातडी हलवत असे. या प्रकारालाच ' बोकड्याने 'झडती' दिली, नवस कबूल झाला!'  असं समजत खाटीक लगेच बोकडयावर  सूरी चालवत असे.

कापलेल्या बोकडाचं रक्त देवीला वाहून मग त्याचे चारही पाय एका दोरीने उलटे लाकडाला बांधून दोन माणसं मोठ्या लगबघीने त्याला घरी आनत. ते दोघे एव्हडया लगबघीने का चालंत असावे? याच उत्तर मला अजूनही कळलं नाही. बरीचशी 'देशी' प्रिय मंडळी दुपारपासूनच 'रिचार्ज' मारत 'फुल्ल' असायची. एखाद्या ओसरीत नाहीतर जनावरांच्या कोठयात त्या नवसाच्या बोकड्याची चिरफाड होई आणि गावात वाटण्यासाठी मटणाचे काही हिस्से पाडले जात. एखादा मांसाचा तुकडा- हाडुक मिळलं या आशेनं गावातील कुत्रे सतत जीभ काढत त्या कोठ्याजवळ उभी राहत. 

इकडे मटणाची तयारी होत असताना तिकडे बाया          'कोडड्यास' करण्यासाठी शिळवटावर तिखटमसाला काळमीरे वाटण्याची घाई करत. त्या दिवशी गावभर सर्व गल्ली-बोळीत मटण शिजण्याचा सुवास येई.  जवळजवळ सर्वच घरात मटण शिजत असे. मग पिणारी मंडळी आपल्या 'उद्योगात' गुंग होत असे. कोणी मोहा-हातभट्टीची कुणी देशी घेत. मग या खाण्यापिण्याच्या उत्सवात न पिणारी पोरंसुद्धा कधी कधी बाटली जायजी. 'आरं उलुकशी पी काय व्हतं नाही'  असा आग्रह करत न पिणाऱ्यालाही सराईत मंडळी थोडी दारू पाजत. पूर्वी आमचं देशीच दुकान होतं. नवसाच्या दिवशी सर्व वयस्कर गावकरी दुकानात गर्दी करत असत. त्यात डफडं वाजविणाऱ्या पासून सर्वच पिणारी मंडळी दुकानात येत. आलेल्या पाहुण्याला गावकरी मोठया आग्रहाने दारू दुकानात घेऊन यायचे. जत्रेसाठी आलेली फुटानेवाली नवसाच्या दिवशी गावात पाराजवळ फुटाणे विकायची.  मग पिणारे पेपर,धोतरात गुंडाळलेले फुटाणे, भारत-बबूलालाचे  नरडे, चिवडा किंवा क्वचीत सुक्का बोंबिल आणत. मनसोक्त गप्पा मारत, चिल्लमी-बिडीचा धूर काढत एक मेकाला आग्रह करत हि मंडळी दारू ढोसत.  खूप चढल्यानंतर पाहुण्याला आग्रहाना  पाजण्याचा कार्यक्रम होत असे. लोकं जावईबापु आनं 'इव्हायी' च्या खातीरदारीमध्ये काही कमी पडू देत नसत.   कंदील चिमण्यांच्या मिनमिनत्या अंधुक प्रकाशात फुरके मारत मटणाच्या कोड्ड्यास-भाकरीच जेवण होई.  बऱ्याचदा नवसाला आलेल्या पाहुण्याला 'फुल्ल' पाजून, मटणाचा पावणचार करून गावातील एखादी सोयरीक जुळविली जायची.

एकंदरीत, जत्रेचा पहिला दिवस भरपूर दारू पिऊन मटण खाण्याची चंगळ यातच जात असे. कधी कधी दारू पिणारे आपसात भांडण-तंटा करीत पण असली प्रकरण गावातच मिटवल जाई.  काही प्रकरण घडून गावाची शांतता भंग होऊ नये म्हणून बासंबा पोलीस स्टेशनहून दर वर्षी एक-दोन पोलीस शिपाई गावात येत.  बऱ्याचदा बंदोबस्त करून थकलेले पोलीस गावच्या रंगामध्ये रंगून गेलेली मी पाहिली आहे.  कधी कधी तेसुद्धा  'फुल्ल' होत. अर्थात त्यानंतर पोलीस पाटलाला गावातील शाळेवर त्यांच्या कोंबड्याची व्यवस्था करावी लागे. अशा प्रकारे - देवीची पूजा करून, नवस फेडून, मनसोक्त खाऊनपिऊन तृप्त होऊन लोकं जत्रेचा पहिला दिवस  साजरा करत.  दुसऱ्या दिवशी लोक उरलेल्या खुर-मुंडीचा समाचार घेत. पुढील चार दिवस गावात अशीच धूम असे. 

ज्याप्रमाणे धगधगत्या मातीच्या चुली-निखाऱ्यावर भाजलेल्या 'भाकरी' ची सर गॅसवरच्या 'ज्वारीच्या रोटी  ला येऊच शकत नाही त्याचप्रमाणे गावाच्या यात्रेची सर शहराच्या आनंदनगरीला येणे शक्य नाही. १९७८ च्या काळात बोटावर मोजावे एव्हडयाच लोकांच्या 'पोटावर हात' असायचा बाकी सर्वांची 'हातावर पोट' असायची. मोलमजुरी कष्ट करून कमवणे आणि मगच खाणे. दैनंदिनच्या गरजांच पूर्ण न होत असल्याने मागे काही शिल्लक ठेवणे शक्य नव्हते.  गावात सर्वत्र कुडानं-तुरहाट्याची माती शेणाने सारवलेली बसकी घरं होती. गावातील कित्येक घरांना कुलूपच नसायचे.  गावात लाईट नव्हती, रेडिओ नव्हता की सायकल. धोतर पांढरा कुर्ता किंवा चिकनी सुताची बनियन हाच पुरुषी पोषाख होता. क्वचीत एखाद्या शिकल्या गडीकडे 'बेळफाटी' म्हणजे पायजामा असायचा. आर्थिक  परिस्थिती गरीब असूनही गावात एकोपा होता. शिक्षणाचा दर्जा उत्तम होता.

आज सर्वत्र दारूबंदीची चर्चा आहे. त्या काळी अशा बंदीची गरजच पडली नाही. 'अति सर्वत्र वर्जयेत' प्रमाणे जर अति होत असेल तर वेळीच पाऊल उचलणे योग्य. कारण पूर्वी गावात खूप कमी कष्टकरी लोक दारू पित. शेतावर, रानमाळावर काबाडकष्ट करून, दिवसभर विहीर खोदून, खंटी खोदून काम करून थकलेले गावकरी शिन घालविण्यासाठी दोन घुट पोटात टाकायचे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसाच नसल्यामुळे त्याकाळी कुण्याही पोरांसोराना चैनीखातिर दारू पिताना मी तरी पाहिलं नाही. कदाचीत त्यामुळे आज गावातील बरीच मुलं उच्चशिक्षण घेऊन चांगली नोकरी करत असावी. हल्ली गाव सधन झालंय. भौतिक सुख घराघरात लोटांगण घालत आहेत. आधुनिकीकरनामुळे सर्व शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध असल्यामुळे कष्ठाची कामे उरली नाहीत. पण ती आधुनिकता विचारात आली नाही त्यामुळे गावात चैनीखातीर पिणारी युवा मंडळी वाढली आहे, असं मी ऐकून आहे. त्यातच मोबाईलच्या 'फ्री डेटा' ने त्यांना निष्क्रिय केलं आहे. पुढे येणाऱ्या काळासाठी हि एक धोक्याची चाहुल आहे. त्यामुळे 'उद्या गावाचं म्हणजेच देशाच भविष्य ज्यांच्या हातात' अशा युवकांनी वेळीच त्यातून सावरने आवश्यक आहे. माझे हे वैयक्तिक मत.

                                
 ©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
   ह मु औरंगाबाद ९८२२१०८७७५





Sunday, 25 May 2025


                  





लाल पटका ( आमचा बाप )

काही व्यक्तींची देहबोली खूप प्रभावी असते. त्यांच्या चेहऱ्यावरीलं हावभाव, देहबोली सतत संवादाचे काम करत असतात. आमचे पिताश्री शंकरलाल म्हणजे 'दादा', असंच एक व्यक्तिमत्व होतं. साडे-पाच फुटापेक्षा जास्त उंची, मध्यम कडक आंगकाठी. पांढरा सदरा-धोती, डोक्यावर लाल फेटा चढवल्यानंतर त्यांचा गोरापान चेहरा भलताच उठून दिसायचा. तशी आमच्या भितीत वाढ व्हायची. जोरात चालतांना करsss करsss असा आवाज करणारे चामडीजोडे त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावायचे. सभोवतालच्या चार गावातील लोकांत त्यांच्याविषयी आदरयुक्त भिती होती. एका हाताने बंद छत्री टेकवत जेंव्हा हि स्वारी झप झप झोकात चालायची तेंव्हा आदराने लोकांचे हात 'राम राम ठोकण्यासाठी' वर व्हायचे. त्यांना बघताच गल्लीबोलीत पत्ते, पैशाचे डाव खेळणारी पोरंसोर मंडळी धूम ठोकून पसार व्हायची. कारण चालत चालता चामडीजोडे सैल करून मारण्याच खास कसब त्यांच्याकडे होतं! शिवाय त्यांच्या भारदस्त आवाजात एक दरारा होता.  लहानपणापासून आम्ही वडिलांना 'दादा'च म्हणायचो ?  कदाचित गावातील इतर समाजातील मंडळी त्यांना 'दादा' नावांनी हाक मारत असावी, तेच पुढे चालत गेलं. हा लेेेख खास त्यांंच्या विषयी.

निजामच्या काळात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांच शिक्षण मोडी वाचण्या-लिहिण्यापूरतच झालं होतं. पण जीवनाच्या विद्यापीठातलं त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि जीवनमूल्याचे संस्कार एखाद्या पदवीधराला लाजवणारे होते. 'मग स्वतः जुजबी शिकून तुम्ही आमच्या शिक्षणाच्या पाठी का लागलात?'  या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एका घटनेची आठवण करून सांगितलं- त्याकाळी क्वचितच गावात, पोलीस निरीक्षक(चीफ साहेब), तहसीलदार, बीडीओ अशी अधिकारी मंडळी भेट द्यायची. अशा दुययम, तृतीय वर्ग कर्मचाऱ्यांचा खेडेगावात प्रचंड दरारा असायचा. गावकरी आपल्या परीने त्यांची चांगली सोयसाय करायचे. सर्व गाव त्यांना बघायला गोळा व्हायचा.  मग ती अधिकारी मंडळी जास्तीच ऐटीत येऊन बाजेवर चहाचे फुरके मारत लोकांवर इंग्रजी शब्दफेक करायची. बिचाऱ्या गावकऱ्यांना त्या शब्दातलं अ कि ढं कळत नसे. पण साहेबांच्या विंग्रजीने ते खूपच प्रभावित होतं.  बाप रे, साहेब खूपच हुशार आहेत असं त्यांना वाटे. इंग्रजी म्हणजे हुशार हा गैरसमझ तसा जुनाचं.  साहजिकच अशा घटनेने आमचे दादा बेचैन होतं. या घटनेने दादाच्या मनात शिक्षणाविषयी जिद्द निर्माण केली. शिक्षण सर्वोपरी आहे हे ते समजून गेले. दूरदृष्टी निर्माण होते ती अशी. मग काय, आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत आम्हा भावंडाना शिकविण्याची जिद्द सुरु झाली. गावातून तालुकाच्या ठिकाणी मग औरंगाबाद असं आम्ही सर्व शिक्षण घेत गेलो. त्यांच्या या ध्यासामुळे कठीण परिस्थितीत चुलत-सख्खे असे आम्ही सात भावंड उच्चशिक्षित झालो. एक जिल्हा न्यायाधीश, दोन प्राध्यापक, एक डॉक्टर, एक एम.ए., मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर सर्वात लहान भाऊ कृषी अभियांत्रिकी पदवीधर झाला. शिकलेल्या सुना येऊन 'एक उच्चशिक्षित कुटुंब' अशी समाजात वेगळी ओळख निर्माण झाली. अर्थात हजार वस्तीच्या छोट्या पेडगावासाठी हा बदल खूपच मोठा होता. समाज आणि सभोवतालच्या चार गावाला प्रेरित करणारं एक ऊर्जास्रोत होतं. अर्थात, मुलांना पारंपरिक शेती-धंद्यास न जूपता उच्च शिक्षण दिल्याचा दादांना प्रचंड अभिमान होता आणि तसं ते मोकळं बोलूनही दाखवायचे. विशेष म्हणजे , खूप शिकलेले मुलं म्हणजे मोठया पदावर नोकरी म्हणजेच अफाट पैसा, असे त्यांचे संकुचित विचार मुळीच नव्हते. धनसंपत्तीमुळे नाही तर कुटुंबाच्या उच्चशिक्षणातील प्रगतीमुळे दादांचा दरारा वाढतंच गेला. आज हा शिक्षणरूपी वटवृक्ष खूप बहरला आहे. पारंब्या फुटाव्या तसे कुटुंबातील अनेक मुलं-मुली डॉक्टर, इंजिनियर होऊन फक्त अर्थार्जनच्या पाठी न धावता समाजसेवा करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने घरातील मुलांनी फक्त सामान्य महाविद्यालयात प्रवेश नं घेता  आयआयटी, एम्स, आयआयएम, ऐनआयटी, बिट्स पिलानी सारख्या संस्थेत गरुड झेप घेतली आहे. मग या वृक्षाच्या कलमा इतर ठिकाणी लावल्या गेल्या, त्याही वृक्षात रूपांतर होऊन वाढल्या.

असं घडत असताना आमच्या कुणाच्याही शाळेत त्यांनी भेट दिलेली मला आठवत नाही. मी चौथ्या इयतेत शिकत असतानाच फक्त एक प्रकरण मला आठवतं - घटक चाचणीत भरपूर लिहूनही आमच्या मुख्याध्यापकांनी मला कमी गुण दिले होते. माझं हे गाऱ्हाणं कुठून तरी दादांना कळालं. दुसऱ्या दिवशी मोठे गुरुजी (मुख्याध्यापक) आणि दादाची सहज भेट झाली. गप्पाच्या ओघात दादाने माझं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडलं. तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी माझी कान उघाडणी केली,  'प्रेम्या, एक पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर गेला' या एका वाक्याच्या उत्तरा ऐवजी तू त्या पक्षास इतरत्र फिरवून पाच वाक्य लिहिलेत म्हणजे जास्त गुण मिळत नाहीत'!  ललीत लेेेखन म्हणजे 'वित भर जीवाला हातभर झगा!' कदाचित माझ्या लिखानाच बीज बालपणीच पेरलं गेलं असावं.

दादा वैद्य नव्हते पण गावी-परगावी कुणी आजारी आहे असं माहित होताच हातातील काम बाजूला सारून ते आधी धावायचे. त्यासाठी नात्याचे बंधन नव्हते. लगेच 'तू घाबरू नकोस तुला काही होणार नाही. वेडा आहेस का, थोडी हिम्मत राख' असा हक्काचा धीर देत त्यांचा हेकळणी, तुळस, सारख्या औषधी झाडपाल्याचा इलाज सुरु व्हायचा. पूर्वी गावात डॉक्टर-दवाखाने नव्हते. शेत-घरकाम करताना गावकऱ्यांना मार लागायचा, जख्म व्हायची.  कधी केसतोड तर कधी हाड टीचायचे. गरीब गावकऱ्यांना शहरात जाऊन इलाज करणे शक्य नसायचे त्यामुळे ते दुखणे अंगावर काढीत. दादाला हे माहित पडलं की ते स्वतः रोग्याकडे धावायचे. लगेच एखादी काच फोडून ते त्यातील पु काढून, स्वच्छ करून त्यावर झाडपाला लावून जख्म बांधून टाकायचे. बघणाऱ्याला ते किळसवानं वाटायचं पण दादांसाठी ते नेहमीच काम होतं. अशा रुग्णसेवेत त्यांचा हातखंडा होता. तूटलेलं हाड बांबूच्या कम्बड्या बांधून ते जोडलं जायचं. कालांतराने तो रोगी बरा होऊन कामाला जायचा. काय मिळत असावं त्यांना अशा सेवेत? पण ते करायचे.

त्यांचं हे रुग्णप्रेम फक्त मनुष्यजातीपुरत मर्यादित नव्हतं. एखादी गाय, म्हैस किंवा बैल प्राणि आजारी आहे हे माहित पडलं की ते जिद्दीने पेटून उठायचे. मग इतर कामे आपोआप बाजूला, प्राथमिकता फक्त तो रोगी. माझ्या बालपणीची ती घटना. भर दुपारी शेतातून वाघा गडी धावत आला होता. कंठया बैलाला पान लागला होता. आमच्या गावच्या भाषेत पान लागने म्हणजे सर्पदंश. बातमी एकूण दादाला चलबिचल होताना मी पाहिलं होतं. दुपारी गड्यानी कंठयाला बैलगाडीत टाकून घरी आणलं. धोतर खोसून गड्याला सोबत घेऊन दादाचा झाडपाल्याचा इलाज सुरु झाला. हळूहळू गावातील लोक जमा झाले. खंडीभर गुरात लाल्या-कंठया सर्वांची आवडती जोडी. बालपणी मी सुद्धा ती जोडी हाकली होती.  कंठया गेला तर जोड फुटणार होतं. धांदीन पाय बांधलेल्या कंठयाच तोंड जबरीने फाकवून त्यात काढे, औषध टाकले जात होते. कंठया दुःखाने तडफत होता. शेवटी जे नको होतं ते झालं.  विष कंठ्याच्या अंगात भिनत गेलं.  सूर्य मावळला होता, कंठयाने शेवटचा श्वास घेतला. कंठया गेला. बैलाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत दादा हरले.  दुःख अनावर होऊन दादा ढसढसा रडले. तो दिवस मला आजही आठवतो. मनाने पाषाणासारखा कठोर मनुष्य रडू शकतो, मी ते पहिल्यांदा पाहिलं होतं.

शेतीची कामं आणि इतर व्यवसायामुळे ते कधीही घरी बसलेले आम्हाला आठवत नाही. सुर्योदयापूर्वी बांड्या घोड्यावर ती स्वारी परगावी निघून जायची. ते परत येईपर्यंत आम्ही झोपी जायचो.  बालपणीचे आम्हा भावंडाचे तंटे प्रकरण 'दादाला सांगू का?' या एका वाक्याने संपायचे. त्यामुळे त्यांच्यासमोर बसून मनमोकळं बोललेलं मला आठवत नाही. दोन वेळेस मार खाल्याचं मला नक्की आठवतं. ते घरात तर आम्ही बाहेर किंवा ते परगावी तर आम्ही घरात.  गावपंचायत वगळता त्यांना गावातील राजकारणात विशेष रुची नव्हती. क्वचीत गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच नेमणुकीविषयी ते आपलं मत मांडायचे. 

त्यांना सर्वात जास्त तिटकारा होता तो अंधश्रद्धा, कर्मकांड आणि त्यायोगे होणाऱ्या भक्तांच्या लुटीचा. देव मंदिराच्या नावाखाली होणारी लुट त्यांना आवडत नसे. काम सोडून रामाच्या पाठीमागे धावणारी जनता त्यांना आवडत नसे. 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' किंवा 'काय काशी करिती गंगा। भीतरी चांगा नाहीं तो।।’  असंच त्यांचं म्हणणं होत. पंढरपुर, तिरुपती बालाजी सारख्या दर्शनात लोकांना लुबाडणारी मंडळी, तेथील अस्वच्छता बघून त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर ते अध्यात्मापासून थोडं दूरचं गेले.

कर्तृत्त्ववान पूर्वजांची महती काही ओळीत सामावने कठीण जाते.  दोन ओळीच्या मध्ये सुद्धा बरंच काही बोलण्यासारखं असतं. खूप खस्ता खालेल्या असतात त्यांनी. प्रसंगी अपमान सहन केलेला असतो. अशिक्षित वातावरणात 'शिक्षण' असा चाकोरी बाहेरचा विचार करणे तसं सोपं नव्हतं. एक प्रकारचा जोखीम पत्करल्यासारखा तो प्रकार होता. क्वचीत थोडे मागे ओढण्याचे प्रयत्न झालेले असतात. शोकांतिका अशी की हे सर्व जोपर्यंत आपल्यावर तशी वेळ येत नाही तो पर्यंत कळत नाही! 

आज त्याच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गावात किती तरी तरुण मंडळी उच्चशिक्षित होऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात नोकरी करत आहेत. साहजीकच त्यामुळे आज गाव शिक्षित होऊन सुधारणा होत आहे. गरज आहे की गावातील तरुण मंडळींनी इतरांना उच्चशिक्षण घेण्यास मदत व मार्गदर्शन करण्याची. जेंव्हा केंव्हा गावात शिक्षणाविषयी चर्चा होईल, स्व. शंकरलाला म्हणजे आमच्या दादाच नाव आवर्जून घेतल्या जाईल. थोडी का होईना, 'मागे कीर्ती उरावी' ती अशी.   त्यांच्या पालखीचे भोई होऊन त्यांनी शिकविलेल्या जीवनमूल्यावर आणि दाखविलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली.

© प्रेम जैस्वाल, पेडगावकर,
    ह.मु. औरंगाबाद, मो. ९८२२१०८७७५